http://samontreks.blogspot.com/2017/02/blog-post.html
कोळेश्वरला ट्रेक आहे, येतोस का? अशी विचारणा झाल्याबरोबर लगेचच मी हेमंत
ला होकार देऊन टाकला होता. कित्येक वर्षांपासून कोळेश्वर पठार डोक्यात घर
करून होता पण मुहूर्त काही निघाला नव्हता. कोळेश्वराच्या खालच्या अंगाच्या
जंगलात फेरफटका मारायचा बेत आहे एव्हडेच कळले. काहीच माहिती न काढता मी
ट्रेक ला गेल्याचे हे बहुतेक पहिले अथवा दुसरेच उदाहरण. दिनांक ११ व १२
फेब्रुवारी २०१७.
यतीन,
रवी अण्णा आणि चमूसह रात्रभर प्रवास करून आम्ही पहाटे उजाडताना जांभळी
गावात पोहोचलो. रात्रीच्या प्रवासात वाट चुकल्याने धोम जलाशयाला थोडा मोठाच
वळसा पडला होता परंतु त्याच कारणाने आमचे कमळगडाच्या पायथ्याच्या गावातून
कमळगडाचे जवळून दर्शन झाले. भल्या पहाटे तारेवर बसलेले पारवे, चिवचिव करत
उडणारे इवलेसे जांभळे सूर्यपक्षी, गवताच्या टोकावर बसलेले गप्पीदास, धोम
धरणाच्या पाण्यातील हळदीकुंकू बदक (Spot Billed Duck) बघून
सगळे खुश झाले. जांभळी गावात पोहोचताच राऊ दादांनी आमचे स्वागत केले,
लागलीच नाश्त्याचा आग्रह झाला. गरमागरम पोह्यांवर ताव मारतो तोच राऊ दादा
म्हणाले, आपल्याला आज बरीच चाल आहे, पोटभर खाऊन घ्या. पोहे संपून ताटात
गरमागरम भात, रुचकर आमटी आणि लोणचे वाढले गेले. काहीही आढेवेढे न घेता ते
पोटातील कावळ्यांना पोहोचते झाले. मागोमाग चहा आलाच. रात्रभराच्या जागरणाचा
शीण कुठच्या कुठे गडप झाला. दिवसभराच्या भटकंती करीता आवश्यक तेव्हडेच
सामान - पाणी, दुपारचे जेवण, कॅमेरा, विजेरी (टॉर्च) वगैरे बॅग मध्ये घेऊन,
पायात बूट चढवून सगळा चमू तयार झाला. गावात उशीरा पोहोचल्याने भटकंतीची
सुरुवात पण तशी उशीराच झाली होती. नक्की काय काय पाहायचे त्याबद्दल यतीन
सोडून कुणालाच कल्पना नव्हती, काही ठरवले देखील नव्हते.
 |
| नदीचे पात्र ओलांडून जाताना |
 |
| अंजनी ची मनमोहक फुले |
कोळेश्वर आणि रायरेश्वर यांच्या
बेचक्यात वसलेले जांभळी गाव. येथे पोहोचायला वाईजवळील धोम जलाशयाला वळसा
घालून जावे लागते. गावापलीकडेच अजून एक तलाव असून बांध बांधून जांभळी नदीचे
पाणी त्यात अडवलेले आहे. बारा महिने त्यात मुबलक पाणी असल्यामुळे या भागात
शेती व्यवस्थित होते. लांब दूरवर पूर्वेला पागोट्याच्या आकाराचा केंजळगड
ह्या भूभागावर लक्ष देऊन उभा असतो. गावाच्या उत्तरेला ऐतिहासिक महत्व
असलेले, शिवरायांनी जेथे स्वराज्यस्थापनेची शपथ घेतली, ते सुप्रसिद्ध
रायरेश्वराचे पठार तर दक्षिणेला घनदाट अरण्याने वेढलेले, कोळेश्वराचे
प्राचीन मंदिर असलेले कोळेश्वराचे पठार दिसते. पश्चिमेला दूर दूर पर्यंत
हिरवी गर्द राई. 'येता जावळी जाता गोवली'. आठवली का? चंद्रराउ मोऱ्यांना
ज्यामुळे मस्ती चढली होती (जी नंतर शिवाजीराजांनी उतरविली) त्याच जावळीच्या
घनदाट रानावनातील एक छोटासा भाग आम्ही आज बघायला जाणार होतो. सध्या राखीव
प्रकारातील हा जंगलाचा भाग येथील उपस्थित वन्य जनावरांमुळे लवकरच अभयारण्य
होण्याच्या मार्गावर आहे. राऊ दादा येथे वनरक्षक म्हणून कार्यरत असून
जंगलाची निगा राखणे, मानवनिर्मित जलस्रोतामध्ये नियमित पाणी सोडणे,
वन्यप्राण्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवणे, त्यांच्या अभ्यास करणे, त्यांच्या
खाणाखुणा शोधणे, जंगलातील प्राण्यांच्या वहिवाटीच्या जागी कॅमेरा लावणे
इत्यादी कामे करतात. आज तेच राऊ दादा आणि अजून एक गावातील अनुभवी गृहस्थ
(मामा) आमच्यासोबत येऊन वाट दाखवणार होते.
