दरवर्षी प्रमाणे ह्यावर्षी ही वाढदिवस साजरा करण्यासाठी किल्ल्याची निवड करतच होतो. माझ्यासोबत आजवर अनेक वर्षे किल्लेभ्रमंती करत असलेल्या वासुदेव दळवी समोर विषय मांडला व कावनई आणि हर्षगडावर ( हरिहर ) शिक्कामोर्तब करण्यात आली. अगदीच गरजेच्या वस्तू ब्यागेत कोंबून वासू आणि मी ७ जुन २०१५ च्या सकाळी इगतपुरी गाठले. तिथून घोटी आणि घोटी वरून शेअर गाडीने आम्हाला कावनई गावात सोडले . मालवाहतुकीच्या गाड्यांनाच मागे दोन्ही बाजूला लाकडी फळी लावून ह्या गाड्या पुढचा १४ किमीचा खाचखळग्यातला प्रवास करत आपल्याला कावनई गावात सोडतात . कावनई गावातील पाण्याची दुर्दशा बघून लवकरात लवकर पाऊस पडावा हीच प्रार्थना आम्ही करत होतो.
किल्ल्याची चढाई तशी सोपी आहे. गावातूनच किल्ल्याच्या एका सोंडेवरून रस्ता आहे.
पूर्वी दरवाजा गाठायला छोट्याश्या चिमणीतून हाताने खोबण्या पकडून पुढे जावे लागत असत पण आता शिडी लावल्यामुळे वाट अजूनच सोपी झाली आहे.
तासाभरातच आम्ही माथ्यावर पोहचलो. माथ्यावर तळ्यात शेवाळ्याच पाणी उरलेलं आहे.
पडक्या बुरुजाचे आणि बाजूच्या वाळलेल्या टाक्यांचे अवशेष बघत पूर्व-पश्चिमे कडील सह्याद्रीच्या रांगा, अप्पर वैतरणा चा पाण्याखालचा परिसर बघत असतानाच वातावरणात अचानक आलेला बदल जाणवायला लागला. कडक उन्हात गारवा जाणवत होता, ढगांची गडगड कानी यायला लागली. निळाशार आकाशातील पांढऱ्या ढगांची जागा आता पावसाला उऱ्हात घेऊन फिरणाऱ्या काळ्या ढगांनी घेतली. हवेतले असे रंग बघत आम्ही गड उतरायला सुरवात केली.
पुढचा दौरा हर्षगडावर.
वाकी फाट्यावर पोहचल्यावर तिथून देवगाव साठी जीप पकडली. पावसाने आपली तारीख
चुकवली नाही. हळू हळू पडणारे पावसाचे थेंब आता मुसळधार सरी होऊन कोसळत
होते. वायपर नसलेली आणि छप्पर गळत असलेली जीप फक्त रस्त्याचा अंदाज बांधत
ड्रायव्हर चालवत होता. देवगावला उतरल्या बरोबरच वाड्यावरून त्रंबक कडे
जाणारी ST भेटली. गाडीचा आकार फक्त बदलेला पण परिस्थिती तीच. विजांच्या
साथीने धो धो कोसळत असलेल्या पावसात ST ने निरगुड फाट्यापासून २ किमी पुढे
टाकेहर्ष गावात आम्हाला उतरवले. पाऊस कमी होण्याची वाट बघत रस्त्याच्या
कडेला असलेल्या घराचा आडोसा घेतला. तेवढा वेळ आम्ही विजा आणि ढग ह्यांचा
आकाशातील पडद्यावर चाललेल्या चलचित्राचा आणि रंगसंगतीतला देखावा न्याहाळत
होतो.
ढगांची लाट आसपासच्या परिसरावर आरूढ होत होती.
पावसाचे हे रूप पाहून हर्षगडाच्या पायथाच्या कोटमवाडीतच राहायचा निर्णय घेऊन वाडीतील देऊळ किंवा शाळा शोधायला सुरवात केली.
कोटमवाडीतील आव्हाटे परिवाराचे वाडीतील सगळ्यात जुने घर. त्यांनीच शाळेची किल्ली देऊन आमच्या रात्रीच्या जेवणाचा पण बंदोबस्त केला. चुलीवरच्या भाजी भाकरी आणि तिथेच पिकवलेल्या भाताचा आस्वाद घेऊन आम्ही निरगुड फाट्यावर रात्रीचा फेरफटका मारायला निघालो. पहिल्या पावसाने शीतनिद्रेतल्या काजव्यांना जाग केल आणि रात्रीची रोशनाई बहरली. सकाळी लवकरच आम्ही हर्षगडाच्या दिशेने निघालो.
