Sunday, May 3, 2026

सुमार, महिपत ची रसाळ भटकंती

 https://trekhunt.blogspot.com/2017/06/blog-post.html








थंडी, ऑफबीट ट्रेक, त्यात सोबत जिवाभावाची मंडळी म्हणजे एकूणच दुग्धशर्कारा योग. एखाद्या जातिवंत भटक्याला अजून तरी काय हवं असतं हो?? त्यात एखाद्या ट्रेक ची गेली कित्त्येक वर्ष वाट पाहणारा अवलिया, ट्रेकची वेळ आली कि तो ट्रेक करण्यासाठी आतुर होतो, मग विकीमॅपिया, गुगल मॅप, ट्रेकक्षितिज, डोंगरयात्रा, चढाई उतराई, सांगाती सह्याद्रीचा अशा विविध ठिकाणहून माहिती गोळा करण्यास सुरुवात करतो, अन अखेर मोहीम आखणी पूर्ण होते. अशाच प्रकारे या थंडीतली "ऑफबीट" मोहीम निघाली ती सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून थोडी खाली असलेल्या रसाळ - सुमार - महीपत कडे. हे किल्ले रत्नागिरी जिल्ह्यात येतात. कोकणातले डोंगरी किल्ले म्हणजे शरीराची अक्षरशः लाही लाही होणार हे कळून चुकले होते. ह्या किल्ल्यांवर फारसं कुणी भटकत नाही त्याचे मूळ कारण म्हणजे श्रेणीने कठीण व प्रचंड जंगल. गावकर्यांच्या मदतीशिवाय वेडे धाडस करणे इथे महागात पडते आणि जिथे खरंच गरज आहे तिथे वटाड्या घेण्यात लाज ती कसली?? 





रसाळगड व् कोकणातील छोट्या वाड्या
प्रसाद वाघ ने ह्या किल्ल्यांची पायलट मोहीम आखली. बराचसा सह्याद्री, ऑफबीट घाटवाटा, किल्ले, प्रस्तरारोहणाचे कौशल्य असणारा प्रसाद आमच्या मोहिमेचा चमू होता. माझी आणि प्रसाद ची भेट ३१ जानेवारी २०१६ लिंगाण्याच्या वेळेस झाली.१६ डिसेंबर २०१६ रोजी आमची १७ जणांचा गोतवळा रसाळवाडी कडे मार्गस्थ झाला . पुणे - ताम्हिणी - माणगाव - महाड - पोलादपूर - कशेडी - तळे  मार्गे पहाटे  रसाळवाडीत पोहोचलो. मार्गशीर्षाचे दिवस चालू होते, पौर्णिमा अगदी उंबरठ्यावर असल्याने "तोच चंद्रमा नभात" आपले अस्तित्व झळकावत मोठ्या दिमाखात वावरत होता.





अंतराळ पिठूर चांदण्याने व्यापून गेले होते. मृग, कृत्तिका, सप्तर्षी अशा नाना तर्हेच्या नक्षत्रांचे देणे आम्हास लाभले होते. देशवारुन कोकणात आल्यामुळे थंडी तशी फारशी जाणवत नव्हती परंतु वातावरणात किंचितसा गारवा जाणवत होता. खेड सोडल्यावर त्या वळणदार छोट्या रस्त्यावरून आमची गाडी रसाळवाडी पाशी पोहोचली. तांबडं फुटायला अजून अर्धा तास होता तोपर्यंत मी, प्रसाद, निलेश, ब्रम्हानंद, श्री अशी ४-५ कधीही शांत न बसणारी टाळकी चुलीसाठी लाकडं गोळा करायला गेलो, चांगली ४-५ किलोभर जाड लाकडं आता पेट घेऊ लागली होती, मस्तपैकी विस्तव तयार झाला. तिकडे मंडळी चहा-पोह्या च्या तयारीत गुंतलेली असताना मी अन प्रसाद रसाळवाडी गावात महीपत पर्यंत कुणी वाटाड्या मिळतोय का हे पाहण्यासाठी रवाना  झालो. "गजानन जाधव" ह्याच्या वडलांना आधी विनवणी केली परंतु त्यांनी साफ नकार दिला. मग गजानन ला अर्धा तास विनवणी करत शेवटी त्यांचा होकार घेऊनच आम्ही एखाद्या विजयी उमेदवारासारखे चुलीपाशी परतलो. न्याहारी झाल्यावर तडख आमचा मोर्चा आजच्या पहिल्या किल्ल्याकडे म्हणजेच रसाळगडाकडे निघाला. १५-२० मिनटात नुकत्याच बांधून काढलेल्या पायऱ्यांवरून २ दरवाजे ओलांडत गडमाथा गाठला. 

