Wednesday, May 20, 2026

किल्ले बहुला.

 आयुष्यात पाहिल्यांदा आपल्या आर्मीला घाबरून जीव मुठीत धरून केलेला एक अविस्मरणीय ट्रेक - किल्ले बहुला.
  ✍️ मेघन तारिहाळकर पाटील
(चौफेर भटकंती सह्याद्रीच्या कुशीत)
 ● या किल्ल्यावर जाण्याचा प्रवास जितका रोमांचकारी आहे त्याहून तिथून मूळ रस्त्यावर येईपर्यंतचा प्रवास भयंकर आहे त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. अनेकांना हा किल्ला माहीतही नसेल, किंवा कधीच याबद्दल ऐकलं-वाचलं नसेल. या किल्ल्यावर खूप कमी प्रमाणात ट्रेकर्स वळतात. कारण या किल्ल्यावर जायला सक्त मनाई आहे.  का मनाई असेल बरं या किल्ल्यावर?? चला तर मग जाणून घेऊयात या अपरिचित किल्ल्याच्या भटकंती बद्दल .
●  नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील एक दुर्लक्षित व दुर्गम गिरिदुर्ग बहुला.. हा देवळाली डोंगर रांगेत येतो. किल्ल्याच्या परिसरात गुळने, आंबेबहुला, राजूरबहुला, देवळाली अशी गावं आहेत. थळघाटाच्या पुरातन व्यापारी मार्गावरील हा सातवाहन कालीन टेहळणीचा किल्ला आहे. या किल्ल्याची उंची जवळपास ३१६० फूट इतकी असून किल्ल्याचा माथा खूपच लहान निमुळता आहे. जेमतेम किल्ल्याचे गडपण हे सुकलेले टाके, बुरुज व काही ठिकाणी तटबंदीच्या अवशेषातून दिसून येते.  पण ज्याने हा किल्ला पाहिला असेल त्याने, वाह हा तर हरिहर पेक्षाही भयंकर आहे असे उदगार नक्कीच काढले असतील. किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणजे पश्चिमेला किल्ल्याच्या कातळात खोदलेल्या थरारक पायऱ्या होय. या पायऱ्या हरिहर किल्ल्याच्या पायऱ्यापेक्षाही खूपच थरारक आहेत. प्रारंभी पायऱ्यांच्या खोबण्याही हरिहरपेक्षा वेगळ्या आहेत, त्या बाजूच्या दगडी भिंतीत आहेत.  मी जेव्हा बहुल्याच्या पायऱ्यांपाशी आलो तेव्हा मनात वाटून गेलं की, "उगाचच लोक हरिहरवर इतकी गर्दी करतात. हा दुर्लक्षित बहुला तर त्याहुनी सुंदर व थरारक आहे."  पश्चिमेला गडाच्या पोटात काही लेणी खोदलेल्या असून त्यांचा वापर सैन्यास राहण्यासाठी केला जात असावा. उत्तरेला मूळ गडाच्या बाहेर असणाऱ्या बुरुजाचा पाया दिसतो. येथे भल्या मोठ्या दगडांमध्ये गोलाकार बुरुजाच्या पायाचे दगड बसविण्यासाठी खोदलेले चौकोनी खड्डे दिसतात. लष्करी तोफांच्या दररोजच्या माऱ्यामुळे किल्ल्यावरील सर्वच अवशेष जवळपास नष्टच झाले आहेत. किल्ल्याच्या परिसरात पायथ्याला भवानी मंदिर,  विरगळी, समाधी व अवशेष आढळतात. त्यामुळे येथे नक्कीच लढाया झाल्या असाव्यात. गडावरुन औंढा ते कळसूबाई पर्यंतचा प्रदेश दृष्टीक्षेपात येतो. महांकाळ डोंगर, औंढा, पट्टा, बितनगड, शेणीत सुळका, पश्चिमेला अलंग-मदन-कुलंग, कळसूबाई, वायव्येला गडगडा, डांग्या सुळका. उत्तरेला अंजनेरी व रांजणगिरी व पलीकडे ब्रह्मगिरी पर्वत इतका पसारा नजरेसमोर येतो. किल्ल्याचा काळ सांगायचा झाल्यास खोदीव लेणी, टाक्या व खोदीव पायरीमार्ग पाहता किल्ला सातवाहन कालीन असल्याचे जाणवते. किल्ला जरी दुर्लक्षित व छोटासा असला तरी नाशिकमध्ये आपले एक वेगळे स्थान जपून आहे. 