गावातूनच गडावर जाण्यासाठी मळलेली वाट आहे. रस्त्यात मध्ये चकव्याच्या ठिकाणी बाण दाखवले आहेत. पहिल्या टेकडीवर पोहचताच वासूने केक भरवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. हर्षगडाची ओळख म्हणजे गडाच्या पायऱ्या.
अखंड कातळात कोरून काढलेल्या पायऱ्यांवर जागोजागी पकडायला खोबण्या आहेत.
दरवाज्यात पोहचल्यावर गडाच्या मागील बाजूने हर्षवाडी गावातून गडावर आलेली वाट पाहायला मिळते.
पायऱ्या चढत असतानाच आकाशात पक्ष्याचा थवा पहिला. अल्प्य संख्याक अशी १३ गिधाड (griffon vulture) एका नजरेत पाहण्याची हि आमची पहिलीच वेळ होती.
गडाचा माथा तसा लहानच आहे अर्ध्या तासातच गडफेरी आटोपता येते.
पण रात्रीच्या पावसाने आकाश स्पष्ट केल होत. १५० ते २०० किमी अंतरावर नजर पोहचत होती. नाशिक जिल्ह्यातील अजंठा- सातमाळ रांग तसच त्रंबक रांगेचे विस्तीर्ण असे दर्शन होत असताना तिथून निघण्याचा मोह आवरत न्हवता .
गडावर पाण्याची बरीच टाके आहेत पण पिण्यासाठी सध्या एकच वापरात आहे. तिथल्याच एका शेवाळाने भरलेल्या टाक्यात माकड मरून पडले होते. ते आम्ही बाहेर काढून ठेवले. गिधाडांची सोय झाली.
गडाच्या बुरुजावरून दिसणारा नयनरम्य परिसर डोळ्यात आणि मनात साठवून आम्ही गड उतरायला सुरवात केली.
रानखाटिक चे पिल्लू उडण्याचा प्रयत्न करत असताना नजरेस पडले
वाटेत आंबा,करवंद, जांभूळ ह्या रानमेव्याची मजा घेत आम्ही कोटमवाडीतील शाळेत पोहचलो. आव्हाटे कुटुंबाचे आभार मानून आम्ही परतीची वाट पकडली. निरगुडफाटा - खोडाळे - कसारा - कल्याण असा प्रवास करत सुखरूप घरी पोहचलो.
हरिहर

नाशिक म्हटलं कि सर्वप्रथम डोळ्यासमोर काय येत असेल तर' सह्याद्रीच्या
ह्या' मनाला भुरळ पाडणाऱ्या विलोभनीय पण अजस्त्र अशा रांगा ...मग ती रांग
पूर्व पश्चिमला कलनारी कळसुबाई - त्र्यंबक रांग, वा अंजठा- सातमाळा रांग
असो , वा उत्तर दक्षिण अशी बागलाण कडून सुरु होणारी सेलबारी डोलबारी रांग
असो मनाची घौडदौड सतत इथे धुमसत घालत राहते .
सह्याद्री तसा सदैव साद देतच असतो फक्त आपल्याला थोडी उसंत हवी असते ह्या
रोजच्याच धावपळीतून बस्स ती एकदा मिळाली कि मग पाउलं फिरकू लागतात .
आपल्याच ह्या दुर्गम दुर्ग वाटेने ...कडे कपार्यातून...नवी जिद्द ,नवा उत्साह घेऊन ...नव्या पायवाटा धुंडाळत ...
काही दिवसापूर्वीच असाच एक योग जुळवून आला असं म्हणण्यापेक्षा तो योग
जुळवून ला अस मी म्हणेन , २८ जून ला , १५ जनाचा ताफा घेऊन आम्ही हरिहर च्या
वाटेने निघालो ...
हरिहर / हर्षगड नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक रांगेतील हा एक पोलादी गड .
साधारण ३० किलो मीटर अंतरावर वसलेला .पायथ्याच गाव निरगुडपाडा , गावात
पायउतार
होताच त्याच राकटपण मनाला भुरळ न पाडावं म्हणजे नवलच . त्याच भव्यपण काळोख्या रात्री हि उठून दिसत . बस्स थोडं चांदण हवं
पहाटे ३:४५ च्या आसपास आम्ही गडाच्या पायथ्याशी म्हणजे निरगुडपाडा गावात
पायउतार झालो .तेंव्हा सर्वत्र काळोख दाटलेला. कोंबडा आरवल्याची अजून हि
वेळ झाली नव्हती.