झोलाई देवीचे मंदिर अणि दीपमाळ 
झोलाई देवीच्या मंदिराकडे पाठ करून उभे राहिले असता किंचित उजव्या हाताला वाडी बीड गाव, पर्बत, चकदेव आंबिवली घाट, मंदिराच्या मागच्या बाजूला निमणी, झापड वाडी, भरडे, सुतारवाडी अशा कोकणातल्या अनेक छोटया मोठ्या वाड्या नजरी पडल्या. उजव्या हाताला असलेलं घनदाट जंगल पाहून चटकन कोल्हापूर जिल्ह्यातील पारगड किल्ल्याची आठवण झाली. किंचित डाव्या हाताला  मान वर काढलेला मधू-मकरंद, जावळीचा मुलुख डोळ्याचे पारणं फेडत होता. रसाळगडाचा पसारा आटोपशीर असल्याने माथा फिरण्यास अर्धा तास पुष्कळ ठरला. माथ्यावर १६ तोफा, झोलाई देवीचे मंदिर, दीपमाळ, तुळशी वृंदावन, छोटासा असलेला बालेकिल्ला, बालेकिल्ल्यावरचे वाड्याचे अवशेष, धान्य कोठार, २ तलाव, पाण्याची टाकी ह्यावरून पूर्वीच्या काळी ह्या किल्ल्यावर बरीच वस्ती असल्याचे लक्षात येते.

रसाळगडावरील तोफ 
सकाळचे साधारण ८.४५ वाजत आले होते, लोहगोल हळू हळू वर सरकत होता. पाठीवर वजनदार सॅक घेऊन आमचा गोतावळा ९ च्या सुमारास सुमार गडाकडे निघाला. उत्तरेकडचा सुमारगड अजून साडेचार तासांवर होता, रसाळवाडी सोडल्यावर १० च मिनटात छातीवर ची चढाई सुरु झाली, चढाई हळू हळू तीव्र होत गेली. वाढणारे ऊन आणि तीव्र चढाई अस गणित पुढचा तासभर तरी सुरु राहिलं. चढाईवर असलेल्या वाळलेल्या गवंतामुळं पायाची आपली घसरगुंडी चालू होती.
सुमार गडाकडे जाताना  
सकाळचे १०.१५ वाजले होते, विश्रांतीची थोडी आवश्यकता होतीच. २० मिनिटांच्या विश्रांती नंतर पायपीट पुन्हा सुरु झाली. परत एकदा छातीवर चढ पार करून आता जरा एक फुटी रुंदीच्या ट्रॅव्हर्स कडे हळू हळू सरकू लागलो, उजव्या वाजूला तीव घसारा व अरुंद वाट हे समीकरण मोठ्या एकाग्रतेने सोडवत आमचा मोर्चा आता हळू हळू एका झापाकडे वळू लागला.
इथे  चुकिला माफ़ी नहीं 
आता सकाळचे ११.३० वाजले होते. गेले अडीच तास वाटेत सावलीच नसल्यामुळे ह्या झापामधल्या शीतल छायेत विसावा घेताना एक वेगळाच आनंद मिळत होता. 
दमलेले चेहरे
सुमारगड अजून २ तासांवर होता.  ह्याच्या पुढचे २ तास मात्र सुखावह होते. घनदाट जंगलातल्या पायवाटेवर फक्त पाचोळ्याचे आवाज येत होते. वाट तशी झाडाझुडुपातुन असल्यामुळे उन्हाचा त्रास आता जाणवत नव्हता. 
हा खेळ उन सावल्यांचा!! 
सुखावह अशा असणाऱ्या वाटेवर "बांबू पिट वायपर" ने आमची वाट आडवली, त्याच्या वाटेल कुणीही न जाता शांतपणे दुसऱ्या वाटेने जायचा निर्णय आम्ही घेतला, कारण हे जंगल त्याच घर आहे आणि आपण पाहुणे.

