भटके
आणि भटक्यांची जमात हि ठार वेडी असते..शनिवार-रविवार आला रे आला कि
ह्यांच्या अंगात संचारत..मग ते आपल्याला कधी धोडप वर, कधी राजगड वर तर कधी
सांधण च्या दरीत अथवा कळसुबाई वर, कधी घाटवाटांवर वर
सह्याद्रीच्या दर्या खोर्यांमध्ये सापडतात.. ह्यांना उन, पावसाळा, हिवाळा
ह्याच्याशी काही घेणं देणं नसत.. ह्यांना इतिहासात रमून जायचं असतं, अफाट
सह्याद्रीच्या बेलाग कड्या-कपार्यान मधली शांततेत बुडून जायचं असतं तर कधी
सह्याद्रीचे अद्वितीय रूप मनात साठवायचं असत.. मी हि असाच एक वेडा..
 |
| साम्रद कडून रतनगड कडे जाताना, समोर रतनगडाचा खुटा |
भंडारदरा
भागातील किल्ले आणि अजस्त्र डोंगरांवर प्रत्येक भटक्याचे प्रेम होते, आहे
आणि कायमच राहणार आहे यात काहीच शंका नाही.. याच भागात श्री अरुण सावंत सर
यांनी रतनगड-कात्राबाई-आजोबा-हरिश्चंद्र-बैल
घाट-सादडे घाट असा लांबलचक ट्रेक आयोजित केला होता.. अरुण सर म्हणजे
सह्याद्री भक्त त्यांच्या सोबत चा ट्रेक म्हणजे नुसता ट्रेक नसून दर वेळेला
१०० गोष्टी नवीन शिकायला मिळतात.
 |
| रतनगड चढताना सांधण दरी, शिपणूर, घाटघर धरण व साम्रद गाव |
पुण्यातून
मी, निलेश, मंदार, मनोज, हिमांशू, सुनील, सागर, संजय, ब्रम्हानंद आणि इतर
अशी १२-१३ टाळकी ५ मार्च ला रात्री निघालो आणि थेट साम्रद गावात जाउन
पोहोचलो...पहाटेचे ४ वाजले होते.. तड्ख झोपी गेलो आणि सकाळी ६.३० वाजता
शिट्टी वाजल्यावर जागे झालो.. गुलाबी थंडी मूळे सगळे कुडकुडत होते. अर्ध्या
तासात तांबड फुटलं.. चहा नाश्ता झाला.. सगळ्यांनीच ट्रेक सुरु करण्याआधी
१.५ लिटर पाणी पिल्यामुळे पुढचे ३ तास तरी तहान लागली नाही.. हा ट्रेक
मुळात औघड असल्या कारणामुळे पाठीवर जास्त वजन घेऊन सर्वसामान्य सहभागींना
ट्रेक करणे अवघड होते. म्हणून जेवढे लागेल तेवढेच समान सोबत ठेऊन आम्ही
रतनगडाकडे रवाना झालो. साबळे मामा आज पूर्ण दिवसाचे नैतृत्व करणार होते..
 |
| रतनगड त्रिंबक दरवाजा |
रतनगड
आणि कात्राबाई करून कुमशेत मध्ये उतरणार होतो. पल्ला मोठा होता. पण पाठीवर
वजन नसल्याने माझ्यासारख्या नियमित भटक्याला जरास पिकनिक वाटत होतं.. ३
तासाच्या पायपिटी नंतर त्र्यंबक दरवाजात येउन पोहोचलो. छातीवर येणाऱ्या
पायर्या चढून आम्ही नेढ्यात जाऊन विराजमान झालो. नेढ्यामध्ये येणारा वारा
हा उन्हामुळे झालेली अंगाची लाहीलाही नाहीशी करत होता..समोरच घनचक्कर,
गवळदेव , आजोबा , खुटा, भंडारदरा परिसर आता अतिशय सुंदर दिसत होते. थोडी
विश्रांती झाल्यावर नेढ्यातून आता आम्ही रतनगडाच्या गुहेकडे निघालो..