चला
लेको....म्हणत अरण्याकडे आमची वाट सुरु झाली. एक दोन तीन चार म्हणत म्हणत
एकेक पक्षी दिसू लागले, पक्ष्यांचा किलबिलाट सुरूच होता. रवी अण्णा आणि
जयकृष्णन तर केवळ आवाजावरूनच पक्ष्यांची नावे सांगत. लालबुड्या बुलबुल,
खाटीक, सातभाई, गप्पीदास, वटवट्या, जांभळा सूर्यपक्षी, कोतवाल, माळभिंगरी,
वेडा राघू, ठिपकेदार होला, छोटा तपकिरी होला, टोईवाला पोपट इत्यादी अनेक
विध पक्षी त्यांनी केवळ आवाजाने ओळखले आणि दाखवले. आम्ही बावचळल्यागत
निरीक्षण करायचो, फोटो काढायचा प्रयत्न करायचो. एव्हाना आम्ही जांभळी
नदीच्या पात्रात प्रवेश केला होता. माझा ट्रेक वर हा एक आवडता उद्योग -
जमिनीवर पाय ना टेकवता केवळ दगडांवर पाय ठेवून तोल सांभाळत चालायचे. दगड
गडगडला तर मग पंचाईत. परंतु अश्या जोखमीत देखील नेमक्या दगडावर तो गडगडणार
नाही ह्या विश्वासाने पाय ठेवायचा आणि समजा एखादा गडगडलाच तर त्यावरून तोल
सांभाळण्याची कवायत करायची. त्या गोलाकार दगडांवरून चालताना मौज येत होती.
नदीचे बरेचसे पात्र कोरडे होते पण एखादे ठिकाणी पाण्याचा प्रवाह सुरु असला
कि जंगलातल्या निरव शांततेत त्या झुळझुळ वाहणाऱ्या पाण्याचा खळखळ आवाज मन
सुखावून जायचा. एखाद्या ठिकाणी साचलेल्या शांत पाण्यात विविध रंगाच्या छटा
असलेले शेवाळ साचलेले असायचे. अंजनीच्या वृक्षाच्या खोडावर गुलाबी जांभळ्या
रंगाच्या फुलांचा ताटवा सजलेला असायचा. एखाद्या वन्य प्राण्याची चाहूल
लागते का याचा माग घेत नजर भिरभिरत असतानाच राऊ दादांचा आवाज यायचा -
"चला.... सगळे आले का?" राऊदादांसाठी हि रोजचीच वाट त्यामुळे ते भरभर
चालायचे, आमच्यासाठी मात्र नवीन वाट, तीदेखील घनदाट जंगलातील आणि त्यामुळे
आमची उत्सुकता नेहमीच शिगेला असायची. वन्य प्राण्यांचा सुगावा लागतोय का
कुठे ते ढुंढाळत असतानाच यतीन आणि प्रणोती जमिनीवर उमटलेले प्राण्यांचे ठसे
पाहताना दिसले. निरीक्षणाअंती ते बिबट्याचे ठसे असल्याची नोंद करण्यात
आली. सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि उत्सुकता, एकाच वेळेस दिसायला
लागले. एकामागोमाग एक असे बरेच पुसट ठसे दिसू लागले. एक
ठसा मिळाला कि नजर अजून काहीबाही शोधायला लागते. हे बघा... हे अजून.. हे
खूर - हरिणांचे, हे वेगळे आणि छोटे आहेत - साळींदराचे, लगेच उत्तरे पण
मिळायची. आमच्यातील काही जण नियमित भटकंती करीत असल्याने त्यांच्याकडे
जुजबी माहिती होतीच, नसली तर राऊ दादा आणि मामा त्यात भर घालायचे. आणि हे
सगळे होते पाऊलवाटांवर. मानवी नव्हे वन्यजीवांचीच वाट. आज आम्ही त्यांच्या
वाटेवरून चालत होतो.