त्यामुळे गावातले कुणी एक व्यक्ती बाहेर फिरकताना दिसत न्हवती . तसं अजून
हि आमच्या चौघांमध्ये शीत युध्द सुरु होत . चौघ म्हणजे कोण ? तर
मी अन माझी बहिण संपदा , मित्र यतीन आणि ड्राइव्हर काका आंम्ही शाब्दिक लढत लढत होतो .
नक्की पायवाट कुठून आहे ? नक्की कुठून आपल्याला जवळ पडेल ? येथून
कासुर्ली गाव किती अंतरावर आहे ? त्यासाठी मागे जावे लागेल कि पुढे ? कि
येथूनच जायचं ?
असे ना ना प्रश्नांचा भडीमार अगदी हलक्या आवाजात खेळकर मनाने एकमेकांवर करत
होतो . शेवटी ' आहे त्याच ठीकान्याहून पुढे निघायचे ' असा ठराव पास करत ,
शाळेच्या आवारात निवांत शांततेत आम्ही थोडा विसावलो. .
काळोख्या रात्रीच सौम्यपण मनाला तसं ताजतवानं करत होतं . उत्साही मन पहाटेची आस धरून होतं
ह्या किल्ल्याचं तसं खास वैशिष्ट्य म्हणजे उभ्या सरळसोट कातळात खोदलेल्या
त्या पायऱ्या. आणि त्याच आम्हाला इथपर्यंत घेऊन आल्या होत्या . त्यामुळे
कधी एकदा पायवाट
धरतोय अन झपझप पाउलं टाकत त्या पायरयांना स्पर्श करतोय अस झालं होतं .
गडाचा इतिहास सांगायचा झाला तर ...
हरिहर किल्ला अहमदनगरच्या निजामशाहाच्या ताब्यात होता. १६३६ साली
शहाजीराजांनी शेजारचा त्र्यंबकगड घेताना हाही किल्ला जिंकून घेतला. मात्र
नंतर याचा ताबा मोगलांकडे गेला.
पुढे १६७० मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी हा गड जिंकून स्वराज्यात मोलाची भर
घातली. ८ जानेवारी १६८९ रोजी मोगल सरदार मातब्बरखान याने हा किल्ला जिंकला.
शेवटी १८१८ मध्ये हा गड मराठयांच्या ताब्यातून इंग्रजांनी जिंकून घेतला.
प्राचिन काळापासून महाराष्ट्रातील बंदरात उतरणारा माल अनेक घाट मार्गांनी
नाशिकच्या बाजारपेठेत जात असे. यातील त्र्यंबक रांगेतून जाणार्या गोंडा
घाटावर लक्ष ठेवण्यासाठी हरीहर- भास्करगड यांची उभारणी करण्यात आली होती.
काही क्षण आपल्या आयुष्यात असे असतात . कि जा म्हटलं तरी जात नाही .
कधी कधी हि ' वेळ' आपल्यातला ' संयमीपणा ' अगदी तोलून तपासून पाहते .
पावणेचार वाजता आम्ही येउन सुद्धा वेळ पुढे सरकत न्हवती . अस वाटावं कि
वेळेने आज मौनव्रत धरलंय , पुढे सरकायचचं नाही . असा तिचा ठाम निर्णय असावा
.
तर असो धारण चार ते साडे चार दरम्यान एक भली मोठी बस , तिच्या पाठोपाट
दुसरी मिनी बस शांततेला छेदत खुर्खुर आवाजात रस्त्यालगत येउन पोहचली .
शाळेलगत भिंतीच्या बाजूला तिने आसरा घेतला साधारण ७० ते ८० च्या आसपास चा
एक ग्रुप त्या दोन बसमधून हरिहरच्या भेटीस आला होता. त्यामुळे आमच्या मनाची
घाई अजून वाढली होती.
एका वेळेस एकच व्यक्ती जावू शकेल अश्या हरिहरच्या त्या खड्या पायऱ्या .
अन हा ८० जणांचा ताफा , एकदा का सुरुझाला . तर एका व्यक्तीस एक मिनिट धरला
तरी
८० मिनिटे लागतील हो . तितका वेळ आपण ताटकळत राहायचं का ? . छे छे ..अजिबात नाही .