उजवीकडे बाण सुळक्याचं तर समोर कात्रा-कड्याच रौद्र रूप बघून सारेच थक्क
झाले होते. त्यात सुरज ने बारा पायर्यांची वाट व कात्राबाई च्या घळीमधील
रांजण सुळकयाचे दुरून दर्शन घडवले.. कात्राबाई ची घळ बघून अंगावर शहारे
आले..मन अचंबित झाले..शेजारी भव्य आजोबा डोळ्याचे पारण फेडत होता..
 |
| रतनगड नेढ्यातून गुहेकडे जाताना |
आता ऊन चांगलच माथ्यावर
आला होतं.. तडख रतनगडाच्या गुहेत जाऊन पोटातील आग शमवली..जेवणानंतर अरुण
सरांनी कमालाच केली, अनलिमिटेड मठ्ठ्याचा आमच्यावर वर्षाव केला.. पहिला
राउंड, दुसरा राउंड करता करता ६-७ राउंड मध्ये सगळे गारद झाले..तरी अजून
अरुण सरांकडे ताकाचा बराच साठा शिल्लक होता. आता दुपारचे १.३० वाजले आता
आम्ही रतनगड उतरण्यास सुरुवात केली व ३ तासाच्या पायपिटीनंतर कात्राबाई
च्या खिंडीत येउन पोहोचलो..
 |
| कात्राबाई खिंडीतून डावीकडे अग्निबाण, समोर डावीकडून अलंग, साकीरडा, किरडा |
आमचा आचारी मुंबई वरून आलाच नाही असे कळल्यावर अरुण सर
कात्राबाई च्या खिंडीतून तडख खालती कुमशेत ला स्वयंपाकासाठी रवाना
झाले. खिंडीतून अर्ध्या तासातच आम्ही कात्राबाईच्या माथ्यावर आलो..माथ्यावरून शिपणूर, रतनगड,
खुटा, अलंग, मदन, कुलंग, साकीरा, किरडा, कळसुबाई, भंडारदरा, गवळदेव,
घनचक्कर, पाबरगड, आजोबा, हरिश्चंद्र, कोंबडा, नाफ्ता, कलाडगड परिसराचा
मनमुराद आनंद घेऊन झटझट परत खिंडीत येउन कुमशेत ला उतरलो..उतरायला तसा
अंधार झाला. संध्याकाळी ७.३० वाजता आम्ही कुमशेत च्या अलीकडे पोहोचलो. अरुण
सर व स्वागतोत्सुक श्वेता, भोरु हजर होते. चहा घेतल्यावर लोकांनी जेवणावर
ताव मारला...आणि अर्ध्या तासात सगळे जण घोरायला लागलो..
 |
| कात्राबाई च्या माथ्यावरून(पठार) आजोबा |
दिवस दुसरा,
आजच्या दिवशी आमचा आजोबा करून हरिश्चंद्र वर राहायला जायचा बेत होता. सकाळी सरांच्या हातचं चविष्ठ उपीट हादडल आणि ते पोटात सिमेंटसारखं विराजमान झालं..आता ४-५ तास तरी काही काळजी नव्हती ..ठाकरवाडी मधून आजोबा च्या सोमोरील डोंगराला वळसा घालून आम्ही आजोबा च्या पायथ्याला येऊन पोहोचलो.
 |
| गुहेरीचे दार आणि उजवीकडे करंडा |
सुरज
आणि अरुण सर वाट शोधत आम्हा सगळ्यांना सोबत नेत होते..खड्या चढाई ने ७०%
वर आलो आणि आता आजोबा च्या पोटातून उजवीकडे खोल दरी असलेला वळसा घालून
आजोबा च्या मधल्या पठारावर येउन पोहोचलो. मागीलाच आठवड्यात पावसाने कृपा
केल्याने आम्हाला आजोबा वरील रांजण-खळग्या मध्ये पाणी मिळाले..
 |
| रांजण खळगे आणि वर आजोबा |
इथून
अजून तासाभराच्या चढाई नंतर आम्ही आजोबा चा माथा गाठला..दुपारचे १२.३०
वाजले होते. माथ्यावर सगळ्यांनीच संत्र्याचा आस्वाद घेतला व संत्र्याची साल
फेकून न देता चेहर्याला आणि हाताला चोळली असता हाल उन्हामुळे हात काळे पडत
नाहीत अशी शिकवण अरुण सरांकडून मिळाली.. आजोबा वरून अजब नजारा
अनुभवला..ह्याला आजोबा का म्हणतात ह्याची आम्हाला खात्री पटली होती..खालती
ठाणे जिल्हा व शेजारी नगर अश्या देश आणि कोकणात पसरलेल्या आजोबा ला प्रणाम
करून आम्ही कुमशेत च्या ठाकरवाडी ला खाली उतरलो..ठाकरवाडीतून ३ किलोमीटर
पायपिटीनंतर कुमशेत ला पोहोचलो.संध्याकाळचे ५ वाजले होते..भूक मी म्हणत
होती..पुलाव ,पापड, कोशिंबीर, ताक असा बेत होता. अरुण सरांने श्वेताकडे
स्वयंपाकाची धुरा सोपवली होती..तिच्या हाताला कमालीची चव होती.. सुंदर असे
जेवण झाल्यावर आता आम्हाला दोन-तीन तासांची पायपीट करून पेठेच्या वाडीला
पोहोचायचे होते..बर्याच जणांच्या अंगात त्राण शिल्लक नव्हते.. मग अरुण सर
आणि इतर इच्छुक मंडळी मुळा नदीचे पात्र ओलांडून(उन्हाळा असल्याने नदीला
पाणी कमी असते) चालत पेठेच्या वाडीला गेले व उरले-सुरले १७ जण गाडीतून
पेठेच्या वाडीला पोहोचलो..बरीच रात्र झाली होती..आमची गाडी पेठेच्या वाडी
ला होती. पेठेची वाडी-पाचनइ-राजूर-कुमशेत असा वळसा मारून गाडीला यावे
लागणार होते.. रात्री पेठेच्या वाडी ला पोहोचलो आणि मटकी ची उसळ, पुरणपोळी
चा बेत जेवलो.. आता हरिश्चंद्र आम्हाला वेळेअभावी जमणार नाही हे कळून
चुकले. आज पाहिलेला भलामोठा आजोबा स्वप्नात आला नसता तरच नवल!!!!