 |
| Giant Wood Spider |
राऊ दादांकडून
अधिकाधिक जंगलाची माहिती मिळत होती. कोळेश्वराच्या पठाराखालील उतारावरील
एका झऱ्याला बारमाही पाणी असते. त्या झऱ्याचे पाणी लोखंडी पाईप द्वारे
गावापर्यंत पोहोचण्याची सोय केलेली आहे. उतार असल्याने ते पाणी सहज खालच्या
जांभळी गावापर्यंत पोहोचते आणि गावकऱ्यांची तहान भागवते. गावाकडे असणारी
पिण्याच्या पाण्यासाठीची वणवण इथे करावी लागत नाही. ह्या लोखंडी पाईप मधील
पाणी वन्यजीवांकरिता देखील वापरले जाते. त्यासाठी तेथे तीन ते चार ठिकाणी
छोटे तलाव बांधून त्यात झऱ्याचे पाणी सोडले जाते. एक दिवसाआड त्या तलावात
पाणी सोडण्यासाठी राऊ दादा ह्या जंगलात फेरफटका मारतात. आम्हाला अश्याच एका
तलावाजवळ जायचे होते पाणी भरून घेण्यासाठी.
 |
| शेकरू चे घरटे |
 |
| नख्यांनी ओरबाडल्याच्या खुणा |
उंच
झाडावर शेकरू ची वाळकी पाने व काटक्या वापरून बनवलेली तीन घरटी दिसली. एका
झाडाच्या खोडावर नख्यांनी ओरबाडल्याच्या खुणा होत्या. वाघ व बिबट्या अनेक
वेळा आपल्या हद्दीच्या सीमा आखताना नरम खोडाच्या झाडांवर अश्या प्रकारे
नख्यांनी ओरबाडून खुणा करतात व त्या प्रदेशावर आपला हक्क सांगतात. असेच पुढे जात
असताना पायवाटेशेजारी गवतात राऊदादांनी आम्हाला एक विष्ठा दाखवली.
प्रथमदर्शनी ती बिबट्याची वाटली. प्रणोती ने ती चाळवून त्याचे निरीक्षण
केले. त्यात हरीण अथवा रानडुक्कर सदृश प्राण्याचे केस, नखे, दात, हाडे
इत्यादी आढळले. विष्ठेचा भलामोठा आकार पाहून ती एकतर मोठ्या बिबट्याची अथवा
पट्टेदार वाघाची असावी असा अंदाज लागला. नक्की कुणाची ते सांगणे मात्र
अवघड. प्रणोती म्हणाली - "ठसे दिसले तेव्हा विष्ठा पाहायची होती, आता
विष्ठा दिसली आहे तर वाघोबा पण दिसला पाहिजे."
 |
| बिबट्याची विष्ठा |
दोनेक मिनीटातच तो मानवनिर्मित
पाण्याचा स्रोत आला. येथे आम्हाला रानगव्याचे पायाचे ठसे आढळले. शेजारीच
झाडाच्या बुंध्यावर एक कॅमेरा लावलेला आम्हाला दिसला. त्यात यापूर्वी
पाण्यावर येणारे रानगवे, बिबटे, रानमांजर, साळींदर, वाघाटी, अस्वल, भेकर,
सांभर इत्यादी वन्यप्राण्यांच्या नोंदी झालेल्या आहेत असे राऊदादांकडून
समजले. "चला पाणी भरून घ्या." - दादांची हाक आली. सगळ्यांनी हात तोंड धुवून
झऱ्याचे थंडगार पाणी पिऊन सोबतच्या पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या.