मनातच मनाची समजूत घालत , वेळच गणित मांडत . आम्ही पहाटेच्या अंधुक प्रकाशाची आतुरतेने वाट पाहत होतो .
टौर्च २-३ जण सोडून , अन सांगून हि इतर कुणी आणल्या न्हवत्या . त्यामुळे
थोडा वेळ वाट पाहणं आम्हास क्रमपात होतं. त्याशिवाय पर्याय न्हवता . पण
मनाची घौडदौड आम्हाला शांत बसून देत न्हवती .
शेवटी घडाल्याचे काटे सव्वा पाच वर स्थिरावल्यावर त्या अंधुक प्रकाशात
आम्ही ट्रेक ला सुरुवात केली .सुरवातीला मळलेल्या पायवाट लागली. पुढे
नांगरलेली जमीन दिसत होती.
त्यामुळे पायवाट मधेच लुप्त पावत मधेच उगवत . हरिहर धुक्याच्या पुंक्ज्यात
अजूनही स्वस्थ पडून होता. कुणी तरी आपल्या भेटीस येत आहे, ह्याची पुसटही
कल्पना त्याला नसावी .
निद्रिस्थ अवस्थेत तो आपला शांत पहुडलेला . धुक्याची दुलई अंगावर चढवत . पण त्याच ते हि रूप मनाला
चैतन्याचं नवगंध अंतरंगात पसरवत होतं. उत्साहाला कसं उधाण आलेलं.
प्रचि २
अन त्याच उत्साही मनाने एक एक पाऊलं पुढे टाकत पाउलवाटा धुंडाळत आम्ही
गडाकडे आगेकूच करत होतो. समोरच फ़निचा डोंगर अन त्यावर रूढ झालेला नागाच्या
फणा काढल्यागत असलेला इवलासा सुळका दुरूनच साऱ्यांच लक्ष वेधून घेत होता.
एव्हाना प्रकाशाच्या डोळस छटा हि सर्वत्र उधळण घालू लागल्या होत्या .
निळ्याशार आकाशात पक्षी पाखरं मुक्तपणे विहार करू लागले होते . त्याचं
संगीतमय स्वर
मनाला एक तालबद्ध लयात धुंद करत होते. सगळ वातावरणाच कसं आल्हादायक होतं. भारलेल्या अवस्थेत ..
प्रचि ३
आणि अशातच काही पायवाटा दुभंगल्या गेल्या अन व्हायचं तेच झालं. चुकीच्या वाटेने निघालो .
पण म्हणतात ना ट्रेक दरम्यान वाटा चुकण्याची मजाच काही और असते. त्याशिवाय
ट्रेक यादगार तरी कसा होणार , पण एक मात्र आहे ह्यात आपण ठरवलेल्या वेळेची
घडी मात्र साफ विस्कटते.
आयुष्याची पायवाट हि अशीच कधी आपण चुकतो. अन एक वेगळ्या पायवाटेवर येउन ठेपतो .
पण तो हि एक आयुष्याच्या शिकवणीचा भाग असतो . तो शिकून पुन्हा आपली पायवाट शोधत पुढे निघायचं बस्स...
साधारण ७:२५ ला आम्ही एका उंच सोंडेवर आलो. येथे शेंदूर फासलेल्या काही देवांची मांदियाळी होती. मधोमध त्रिशूल ...
हरिहर चा उभा कातळकडा अन त्यात खोदुन काढलेल्या त्या पायऱ्या येथून
स्पष्ट्य दिसत होत्या . येथूनच पुढे स्वर्गरोहनचा आम्ही आनंद घेणार होतो.
प्रचि ४
' मेल्यावर स्वर्ग दिसतं ' अस म्हणतात . पण आपल्या सह्याद्रीतल्या
कुठल्याही गड किल्याच्या वा शिखराच्या माथाय्वर जा ..किंव्हा
दर्याखोर्यातुनी भटका ...
स्वर्ग , स्वर्ग म्हणजे तरी नक्की काय? हेच का ते ? अशी अनुभती आल्याशिवाय राहणार नाही .
सर्वत्र पसरलेली धुक्याची दुलई , त्यातून डोकावणारे पहाडी उंच कडे , अंग
अंग भिडणारा बेभान वारा . त्याच तालमय संगीत , धरणी मायेने प्रेमाने
पांघरलेली हिरवी शाल, कडे कपार्यातुनी धो धो उधळणारे शुभ्र धवल धबधबे
....आपल्या नेत्र कड्यांचे पारणे फेडते.