 |
| रतनगड नेढ्यातून आजूबाजूचा परिसर |
दिवस तिसरा..
आता
आज आम्ही कलाडगड करून सादडे घाट उतरून केळेवाडी ला पोहोचणार होतो..
ठरल्याप्रमाणे तासाभरात आम्ही कलाडगडा वर पोहोचलो.. वाटेत किंचित कठीण
स्वरूपाचा कातळटप्पा पार करत माथ्यावर पोहोचलो. कलाडच्या भैरोबाचे दर्शन
घेतले.
 |
| कलाडगड |
कलाडगडावरून
नाफ्ता, निमगिरी, रोहिदास, नाणेघाट, जीवधन, ढाकोबा, मोरोशी चा
भैरवगड,वानरलिंगी, वर्हाडाचा डोंगर, हरिश्चंद्र चा बालेकिल्ला असा परिसर
न्याहाळला व खाली उतरलो..
 |
| नाफ्ता |
आता शेवटचा ६-७ तासांचा सादडे घाटाचा टप्पा उरला होता.. पेठेच्या वाडीतून १.३० तास चालल्यावर सादडे घाटाच्या मुखाशी येउन पोहोचलो
 |
| बैल घाट हरिश्चंद्र गड |
तोल
सांभाळत सगळे हळू हळू खाली उतरू लागले..घाटाचा तीव्र उतार व बारीक खडी हि
आता पायाचा निकाल लावत होती त्यात वरून सूर्यदेव आग ओकत होता..
सगळ्यांची
पायाची बोट आता शिजून निघाली होती.. सावली आली कि हायसे वाटायचे..त्यात
पाठीवर वजन..असा सगळा राडारोडा सांभाळत आमचा गोतावळा ५ वाजता केळेवाडीत
येउन पोहोचलो.. समोरच रोहिदास, कोकणकडा तर डावीकडे नाफ्ता ताठ मानेने उभे
होते.
 |
| नाफ्ता |
असा
एकंदर अवघड ट्रेक एकूण ३२ पुणे-मुंबईकरांने मोठ्या जिद्दीने पार
पाडला..केळेवाडी मधून आम्ही जेवयला एका नदीच्या आडोश्याला गेलो.. नदीमध्ये
पोहायचा मोह मात्र कुणालाही आवरला नाही. परत एकदा श्वेता आणि सागर ने
अफलातून छोले उसळ, खीर, वरण, भात असा साग्र-संगीत बेत आखला होता. अरे कधी
चिकन, मटकीची उसळ, पुरणपोळी, छोले, खीर, संत्री आम्ही ट्रेक ला आलोय कि
पिकनिक ला तेच उमजत नव्हते.. आता संध्याकाळचे ७ वाजले होते..अरुण सर घाई
करत होते कारण ट्रेक सहभागी झालेल्या मुली ह्या रात्री १० वाजायच्या आत घरी
पोहोचायला हव्यात असा त्यांचा अट्टहास होता. आता निघायची वेळ आली होती..
सगळे जण एकमेकांना गळाभेट करून राम-राम करत होते.. परत कधी भेट होइल याची
खात्री नाही म्हणून फेसबुक वर आहेस का रे अशा चर्चांना वाव आला..ट्रेक
मध्ये सुंदर आठवणी उराशी बाळगून आम्ही पुणे-मुंबईकर आपापल्या दिशेने घराकडे
रवाना झालो.