यापुढच्या रस्त्याला आम्हाला अजून दुसरा कुठला पाण्याचा स्रोत मिळणार
नव्हता. ताजेतवाने होऊन पूढे निघालो. आलटून पालटून पायवाटेवरची आणि
नदीच्या पात्रातील चाल असे आमचे सुरु होते. नदीचे पात्र आले कि माझा दगड -
दगड खेळ सुरु व्हायचा. दूरवरून हुप्प्याचा हूऊप.... हूऊप असा आवाज कानी
पडायचा. कुठल्याश्या दगडावर फळांच्या बिया असलेली हुप्प्याची विष्ठा पडलेली
असायची. अस्वलाच्या विष्ठेत वाळवी व वारुळाची माती असायची. काळोख्या
वाटेवर शिरताना जयकृष्णन आणि रवी अण्णा थांबून थांबून पक्ष्यांच्या आवाजाची
चाहूल घेत असत. शेजारचे दोघे चौघे देखील थांबून निरीक्षण करायचे. असेच एका
ठिकाणी घुबडाचा आवाज ऐकू आला पण निबिड अरण्यात त्याला केवळ आवाजाच्या
दिशेला शोधणे शक्य झाले नाही. रानकोंबड्याचा आवाज तर एव्हाना परिचयाचा झाला
होता. बांबूच्या काड्या तुटलेल्या दिसत होत्या, पाने विखुरलेली असायची,
छोट्या झाडाच्या खोडाची निघालेली ओली साल गव्याची उपस्थिती जाणवून देत
होती. एका ठिकाणी गवताळ भागात गवत इतस्थतः पसरलेले, विस्कटलेले वाटले, जणू
एखाद्या प्राण्याची झटापट झाली असावी. यतीन आणि मी बारकाईने पहिले तर
गवतावर लालसर डाग आढळले. एखाद्याला ओढून फरपटत नेल्यासारखे वाटत होते.
आजूबाजूला निरखून पहिले असता एक दोन दगड लालेलाल झाले होते. पक्की खात्री
पटली होती. येथे एखाद्या हिंस्त्र प्राण्याने शिकार करून ती खाल्ली असावी.
फरपटत नेलेल्या दिशेने मी मोर्चा वळवला. केसांचा पुंजका सापडला. एक दोन
मीटर अंतराच्या फरकाने अजून पाच ते सहा ठिकाणी केसांचे पुंजके आढळले. आणि
शेवटी पुरावा मिळाला. एक अर्धवट खाल्लेले तोंड आणि काही रक्ताळलेली हाडे
सापडली. जबडा आणि त्यातील दातांची माळ अगदी जवळच होती. भेकर होते ते.
बहुतेक दोनचार दिवसांपूर्वी बिबट्याने केलेली भेकराची शिकार असावी ती.
वन्यप्राण्यांच्या वास्तव्याचा अजून काय पुरावा हवा होता? कदाचित आजूबाजूला
झाडीमध्ये एखादा वाघ किंवा अस्वल दबा धरून बसलं असेल, चालता चालता अचानक
रानगवा समोर आला अथवा अंगावर धावून आला, एखाद्याने काय करावे? सगळं ऐकून -
पाहून शहारून जावे कि घाबरून पुन्हा मागे फिरावे कि वन्यजीवनाबद्दल असा
एकेक उलगडा होत असताना, अनपेक्षित अनुभव मिळत असताना आनंदून जावे? सगळेच
शहारले, सगळेच आनंदले. पुढे अजून काय अनुभव मिळणार होते देव जाणो.
 |
| भेकराची शिकार |
 |
| अंजनीची फुले |
एव्हाना
ऊन्ह चढलं होतं पण जाणवत नव्हतं. वाट बऱ्यापैकी सावलीची होती. नजर भिरभिरत
होती, पाचोळा उडत होता. काट्यांपासून वाचत पाय चालत होते. अंजनीच्या
खोडावरील गुलाबी-जांभळी फुले मनमोहक होती. मोकळ्या जागी येताच जाणवणारी थंड
वाऱ्याची झुळूक प्रसन्नता देत होती. नदीचे पात्र ओलांडून वाट डोंगर चढायला
लागली. भुसभुशीत मातीत पाय रोवून केलेल्या छोट्याश्या चढाईनंतर एका
मोकळ्या पठारावर आम्ही पोहोचलो. येथून पूर्वेकडचे विहंगम दृश्य नजरेस पडले.