बाम्बू पिट वाइपर (चापड़ा)
 दुपारचे १२.३० होत आले होते, आणि आता आम्ही पठारावर पोहोचलो. समोरच ताठ मानेचा सुमारगड मोठ्या दिमाखात उभा होता. १.३० च्या सुमारास आम्ही महीपत-सुमार च्या खिंडीत जाऊन पोहोचलो. 
अजस्त्र सुमार
आता भूक मी म्हणत होती. चटण्यांचा व ठेच्याचा खमंग वास जिभेचे चोचले पुरवत होता. पोटाची आग शमवल्यावर आता अवघड अशा सुमारगडाकडे आम्ही कूच केली. खिंडीतून घसारायुक्त वाटेने सुमार च्या खालच्या पठारावर येऊन दाखल झालो. सरळसोट सुमार,आपल्या नावाप्रमाणेच सुमार आहे. "उगवतीच्या कड्यावर एका झाडाला धरून वर येंगाव लागतं." असा गोनीदांनी या किल्ल्याबद्दलच्या वर्णनात म्हटलेले आहे. किल्ल्यावर जाणारी अवघड वाट व जंगल यामुळे हा किल्ला फारच दुर्लक्षित राहिलेला आढळतो, परंतु याच वर्षी गावकर्यांनी सुमार चा रॉक पॅच शिडी बसवून सुरक्षित केला आहे. 
सुमारगडावरील शीडी 
परंतु कातळ पोटातल्या अवघड ट्रॅव्हर्स वरती मात्र चिंचोळ्या वाटेवरून शिडीपाशी पोहोचावे लागते.
बुडाचे महत्व :) 


शिडी पार करून वर गेल्यावर छोटीशी गुहा, गुहे मध्ये एक वीरगळ आढळते, तिथून पुढे २ मोट्ठी पाण्याची टाकी, एक छोट पिण्याच्या पाण्याचं टाकं, गुहा, शंकराची पिंड, थोडं वर गेल्यावर एक खांब टाकं, थोडी फार जोती एवढाच काय तो अवशेष साठा आढळतो. 

सुमार गडावरील टाक 
आल्या वाटेने हळू हळू सुमार उतारायला सुरुवात केली, कोकणात उतरणाऱ्या त्या डोंगरांच्या सोंडा, माजलेलं गवत, चिंचोळी पाऊलवाट, घनदाट जंगलाचं अभेद्य अस कवच, वरून रणरणतं ऊन, अवघड वाटेवर लावलेली शिडी, पश्चिमेला कोकण तर पूर्वेला देशावर अस्ताव्यस्त पसरलेली सह्याद्रीची मुख्य रांग, जावळीच्या खोऱ्यातली ती निरव शांतता, प्रतापगडाच्या रक्षक मधू-मकरंद चे दिसणारे मनमोहक रूप, पुसट अशी दिसणारी महाबळेश्वर ची रांग... अशा ह्या आडवाटेवरच्या परंतु सह्याद्री आणि कोकणाची साद घालणाऱ्या ह्या सुमार गडावर फार कमी भटके फिरकतात ह्याचे काय ते दुःख आहे. आता साधारण दुपारचे ४ वाजत आले होते, आणि संध्याकाळी ७ वाजेपर्यंत महीपत च्या मंदिरात पोहोचायचे असे प्रयोजन होते. ह्या खिंडीपासून उतार असल्यामुळे आता जरा हायसे वाटत होते. जंगलातून बाहेर पडल्यावर आम्हाला एका वेगळ्याच विश्वात आल्याचा भास झाला. झपझप पाऊलं टाकत आता आम्ही वाडी बेलदार च्या खाली असलेल्या ओढ्या पाशी येऊन पोहोचलो. साधारण अर्धा तास विश्रांती ची नितांत गरज होती. पायाची बोटं व पाठीवरची सॅक हि जणू शरीराला जडलेली व्याधी आहे अशी खात्री पटत होती. पायाची बोटं तर काही विचारू नका, ती इतकी शिजून निघाली होती कि अलगद सुरु लावली असता हळूच तुटून पडावीत. आता आमचा गजानन वाटाड्या इथपर्यंतच आमचा साथीदार होता. 





त्याने आता आमची राया भंडारी(धनगर) ह्या इसमाशी गाठ घालून दिली. साधारण ७० च्या आसपास झुकलेलं वय, खेडेगावा कडचा टिपिकल सडपातळ बांधा, काळाकभिन्न चेहरा, डोक्यावर अर्धी केलेली माकडटोपी, अंगावर शाल, अर्धी विजार, पायात कधीच्या काळी घेतलेली फटफट वाजणारी चप्पल, हातात काठी, वर्षानुवर्षे जावळीच्या भागातल्या डोंगरदऱ्यात भटकणारा असा हा अवलिया. राया आम्हाला पूर्ण किल्ला दाखवणार होते.