● आज ट्रेकचा ५ वा दिवस होता. रामशेज वरून परतताना अचानक माझ्या डोक्यात बहुलाचं प्लॅन झालं. बहुलावर जायला परमिशन नाही, कारण हा किल्ला व परिसर आर्मीच्या ताब्यात आहे. पायथ्याशी देवळाली आर्मी कॅम्प आहे, आणि त्यातही महत्वाचं म्हणजे बहुला किल्ला हा आर्मीच्या आर्टिलरी फायरिंग रेंज मध्ये येतो. त्यामुळे रविवार सोडलं की बाकीचे दिवस ट्रेनिंगचा एक भाग म्हणून बहुला किल्ला व बाजूच्या डोंगरावर फायरिंग चालू असते. जरी रविवारी फायरिंग बंद असले तरी आठवडाभर तोफेतून उडालेले आधुनिक तोफ गोळे(बॉम्ब )कधी स्फोट होतील सांगता येत नाहीत. याच कारणामुळे बहुलावर जाण्यास सक्त मनाई आहे. रविवारी आर्मीची गस्त असते, जर गस्तीवेळी आर्मीच्या हाती सापडल्यास त्यांचा मार खाणे, दंड व कायदेशीर कारवाई झालीच म्हणून समजा. दुसरी गोष्ट म्हणजे गुगल मॅपवर या किल्ल्याचे स्थान वेगळीकडे दाखवते कारण आर्मीची गुप्तता, त्यामुळे किल्ला नेमका कुठं आहे हे आमच्या ग्रुपमध्ये फक्त मलाच माहिती होतं.
        ट्रॅव्हलर नाशिक -मुंबई हायवे वरच थांबवून सर्व १४ जण उतरलो. आर्मीने किल्ल्याच्या परिसरात सर्वत्र काटेरी झुडपे वाढवली आहेत. ११ वाजून गेले आम्ही ट्रेकला सुरुवात केली. गड म्हणून मॅप वर दिसतो तो समोरचा पहिला डोंगर, या डोंगराच्या पहिल्या टप्प्यावर काळभैरवाचे मंदिर आहे. ट्रॅव्हलर हायवेलाच लावून तिथूनच सुरुवात केली, हायवे पासून हा पहिला डोंगर बराच लांब आहे. सर्वजण चालत चालत डोंगराच्या पायथ्यापाशी आलो. तिथे एक लहान मुलगा व आई बाबा भैरवाच्या मंदिरात जाऊन खाली उतरून आले होते. त्यांच्या जवळ जेवणाची पिशवी होती. वरच जेवण करून ते तिघे खाली उतरले होते. आम्ही 4 जण मागे होतो बाकीचे अर्ध्यावर जाऊन पोचलेही होते.  त्यांना मी किल्ल्याबद्दल विचारलं, किल्ला अजून खूप लांब आहे असं सरळ जावा मंदिर लागेल तिथून पुढे उतरून गेल्यावर तलाव लागेल तिथून सरळ जावा असं त्यांनी सांगितलं व ते पुढे गेले. आम्हीही निघणार तोच त्या ताईंनी ओरडल, आम्ही थांबलो. त्यांनी आपल्या जवळील एक भरलेली पाण्याची बाटली माझ्याकडे दिली. मी ती धन्यवाद म्हणून गप्प घेतली. बाकीचे लोक जरा शंकेने पाहू लागले समोरच तर गड आहे, तरी काळजीने दिली असावी म्हणून डोंगर चढू लागले. पण त्यांनी पाण्याची बाटली का दिली हे मला समजलं होतं. आम्ही सर्वजण भैरव मंदिरात आलो. तिथे नमस्कार करून सोबत असलेले द्राक्षे, संत्री व देवळात फोडलेला अर्धा नारळ खात बसलो होतो इतक्यात एक वयस्कर काका दिवा लावण्यासाठी मंदिरात आले होते. मागणी मागितल्यास हा काळभैरव ती पूर्ण करतो, पण पूर्ण झाल्यावर परत इथे दर्शनाला यायला लागते असे ते तिथली माहिती सांगू लागले. गड कुठं आहे असे विचारताच या डोंगराच्या पलीकडे आहे असे ते म्हणाले. एव्हाना काहीजणांनी समोरील मोठा डोंगर अर्धा चढून संपवला होता. दिवाबत्तीसाठी आम्ही त्या काकांना काही पैसे देऊन तिथून निघालो. मार्च महिना संपत आलेला उन्हाच्या झळा खूप बसत होत्या. आम्ही डोंगर चढून वर येईपर्यंत बाकीच्या मुलांनी संपूर्ण डोंगर पालथा घातला. 