वाटतं इथेच घर करून राहावं कायम .........पण घरची वाट पुन्हा पकडावीच लागते.
ज्या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो , तो क्षण अगदी जवळ आला होता.
त्या खोदीव पायरया आम्हाला जणू आव्हान देत उभ्या होत्या. सोबत उनाड वारा हि चिडवायला तप्तर होता .
कलावंतीण सुळक्याची मात्र इथे आठवण आल्याशिवाय राहत नाही . पण इथल्या
प्रत्येक पायरीला उजव्या डाव्या बाजूला आधारासाठी म्हणून खोबण्या आहेत.
त्यामुळे मनातली भीती कुठेशी पळून जाते.
पण पायऱ्यावरून एक एक पाउल टाकताना मिळणारा आनंद काही औरच असतो. उनाड वारा
आपल्याला प्रत्येक पाऊलावर आपली पीछेहाट करत असतो. त्यातच आपण गडाच्या
पहिल्या प्रवेश द्वारा जवळ येउन पोहोचतो. येथून समोरील विहन्ग्मय दृश्य
मनाला भुरळ पाडते. प्रवेश द्वारातून पुढे येताच उजव्या हाती आपल्याला
शेंदूर फासलेल्या गणेशाची प्रतिमा दिसते .
प्रचि ५
प्रचि ६
त्याला वंदन करून , एखाद्या गुहेतून चालावं तसा अनुभव घेत पुढे चालत
राहायचे . पुन्हा नागमोडी वळण घेत खोदीव पायर्यांच्या संगे आपण गडाच्या
अंतिम दरवाजाजवळ येउन पोहोचतो. येथून पुढे माथ्यावर आल्यावर ...घुंगावनारा
वारा अन सभोवतालच दृश्य आपलां थकवा क्षणात दूर करतो.
येणाऱ्या पायवाटेच्या दिशेने पाहिल्यास समोर फनीचा डोंगर त्याच्या पाठी
उतवड (ह्या रांगेतला उंच शिखर ) आणि बाजूला भास्कर गड आपले दर्शन घडवून
देतो.
प्रचि ७
पूर्वेकडे चालत गेल्यास , समोरच ब्रह्मा पर्वताचं तेजपुंज रूप मनाचा हर
एक कोनाडा उजळून काढतो त्याच्यापुढे कापड्या , अन भक्तिरसात कायम मग्न
असणारा ब्रम्हगिरी खुणावू लागतो.
प्रचि ८
वाटेतून पुढे सरकताना , पाण्याच्या काही टाक्या लागतात . पुढे एक तलाव अन तळया काठी हनुमानच मंदिर , बाजूला छोटस शंकराचं मंदिर दिसतं.
येथूनच पुढे पुढे चालत गेल्यास ती घुमटाकार इमारत दिसते . इमारतीच्या
डाव्या उजव्या अंगाला पाण्याच्या काही टाक्या आहेत अन एक तळ आहे . त्यातलं
पाणीपिण्या योग्य आहे. येथूनच सभोवतालच पहाडी दृश्य मनाला घायाळ करत .
निसर्गाच्या त्या सौंदर्य रूपाचा पुरेपूर आनंद लुटायचं अन परतीच्या
मार्गाला लागायचं.
प्रचि ९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
प्रचि २९
प्रचि ३०
प्रचि ३१
प्रचि ३२
प्रचि ३३
प्रचि ३४
प्रचि ३५
प्रचि ३६
प्रचि ३७
कुशावर्त तिर्थ (त्र्यंबकेश्वर ) त्याजवळच हे एक शिवमंदिर मंदिर आहे.
(ब्रम्हगिरी च्या पायथ्याशी , जाता जाता आम्ही त्याचं हि दर्शन हि घेतलं ,
त्याचे काही प्रचि )
प्रचि ३८
प्रचि ३९
प्रचि ४०
प्रचि ४१
प्रचि ४२
प्रचि ४३
प्रचि ४४
प्रचि ४५
(वरील सर्व फोटो हे मोबाईल मधून टिपलेत . )
काही चुका वगैरे असल्यास जरुरू निदर्शनास आणून द्याव्यात .. 
संकेत य पाटेकर


No comments:
Post a Comment