राया 
छातीवरचा चढ पार करीत आम्ही वाडी बेलदार च्या वर च्या लाईट पोल पाशी येऊन पोहोचलो. लोहगोल अस्ताला जात असताना अवकाश तांबूस करून गेला, निरनिराळ्या छटा अवकाशात उमटत होत्या, हात फोटोंसाठी शिवशिवत होते परंतु अंगात त्राण नसल्यामुळे ते क्षण लोचन समर्पित करून महीपत च्या जंगलात प्रवेश केला, आता पुढल्या ५ -१० मिनटातच काळोखाने उजेडावर मात केली व आम्ही महीपत च्या मंदिरात जाऊन विराजमान झालो. 

पारेश्वर मंदिर 
जंगलाच्या मध्यावर असलेल्या पारेश्वर मंदिरावर आता काळोखाची शाल पांघरली होती. हवेत गारवा जाणवत होता, मधूनच एखादी वाऱ्याची झुळूक आता मंदिरात शिरून हुडहुडी आणत होती. प्रसाद आणि निलेश ने पिठलं - भाताचं म्हाउंद घाऊन समस्त ट्रेकर जनतेस आकंठ तृप्त केले. एवढं चविष्ट जेवण झाल्यावर आता हळू हळू घोरण्याचे आवाज कानी पडू लागले
सकाळचे ६ वाजताच प्रसादाच्या हाकेने सगळे जण जागे झालो. सगळा राडारोडा आवरत ७ च्या सुमारास महीपत चे दर्शन घेण्यास आमची पाऊल पुन्हा चालू लागली. जंगलात हरवलेली एक न एक पायवाट राया मोठ्या कौशल्याने शोधात होते, थोडा चढ चढून गेल्यावर एका बाजूला कोकणात सरसोट तुटलेले कडे तर दुसऱ्या बाजूला देशावरचे विहंगम दृष्य, सुमार चे टोक, महाबळेश्वर, मधू-मकरंद, वडगाव, हातलोट चा घाट, घोणसपूर, सह्याद्रीची मुख्य रांग असा चौफेर प्रदेश नजर पडत होता. 



हा नजारा पाहिल्यावर आम्ही यशवंत दरवाज्याकडे पाऊल वळवली, तो पाहून झाल्यावर आम्ही कोतवाल बुरुजाच्या दिशेने कूच केली. घनदाट जंगलातल्या पाऊलवाटेने १५ मिनटात कोतवाल बुरुजा पाशी पोहोचलो. कोतवाल बुरुजावरून दिसणारा नजारा हा मनमोहक आहे. महीपत गडावरचे सर्वच अवशेष हे गर्द झाडीत हरवून गेल्यामुळे त्याचा शोध घेणे खरंच गरजेचे आहे. १२० एकर मध्ये पसरलेला हा किल्ला गर्द झाडीत हरवला आहे. ह्या किल्ल्याला एकूण ६ दरवाजे आहेत: लालदेवडी दरवाजा, पूर्वेस पुसाटी दरवाजा, दक्षिणेकडे खेड दरवाजा, पश्चिमेस शिवगंगा दरवाजा, उत्तरेकडे कोतवाल दरवाजा, आग्नेयेस यशवंत दरवाजा आहे. सद्य…स्थितीला हे सर्व दरवाजे होते परंतु कालानुरूप गर्द झाडीत हे दरवाजे स्वतःचे च अस्तिस्त्व शोधू पाहत आहेत. परतीच्या वाटेवर वाडी बेलदार कडे उतरताना शिवगंगा बुरुज नजरेस पडतो. वाडी जैतापूर ते वाडी बेलदार असा कच्च गाडी रस्ता वाडी बेलदार च्या अगदी जवळपर्यँत येऊन पोहोचलेला आहे, कदाचित पुढच्या वर्षी पर्यंत रस्त्याचे काम पूर्ण होईल. आम्ही वाडी बेलदार ला न जाता मधल्या पाय वाटेने वाडी जैतापूर ला उतरलो. थोड्या तीव्र अशा उतारामुळे २ दिवस सरळ रेषेत पडणारी पाऊल आता फुरश्या सारखी गिरकी घेत पडत होती...बऱ्याच वर्षांपूर्वीचे जावळीच्या खोऱ्यातील रसाळ - सुमार - महीपत चे स्वप्न अखेर पूर्ण झाले. कोकणातल्या सागरी किल्ल्यांप्रमाणेच गर्द झाडीत हरवलेल्या गिरिदुर्गांकडे हि आपण लक्ष देणे हे तितकेच गरजेचे आहे.

मकरंद 

No comments:

Post a Comment

सुमार, महिपत ची रसाळ भटकंती

 https://trekhunt.blogspot.com/2017/06/blog-post.html थंडी, ऑफबीट ट्रेक, त्यात सोबत जिवाभावाची मंडळी म्हणजे एकूणच दु...