Friday, July 28, 2023

भैरोबादुर्ग

 https://trekwithsurendra.blogspot.com/p/blog-page_21.html


 मनाला नारद मुनीं सारखं वरदान आहे, कोणत्याही क्षणी कोठेही मुक्त संचार करण्याच. त्यामुळे त्याच मजेत चाललं होत. शरीराचं मात्र hibernation मध्ये अडकलेल्या polar bear सारखे हाल चालले होते. 

मुक्त संचार करणाऱ्या मनाला शरीराच्या कोंदणात बसवल आणि ' कोरोना ' विरुद्ध बंडाचा झेंडा फडकवून सोमवारी भैरोबादुर्गा कडे मोर्चा वळवला. 

जी गत शरीराची तीच गत गाडीची. एंजिनाची धड-धड ऐकून बाकीच्या पार्ट्स ना हुश्श्य झालं. आहे आहे. बऱ्याच महिन्यांनी long drive म्हणून ती पण खुशीत होती. ५ वाजता चेतन ला उचललं. शहरात कोरोनाच सावट होत. नाशिक रोड वर मात्र मालवाहू ट्रक ची मुंग्यां सारखी रीघ लागली होती. ट्रक च्या लयीत लय मिसळत खेड मागे टाकल. वसंत ऋतूत पाना फुलांनी लगडलेल्या झाडां सारखी, ग्राहकांच्या गर्दीनी भरून गेलेली दिसणारी हॉटेल्स पानगळीत निष्पर्ण दिसणाऱ्या झाडासारखी ओकीबोकी दिसत होती. आमचीच वाट बघत बसलेल्या एका हॉटेल वर थांबलो. वीस फुटांवरचा हायवे, समोरच पठार, लांब वरचे डोंगर धुक्याच्या शाली खाली मुटकुळी मारून बसले होते. पोटाची खळगी चहा नि भरली आणि परत गाडीला स्टार्टर मारला. 

दाट धुक्यातून गाडी चालली होती. एक किलोमीटर लांबवरच दिसत नव्हत पण पुढच्या ३०.४० फुटावरच दिसत होत. तेवढं अंतर गेल कि पुढचा रस्ता दिसायचा. हायवे जणु life path च झाला होता. म्हणूनच चरैवेती - चरैवेती. आली रे आली गाडी philosophy च्या भोपळे चौकात आली. असो. उजव्या अंगाला नारायणगड तटा बुरुजांच शेला पागोटं घालून ठाण मांडून बसला होता. लांबूनच त्याला मुजरा केला आणि पुढे निघालो. प्रत्येक वेळा आमचीच लाल म्हणून चालत नाही. कधीकधी इतरांवर विश्वास ठेवायचा असतो. आम्ही तो google बाई वर ठेवला. ती म्हणेल तस स्टेरिंग फिरवत होतो. मुली बघण्याचा कार्यक्रम कांदेपोह्या शिवाय पूर्ण होऊ शकत नाही तसा ट्रेक मिसळी शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. म काय मिसळ चेम्बवण्यासाठी कोतुळ ला थांबलो. हायवे जसा सोडला तसा निसर्ग गप्पा मारायला लागला. किल्ल्या पासून अर्धा पाऊण तासावर असताना पुण्यात मित्राला कॉल केला, गावात बाहेरून येणाऱ्या लोकांना येऊ देतायत ना ? म्हणाला MH १२ बघून हनत्यात. आली का संक्रांत आता. पण रामबाण सुटला होता.  

अत्ता पर्यंत सगळं वेळापत्रका प्रमाणे चाललं होत. म्हणजे जस हुशार विद्यार्थी पेपर मध्ये प्रत्येक प्रश्नासाठी वेळ ठरवून ठेवतात, एकवाक्यात उत्तरे लिहा साठी एवढा वेळ, सविस्तर उत्तरां साठी एवढा वेळ, संदर्भा सहित स्पष्टीकरणा साठी एवढा आणि निबंध साठी एवढा वेळ. अगदी तसच आखीव रेखीव. घड्याळात १० वाजले होते, किल्ला समोर, १० ला ट्रेक स्टार्ट करून १२ ला खाली, नंतर मस्त गावरान जेवण, झाडांच्या कुशीत एक वामकुक्शी, परतीच्या वाटेवर फर्मास चहा आणि ७ च्या आत घरात. पण भैरोबा ला इतका सपक ट्रेक मान्य नव्हता. 