        कसला किल्ला हा एक दगड पण नाही या पेक्षा तो मागच्या वर्षीचा सिंदोळा बरा होता असे उदगार मुलांनी काढले. मी म्हणालो अरे खूप भारी किल्ला आहे, हरिहर सारख्या पायऱ्या आहेत चला दाखवतो..  आम्ही डोंगराच्या दुसऱ्या टोकावर आलो. कुठं हाय रे किल्ला.... बोट करून दाखवलं तो बघा किल्ला. सर्वांनी तोंडात बोटं घातली. आम्ही पहिल्या डोंगरावर होतो, तर किल्ला होता खूप खूप दूर. सहा-सात डोंगर पार करायचे होते. प्रत्येक डोंगर अर्धा चढायचा-उतरायचा मग आम्ही किल्ल्यावर पोचणार होतो. मी म्हणालो, कळलं का त्या ताईंनी पाण्याची बॉटल का दिली ते.??? सारेजण हसले... सोबत जेवण नव्हतं पुरेसं पाणी नव्हतं, सर्वांनी यायला नकार दिला. मी म्हणालो मी तरी किल्ला बघायला आलोय मी जाणार तुम्ही बाकीचे गाडीकडे जाऊन बसा. माझ्यासोबत आणखी तिघेजण यायला तयार झाले. मी मंगेश, आकाश व विशाल चौघेजण बहुला सर करायला निघालो. इथून तिथपर्यंत डोंगर सोंडेवरून जायचे इतकेच आम्हाला माहीत होते. मध्ये पायवाट कशी असेल, असेल तर की नाही हे काहीच माहीत नव्हतं कारण ही गडाची मुख्य वाट नव्हती. मुख्य वाट ही आंबेबहुला गावातून व दक्षिणेकडून होती. (टीप- या दोन्ही सोप्या व जवळील वाटा आहेत.) आर्मीवाल्यांच्या हाती सापडू नये म्हणून या आडवाटेने आम्ही निघालो होतो. समोर जे दिसत होतं ते सगळं फसवं होतं हे पुढे पुढे जाईल तसं आम्हाला कळणार होतं. प्रारंभी बघितल्यास दोनच उंच सुळके दिसत होते व तिसरा सुळका म्हणजे बहुला (पहा फोटो, डोंगर क्र. ४,५ व ७) ... पण प्रत्यक्षात हे सारं फसवं होतं.  आम्ही २ डोंगर धरले होते, पण जेव्हा सात मधील दुसरा डोंगर पार केला तेव्हा त्या पुढे (शिवपिंडी डोंगराआधी) आणखी एक डोंगर लागला.  तोही चढून उतरून आम्ही एका खिंडीत पोचलो. खिंडीत दोन्ही बाजुंनी आलेले दोन मार्ग होते. समोर आता तीन बाजूला तीन पायवाटा होत्या. 

