दूरवर केंजळगड राजांची आज्ञा मानून ह्या सदाहरित प्रदेशावर पहारा देत उभा
ठाकला होता. रायरेश्वराजवळचा नाखिंडाचा डोंगर खुणावत होता. जेथपर्यंत जायचे
होते तो टप्पा जास्त दूर नव्हता. एक विसावा घेतला, पाण्याचा घोट घश्याखाली
गेला. येथून पुढे चढाई सोपी नव्हती. पर्यटकच काय गावकरी देखील येथे फिरकत
नसल्याने मळलेली अशी वाट नव्हती, ती शोधावी लागणार होती. राऊंना काळजी
नव्हतीच, जबाबदारी आता त्या जास्त अनुभवी मामांकडे होती आणि मामा त्यांची
जबाबदारी लीलया पेलत होते. जंगलातील सगळ्या वाटांची खडानखडा माहिती त्यांना
होती. कमरेला खोचलेला कोयता एव्हाना बाहेर निघाला होता, वाटेत येणारी
काटेरी झुडुपे एका घावात नाहीशी होत होती. न दिसणाऱ्या वाटेवरून मामा
आम्हाला घेऊन जात होते. वानरांनी का शेकरूने अर्धवट खाल्लेल्या फळांचा खच
पडला होता. पाचोळा उडत होता, जमिनीवरील वाळक्या काड्या मोडत होत्या, वेली
पायात अडकत होत्या. अनोळखी झाडाझुडुपांमध्ये काही ओळखीची पाने दिसत होती.
जंगलात आता कडीपत्ता च्या पानांचा व रानफुलांचा सुगंध दरवळत होता. जंगल
अधिकाधिक दाट होत होते, आणि एका ठिकाणी मामा थांबले, मागोमाग आम्ही.
झाडाच्या पानांची सळसळ सुरु झाली होती. झुडुपांमध्ये वारा घुसू पाहत होता,
मनाई करताच सूऊऊ...सूऊऊउ करीत घुमत होता. आम्ही आता कड्याजवळ पोहोचलो होतो.
मामांनी आणि राऊदादांनी जागेचा अंदाज घेतला. थोडी शोधाशोध करून एका ठिकाणी
उतरण्याचा निर्णय घेतला. "चला.... सगळे आले का?", राव दादांचा आवाज आला. 'हो', असे उत्तर ऐकताच झाडी
कापत कापत दोघे उतरले. मागे मी आणि प्रणोती. त्यामागे बाकीचे हळू हळू येऊ
लागले. तीव्र उतार आणि घसारा. झाडांच्या मुळांत पाय अडकत होते, कपडे
काट्यात फाटत होते, घसरगुंडी होत होती, झाडांचा आधार मिळत होता. अचानक मामा
आनंदले, म्हणाले - "घोरपड बघा, घोरपड." नजर फिरवली तर अगदी १५ ते २०
फुटांवर एक भलीमोठी घोरपड आमच्या कवायतीकडे लक्ष देऊन शांत बसली होती.
शेपटासकट लांबी साडे पाच ते सहा फूट भरेल अशी लांबलचक. झटपट कॅमेरा काढून
दोन फोटो घेतले. तिच्या जवळ जाताच ती सावध होऊन झटपट सरपटत निघून गेली. परत
आमची मार्गक्रमणा सुरु.
 |
| घोरपड |
घसारा उतरून आम्ही थोड्या मोकळ्या
जागेत पोहोचलो. वाऱ्याचा झोत एकदम अंगावर आला. सह्यधारेचा एक अप्रतिम नजारा
आता आमच्या डोळ्यासमोर होता. खाली अक्राळ विक्राळ दरी होती. थोडा देखील
तोल गेला असता तर आमचा कडेलोट झाला असता. दरीतील एका छोटेखानी डोंगराच्या
आकारावरून मी लगेच त्याला ओळखले - चंद्रगड. त्याच्या डावीकडे मागे दूरवर
प्रतापगड, शिवरायांच्या पराक्रमाचा साक्षीदार. उजवीकडे दरीत ढवळी नदीचे
कोरडे पात्र होते, नदीकिनारी छोटेसे ढवळे गाव. वाह वाह!! एकूण एक जण खूश.