आखीव रेखीव ट्रेक म्हणजे अभ्यास करून दिलेल्या पेपरासारखा. निम्म पुस्तक option ला टाकणाऱ्या category ले आम्ही. एकदम खतरोके खिलाडी. आमचा पिंड भैरोबा ला समजला असणार, म्हणुनच त्यानी एक unexpected प्रश्न टाकला.  टार रोड सोडून डावीकडे कच्च्या रस्त्याला लागलो, एक कुत्र्याचं पिल्लू चढ वरून आमच्या दिशेनी पळत येत होत. त्याला वाचवायच्या नादात डावीकडे स्टेरिंग जोरात फिरवलं, रस्त्याच्या दुतर्फा खोदलेल्या चरां मध्ये गवत वाढलं होत. अंदाज आला नाही. गाडीची दोन चाक खड्ड्यात आणि दोन वर उचलली गेली. गाडीचा बेस जमिनीला थटला होता, चाक हवेत असल्यामुळे accelerate करून काही उपयोग होत नव्हता. एक गावकरी मामा आला, आमच्या बरोबर तो पण भिडला. बरेच शक्ती आणि युक्ती चे प्रयोग झाले. सेकंद काट्या बरोबर मिनिट काटा आणि आता तास काटा पण गरागरा फिरायला लागला. सगळे उपाय झाले पण गाडी काही बाहेर यायच नाव घेइना. मग शेवटी ट्रॅक्टर च ब्रम्हास्त्र काढलं. चेतन आणि मामा कुठून तरी ट्रॅक्टर घेऊन आले. गाडी खड्ड्यातून निघाल्यावर जिवात जीव आला. ट्रेक सुरु करे पर्यंत २ वाजले. पण आता आम्ही रिलॅक्स होतो. 

एकांड्या घराला डाव्या अंगाला करून ओल्या चिंब पायवाटेवरून चुबळुक चुबळुक आवाज करत चाललो. उजवी कडून एक स्वछंदी झरा हव्यातश्या वेड्यावाकड्या उद्या मारत आमच्या समोरून पळत होता. 

जंगल घनदाट वृक्षांनी सजल होत. एक एक वृक्षा चा बुंधा पाच जणांनी मिठी मारली तरी मिठीत येणार नाही एवढा मोठ्ठा. पणजोबा, खापर पणजोबां च्या वयाचे वृक्ष पण एखाद्या तरुणा सारखे ताठ उभे होते.

चेतन च्या नजरेला शेकरू दिसलं. जंगल समृद्ध असल्याची खूण. पक्ष्यांच्या साथीला वारा साद घालत होता. मन आणि कान तृप्त होत होते. भैरोबा आमच्या वाटेवर डोळे लावून बसला होता. भैरोबा दुर्ग, कलाड गड, कोंबड किल्ला, भैरवगड, हरिशचंद्र गडा च्या परिघातील. पण हरिशचंद्र गडा च्या वलयामुळे दुर्लक्षित. पांढर पेशींची नजर न लागलेला. म्हणूनच गोमटा. दगडात खोदलेल्या टाक्यापाशी आलो. 

कित्येक महिन्यांनी किल्ल्याच्या कड्यात खोदलेल्या टाक्यातलं थंडगार, नितळ पाणी प्यायला मिळाल. आत्मा तृप्त झाला. किल्ल्यात जायला लोखंडी शिड्या केल्या आहेत अगदी प्रशस्त. गडावर झुडप आणि गवताचं साम्राज्य पसरलं होत. कड्याचा अंदाज येत नव्हता, त्यामुळे गड फिरण्यात काहीच point नव्हता. भैरोबा च दर्शन घेतलं. हरिश्चन्द्रगड ढगात लपला होता. भोवताल ढगांमुळे झाकोळला होता. ढग अधिकच काळवंडले तसा आम्ही गडावरून काढता पाय घेतला. वाटेत पावसानी गाठलच. नखशिखांत भिजून त्याची हौस पुरवली. मना बरोबर शरीर पण ताजतवान झालं. 

एक वाट कड्याच्या पोटातून गेली होती. बक्कळ पाऊस झाला होता तरी ओव्हरहॅन्ग मुळे कडा आणि वाट  कोरडी ठणठणीत होती. दोन मिनिट शांत बसून सगळ सौंदर्य रंध्रा रंध्रात भरून घेतल. त्या निसर्गाचा भाग होण्याचा मनापासून प्रयत्न केला. 

आता परतीचा प्रवास सुरु. प्रत्येक पावला गणिक क्षण भूतकाळात जमा होत होते. असे सुंदर क्षण सरूच नयेत असं कायमच वाटत. पण ते थांबतात कुठले. मन मात्र थांबलेल्या पाण्यासारखं तिथेच रेंगाळत रहात. असे कैक सुंदर क्षण फिरून कॉर्नर वर आपली वाट बघत थांबलेलेच आहेत. धुक दाट आहे म्हणून काय झालं, विश्वास ठेऊन चालण्यात तर खरी मज्जा आहे. म्हणूनच चरैवेती - चरैवेती. 


।। कृष्णार्पणमस्तु ।।

No comments:

Post a Comment

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...