            आता इथून एकतर समोरील शिवपिंडी आकाराचा डोंगर चढून वरूनच किल्ल्यावर जायचं. नाहीतर उजव्या हाताला खाली उतरून दक्षिणेकडून पूर्ण वळसा घालून किंवा डाव्या हाताला खाली उतरून जमिनीवरून उत्तरेकडून जायचं. इथून पुढचं मलाही माहीत नव्हतं पण वरूनच जाता येईल असे मला वाटत होते त्यामुळे मी मार्गाची रेखी केली व वरूनच जायचं ठरवलं. तिथं थोडावेळ पाणी पिऊन उठलो व तीन दिशांचे प्रतिनिधित्व करणारे  तिघांनी हातावर हात ठेवून लपंडावसाठी जसं छापतात तसं छापलं.  पण शेवटी वरच्या वरच किल्ल्यावर जायचं हे पक्क करून आम्ही निघालो. कमरे एवढ्या उंच सुकलेल्या गवतातून काठी आपटत मार्ग काढीत निघालो, शिवपिंडी डोंगर आम्ही सर केला. (दुरून डोंगराच्या माथ्यावर नैसर्गिक शिवपिंडी असल्यासारखे दिसते म्हणून मी याला हे नाव दिले आहे.) येथून पुढे जायला वाटच नव्हती. शिवपिंडीच्या मागील बाजूने उतारावरूनच डाव्या बाजूला दगडांना हात धरत आम्ही त्याबाजूला पोचलो. कोठेच वाट नव्हती, वाट करत करत आम्ही समोरील ५ व्या डोंगरावर पोचलो. या सर्व डोंगरांच्या माथ्यावर भले मोठे दगड आहेत. दरीच्या कडेकडेने डाव्या बाजूच्या डोंगराचा आधार घेत आम्ही मार्गक्रमण करीत होतो. एकेक ठिकाणी आधाराला काहीच नव्हते, जर तोल गेला तर सरळ दरीत.  हातापायाला काटे टोचत होते. आम्ही हा ५वा डोंगर चढून पुढच्या दिशेला आलो तोच समोरचे दृष्य पाहून दुरून डोंगर साजरे असेच वाटू लागले. इथं येईपर्यंत ५ वा डोंगर व बहुला किल्ला यामध्ये आणखी एक डोंगर आहे हे आम्हाला माहीतच नव्हतं. कारण दुरून हे दोन्ही डोंगर माथे एकच असल्याचा भास होतो. इथून पुढचा परिसर आर्मीच्या फायरिंगमुळे उध्वस्त झाला आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत व येथील माती आणि दगड फायरिंगमुळे ठिसूळ बनले आहेत. 
        आता पर्यंत आम्ही डोंगरांच्या मागील बाजूने उजव्या बाजूला दरी ठेवून चालत आलो होतो. काही ठिकाणी घसरगुंडी होत होती तर काही ठिकाणी पोटरी दुःखेपर्यंत चढ लागत होता. इथून पुढे जाण्यासाठी वाट नव्हती. काटेरी झुडुपातून चालून कातडी चुरचुरत होती. उन्हाळा असल्याने सर्व डोंगर भकास झाले होते, धुळीने चेहरा मान माखले होते. वाट नसल्याने पुढे डाव्या बाजूला दरी ठेवून दरीतूनच जायचे ठरवले. आता आम्ही आर्मी कॅम्पच्या दिशेने चाललो होतो, अन् आम्ही कोणाच्यातरी नजरेस  पडलोच. खालून ओरडण्याचे आवाज येऊ लागले. पण आम्ही त्यांना काहीच उत्तर न देता मार्गक्रमण करत राहिलो. संध्याकाळ होत आली होती अंधार पडायच्या आत गड गाठणे जरुरीचे होते कारण इथून आलो त्या मार्गे जाणे आता अंधारात कठीण होते. मुरूमाड मातीच्या डोंगराच्या पदारातून आम्ही आडवे जात होतो. माझे जे ट्रेकिंग बूट आहेत ते दगडांवर उत्तम ग्रीप पकडतात. त्याला छोटे छोटे बटन्स आहेत. पण मातीवर घसरतात आणि हेच मला खूप त्रास देऊ लागलं. दरीत कोठेही आधार नव्हता संपूर्ण मातीचा उतार होता, चालता चालता अचानक  पाय सररर करून घसरायचा अन् छातीत एकदम धस्सस व्हायचं. खालून आम्हाला ओरडण्याचा आवाज येत होता. मी सर्वात मागे होतो. पुढचे दोघे तर माझ्या दृष्टीक्षेपाच्या पुढे गेलेले. माझ्या समोरील ५० ६० फुटावरील विशाल इतकाच मला दिसत होता. आता अनेक ठिकाणी आर्टिलरी फायरिंग मुळे तोफगोळे फुटून मोठे मोठे खड्डे पडलेले दिसत होते आणि फुटके गोळे सुद्धा.. दूरवरून कुठून तरी फायरिंगचा आवाज येऊ लागला पण आज रविवार होता त्यामुळे दुसरीकडे कोठेतरी फायरिंग चालू असावं. 