सूर्यराव डोक्यावर होते, आनंद साजरा करण्यासाठी पेटपूजा करण्याचे ठरले.
उंबराच्या खाली सावलीत पथारी मांडून बटाट्याची भाजी आणि चपात्यांचा फडशा
पडला. मिष्टान्न ,म्हणून केक वाटला गेला.
थोडा आराम करून, शुद्ध हवा ऊरात भरून
आम्ही परतीच्या प्रवासाला सज्ज झालो. तोच घसारा आता चढायचा होता. जंगलातील
केवळ ह्याच भागात मिळणारे वेत कापून घरातील वापरासाठी मामांनी त्याची मोळी
बांधून घेतली. परतीच्या वाटेवर पाऊले भराभर चालली होती. ह्या वेळेस दुसरा
रस्ता घ्यायचा असे ठरले होते. जंगल शांत झाले होते. पशुपक्षी जणू दुपारची
वामकुक्षी घेत असावेत. "चला...सगळे आले का?" असा राऊदादांचा आवाज तेव्हडा
यायचा. त्यांच्या आणि आमच्या मध्ये जास्त अंतर पडले कि त्यांची शिटी
वाजायची. एका मोकळ्या पठारावर येताच मामा थांबले. समोरच दिसणारी एक वाट
झाडोऱ्यात जात होती. पण मामांची चलबिचल सुरु होती. ह्या जंगलाच्या वाटेने
बांबूच्या बनात जाताना अचानक रानगव्याशी सामना होऊ शकतो हे त्यांच्या
अनुभवी नजरेने ओळखले होते. काही अनुचित घडू नये हीच काळजी त्यांच्या
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर होती. त्यांनी रस्ता शोधेस्तोवर सगळ्यांनी एक बसकण
मारली आणि पाणी पोटात ढकलले. तीन चार मिनिटांनी मामांनी आवाज दिला आणि
आम्ही सगळे त्यांच्या मागे निघालो. वाट नदी पात्रात उतरली व नदी ओलांडून
पुढे गेली. बांबूच्या तुटलेल्या फांद्या, विखुरलेली पाने, ताजी विष्ठा
गव्याच्या अस्तित्वाची चाहूल देऊन गेली. मनोमन मामांना आणि त्यांच्या
अनुभवाला सलाम ठोकला. वन्य जीवांशी सामना टाळावा ह्याचा प्रयत्न त्या
दोघांचा होता तर वन्यजीवांचे दर्शन व्हावे म्हणून आमचा जीव वरखाली होत
होता. पण शेवटी सगळ्यांची सुरक्षा महत्वाची.
 |
| काळा बुलबुल |
जांभळी नदीच्या मुख्य प्रवाहाला मिळणारे अनेक ओढे ओलांडत आम्ही निघालो.
निळ्याशार आभाळाखाली असलेल्या हिरव्यागच्च जंगलातून एकेक टप्पे ओलांडून
आम्ही जंगलाबाहेर पडत असताना नदीशेजारील एका झाडावर पक्ष्यांचा किलबिलाट
सुरु असलेला ऐकू आला. आपसूकच नजर गेली तर कळले कि अनेक छोटे छोटे पक्षी
झाडावर गर्दी करून आहेत. दुर्बीणीतुन पाहून निरीक्षण केले. काळा बुलबुल -
रवी अण्णा ने माहिती दिली. माझ्यासाठी नवीनच, पहिल्यांदाच पाहत होतो. दबत
दबत जवळ जायचा प्रयत्न करून त्या पक्ष्यांचे काही फोटो टिपले. बाकीचे मला
सोडून पुढे निघून गेले की काय? असा विचार करून मी माघारी वळलो तर हे सगळे
नदी पात्रात एका ठिकाणी स्तब्ध बसून काहीतरी पहायचा प्रयत्न करत होते.
विचारपूस केल्यावर हेमंत हळूच पुटपुटला - Paradise Flycatcher.