        माझ्या बूट मुळे मी सावधपणे पाऊले टाकीत होतो. आता आम्ही अशा टप्प्यावर येऊन पोचलो होतो जिथून पदारातून आडवे न जाता आता मातीतून थेट उभं चढायचं होतं. डोंगराला लगट करून मी वर चढू लागलो. बाकीच्या दोघांनी पुढून डोंगर पार केला होता. माझ्या समोर विशाल होता तो ही थेट वर चढला. आमचा दोर सुद्धा गाडीतच राहिला होता. ही मातीची सरळसोट चढण अक्षरशः डोंगरावर मी झोपून चढत होतो. चढताना एकेक पाऊल सावधपणे ठेवावे लागत होते कारण माती कधी घसरले आणि आपण मागील बाजूला दरीत कोसळू अशी परिस्थिती होती. आणि उतारावर एकही झाड नव्हतं दरीत पडल्यास मध्ये कोठेही आधार नव्हता. त्यामुळे घसरलं की सरळ खालीच..... 
         अंधार व्हायच्या आत डोंगर पार करणे जरुरीचे होते.. आता इथून माघार नाही. आयुष्यात पाहिलेंदा मला आई बाबा आठवू लागले, घरच्यांची व मित्रांचे चेहरे आठवू लागले. अन् पहिल्या डोंगरावरील वेताळाला नमस्कार केला की बाबा सुखरूप किल्ल्यावर पोचव रं. त्यात मी सारखं घड्याळाकडे पाहत होतो. ६ वाजत आले होते.   हुश्श... तोल सांभाळीत कसाबसा हा उतार पार केला कपडे तोंड सगळं धुळीने माखलं होतं. आता दगडी टप्पा पार करायचा होता. मी माझी काठी जोरात विशाल कडे वर फेकली. रॉक पॅच खूप मोठा होता कसंबस चढून वर आलो आणि मन समोरील बहुला किल्ल्याचा शेवटचा डोंगर पाहून आनंदात नाचू लागलं. आमच्याकडे आता एकच तास उरला होता. ७ वाजले की अंधार होणार अन् दूरवर सूर्य डोंगराआड लपण्यास सुरुवात झाली. आता वाट अवघड नव्हती त्यामुळे आम्ही डोंगर सोंडेवरून पळत पळत सुटलो. वाटेत अनेक फुटलेले तोफगोळे दिसत होते.  गडाच्या तोंडाला आलो, काटेरी झुडुपातून वाट काढत निघालो. मंगेश पुढे जाऊन आला पण त्याला गडावर जायचा पायरीमार्ग सापडला नव्हता. त्याने तिथंच वाट आहे का बघा म्हणून सांगितले व तोही माघारी येऊ लागला अन्  तो दगडात लपलेला डोंगरात छिन्नी हातोडीने फोडून काढलेला सुंदर पायरी मार्ग सापडला. झालं संपूर्ण दिवस पायपीट करून जीव मुठीत धरून इथवर आल्याचं सार्थक झालं. कोठेही मला फोटो काढता आले नव्हते पण इथे मी वाटेचे फोटो घेतले, वेळ खूप कमी होता आम्ही वर चढून आलो. हा पायरी मार्ग खूपच खतरनाक आहे. हरिहर वर जरी तुम्ही पायऱ्यांवरून पडलात तरी खाली दरीत कोसळत नाही पण इथे तसं नाही. जर का पायऱ्यांवरून पडला तर सरळ खाली दरीत कारण इथे खाली कुठंही सपाट जागा नाही. दरीतूनच हा मार्ग वर आला आहे. अंधार पडायला लागला होता. पटकन माथ्यावर फिरून काही अवशेष दिसतात का पाहिले. अवशेषांचे फोटो घेतले. दक्षिणेकडे कड्यावर उभारून आलेल्या मार्गाची पाहणी केली. दूरवर डोंगराआड होणारा सूर्यास्त कॅमेरात कैद केला आणि दिवसभर उपाशी असलेल्या पोटात गडावर बसून उरलं सूरलं पाणी व दिलखूष ढकललं. बाकी काहीच खायला प्यायला नव्हतं. तोफांच्या माऱ्यामुळे इथे टाक्यात पाणी नव्हते सर्व परिसर भक्कास दिसत होता. आता आलेल्या मार्गाने आपण परत जाऊ शकणार नव्हतो त्यामुळे आर्मीच्या छावनीच्या बाजूने उतरने आता भाग होते. पायऱ्या उतरून खाली असलेल्या लेणी व सुकलेलं टाकं पाहिलं.  गडाबाहेरील एका मोठ्या दगडावर बुरुजासाठी खोदलेला पाया पाहून विरुद्ध बाजूने  गड उतार होण्यास सुरुवात केली. इथेच एक चोरमार्गही आहे. उतरताना विचार करू लागलो पुढील काळात हा किल्ला किल्ला म्हणून उरेल का?? उरल्या सुरल्या पायऱ्या नष्ट झाल्यास पुढच्या पिढीला हा किल्ला आहे म्हणून समजण्यास खुणा शिल्लक राहतील का??  फायरींगमुळे गडाचे खूप नुकसान झाले आहे त्यामुळे मनात येथील आर्मीवाल्यांबद्दल थोडा रागच आला. आर्मी कॅम्प व फायरिंग करिता आजूबाजूच्या गावातील लोकांची शेती काढून घेतली आहे पण त्यांना अजूनही त्याचा मोबदला दिला गेलेला नाही.
                आम्ही चारही जण गडउतार झालो, पायथ्याला उघड्यावरच एक भवानी देवीचं मंदिर आहे, तिथून खालच्या दिशेने वळून पुढे आल्यास एक टाकं आहे त्यात पाणी होतं पण ते अ अस्वच्छ होतं, पण आमच्याकडे पर्याय नव्हता. धुळीने माखकेले तोंड, मान, हात धुवून आम्ही त्या पाण्याची चव चाखली. हायवेला आमची गाडी व बाकीचे वाट पाहत होते. हायवे इथून बराच दूर होता, आता इथून कोणाच्याही दृष्टीस न पडता लवकर बाहेर पडणे गरजेचे होते. मी गुगल मॅपवर जीपीएसच्या साहाय्याने आम्ही कुठं आहोत आणि कसं जायचं आहे हे पाहत पाहत चालू लागलो. मॅपवर जवळच एक रस्ता असल्याचे दिसले. आम्ही त्या रस्त्याच्या दिशेने चालू लागलो. सर्वत्र अंधार, साधं चिटपाखरूही नव्हतं. आम्ही रस्त्यावर आलो. पण आम्हाला कळून चुकलं होतं की हा आर्मी कॅम्पकडे जाणार त्यांचा रस्ता आहे. थोडं दूर चालल्यावर अचानक गाडीचा आवाज येऊ लागला, दूरवरून लाईट दिसले तेवढ्यात लगेच आम्ही रस्ता सोडून बाजूला जाऊन जंगलात पालथे पडलो. आर्मीचा मोठा ट्रक शहरातून कॅम्पकडे येत होता. आमच्या जवळ येताच ड्रायव्हरने ट्रकचा वेग अत्यंत कमी केला.  आता मात्र वाटलं आता आपण मेलो, सापडलो.... सर्वांच्या काळजात धस्सस झालं. पण नंतर लक्षात आलं की तिथे स्पीड ब्रेकर होता व त्यावरून चढवून नंतर ड्रायव्हरने आल्या स्पीडने ट्रक मारला... आम्ही सर्वजण खूप घाबरलो होतो. आता रस्त्यावरून न जाता जंगलातून जायचं ठरवलं. इकडे कोणी येऊ नये म्हणून आर्मीने काटेरी झुडुपाचे जंगल वाढवले आहे. त्यातून वाट काढताना अंधारात फांध्या हाताला तोंडाला लागत होत्या. आयुष्यात पहिलेंदा आपल्याच देशाच्या आर्मीला घाबरण्याची पाळी आली होती. सरळ हायवेला न जाता आडवे गुळने गावाच्या दिशेने जायचं आम्ही ठरवलं, कितीही चाललं तरी आम्ही तिथंच होतो. वाटेत एक नदी लागली. काटेरी जंगलात अंधारात रोड काढणं खूप कठीण जातं होतं. त्यात कोठुनतरी आमच्या दिशेने जोरात कुत्री भुंकू लागली.  त्यांना आमची चाहूल लागली होती. आम्ही परत आता रस्ता धरूनच जायचं, आर्मीची गाडी आलीच तर लपून बसायचं, सापडल्यास "काळभैरवाच्या मंदिराकडून खाली उतरलो वाट चुकलो असे सांगायचं". मग जे होईल ते होईल असं आमचं ठरलं. व परत माघारी फिरून रस्त्यावर आलो. अंतर बरंच होतं, कितीही चाललं तरी रस्ता संपत नव्हता. रात्रीचे नऊ वाजायला आले होते, आम्ही सकाळ  पासून चालतच होतो. गडावर जेवढा  वेळ थांबलो तीच काय ती विश्रांती, जेवण नाही पाणी नाही. गळा सुकला होता.. आता दुरून हायवेवरचा गाड्यांचा आवाज ऐकू येऊ लागला.. पण वातावरण शांत होते म्हणून आवाज येत होता अजून आम्ही खूप दूर होतो. गडाला शत्रूने घातलेल्या वेढ्यातून निसटताना जितकं छातीत धडधड होतं तितकंच आम्हाला हायवेला पोहोचेपर्यंत होत होतं. बराच वेळ चालून आम्ही आता जवळ पोचलो होतो, इतक्यात मंगेशला छावणीकडून येणारा रस्ता जिथं हायवेला मिळतो तिथं आर्मीचे लोक असल्याचं दिसलं. मग आम्ही जंगलात शिरलो व उजव्या बाजूला तिरपे हायवेच्या दिशेने जायचं ठरवलं. अन् शेवटी आम्ही हायवेच्या खालून पलीकडे रायगडनगर येथे जाऊन पोचलो.... १० वाजून गेले होते. आता कुठं जिवात जीव आला. तिथं एका दुकानात आम्ही ४ कोल्ड्रिंक्सच्या बाटल्या घेतल्या व बॅग काठी रस्त्यावरच ठेवून कडेला पीत बसलो. हायवेच्या ब्रिजखालून हातात काठी व बॅग बघून तिथल्या लोकांना समजलं होतं की हे चौघे किल्ल्यावर जाऊन आलेत आणि त्यांना आम्ही तिथून इथपर्यंत असे अंधारात कोणाला न सापडता येऊन पोचलो हे पाहून ते आश्चर्याने विचारू लागले. कोठून आलात?? गडावर गेलेला का???  आम्ही नाही हो इथं काळभैरव मंदिराकडे गेलो होतो चुकून या बाजूने उतरलो अंधारात समजलं नाही, इकडून आलो असेच सांगू लागलो... पण आमच्या उत्तराने त्यांचे समाधान झाले नाही. उलट सुलट प्रश्न विचारू लागले.. शेवटी ते गाववाले होते ना... 
असा हा जवळजवळ १०-११ तासांचा ट्रेक आयुष्यात कायम आठवत राहील. 
● जाण्याची वाट- इगतपुरी- गुळणे-आंबेबहुला - बहुला किल्ला.
● आमची वाट - लाहामगेवाडी हायवे- पायवाटेने काळभैरव डोंगर - शिवपिंडी डोंगर - बहुला किल्ला
● किल्ल्यावर जायचंच झाल्यास रविवारी स्थानिकांचा सल्ला घेऊन जावे. उन्हाळ्यात पाणी घेऊन जावे.
- मेघन तारिहाळकर पाटील
      बेळगांव
































No comments:

Post a Comment

किल्ले बहुला.

 आयुष्यात पाहिल्यांदा आपल्या आर्मीला घाबरून जीव मुठीत धरून केलेला एक अविस्मरणीय ट्रेक - किल्ले बहुला.   ✍️ मेघन तारिहाळकर पाटील (चौफेर भटकंत...