स्वर्गीय नर्तक? आश्चर्याने मी त्याने बोट दाखवलेल्या जागी पहिले
तर लांबलचक शेपटीचा पांढरा पक्षी झुडुपातून आत बाहेर करत होता. जवळपास २०
मिनिटे प्रयत्न केल्यावर कुठे त्याचा एक व्यवस्थित फोटो मिळाला.
 |
| स्वर्गीय नर्तक |
फोटो काढण्याच्या खटपटीत बराच उशीर झाला आणि काळोख व्हायच्या आत जंगलाबाहेर
पडायचे होते म्हणून आता राऊ दादांची घाई सुरु झाली. भराभर पाय उचलत आम्ही
एकदाचे बाहेर पडलो आणि मामांच्या घरी रात्रीच्या मुक्कामासाठी प्रस्थान
केले. आजचा दिवस सार्थकी लागला होता.
टीप: जांभळीतील
वन व्यवस्थापन समिती या भागातील भ्रमंती नियंत्रित करते व
वनखात्याचे अभयारण्याशी निगडित सर्व अटी व नियमांचे येथे पालन केले जाते.
येथे जाण्यासाठी वनखात्याची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. प्राण्यांची
संपूर्ण अन्नसाखळी येथील निसर्गाने आणि स्थानिकांनी अबाधित राखली आहे आणि
येथील स्थानिक हे जंगल अबाधित राखण्यास उत्सुक आहेत. मानव - वन्यजीव
परस्परावलंबित्व जपल्याने काय मिळते त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे हे
जांभळीचे खोरे!
 |
| जांभळी गावातील शेतात असलेली गव्हाची कोवळी लोम्बी |
 |
| शेतात दिसलेला चंडोल पक्षी |
 |
| तलावाच्या काठावर ढिवर पक्षी |
 |
| आम्ही स्वच्छ केलेली सतीशिळा |
जांभळी मधून बाहेर पडताना खालच्या
वाडीत एका देवळासमोर रस्त्याच्या कडेला अनेक विरघळी व सतीशिळा पडलेल्या
दिसल्या. उत्सुकतेने तेथे जाऊन त्या पहिल्या, त्यातीळ एका सतिशीळेवरील माती
काढून ती साफ केली, त्याचे फोटो काढले. मंदिर परिसरातील लोकांकडे विचारपूस
केल्यावर कळले कि मंदिराचा जीर्णोद्धार करताना अश्या अनेक कोरीव
शिळा गावकऱ्यांना जमीन उकरताना सापडल्या आणि अजाणते पणे लोकांनी
त्या पुन्हा मंदिराच्या पायात गाडल्या. मंदिराच्या आवारात अजून काही
भग्नमूर्ती, दीपस्तंभाचे दगडी खांब झाडाखाली ठेवले होते. ज्या काही शिळा,
समाध्या बाहेर होत्या त्यावरील नक्षीकाम, कोरीवकाम जबरदस्त होते. एका
चौकोनी दगडावर अष्टपाद (आठ पायांचे) कासव कोरलेले होते. स्त्री
लढवय्या असलेल्या विरघळी पहिल्यांदाच माझ्या पाहण्यात आल्या होत्या. भाले व
तालवारींनी लढणारे सैनिक, धनुर्धारी, घोडेस्वार, हत्ती, इत्यादी कोरीवकाम
त्या शिळांवर होते. त्या कोरीव शिल्पांचे वैशिष्ट्य मी तेथे उपस्थित गावकऱ्यांना सांगून त्यांना त्यांच्या पूर्वजांच्या इतिहासाबद्दल,
या अमूल्य ऐतिहासिक ठेव्याबद्दल, त्यांच्या संवर्धनाबद्दल जागरूक करण्याचा
प्रयत्न केला. अनेक स्थानिक लोकांना ह्याबाबतीत काहीच रस नसल्याचे
निदर्शनास आले तर काहींनी उत्सुकतेपोटी सर्व लक्ष देऊन ऐकले.
 |
| स्त्री लढवय्या |
 |
| इतस्ततः पडलेला ऐतिहासिक वारसा |
 |
| मंदिराच्या आवारातील सतीशिळा, भैरव मूर्ती |
 |
| मंदिराच्या पायात गाडलेली विरघळ |
आणि अश्या प्रकारे एका अविस्मरणीय ट्रेक ची सांगता झाली.
आजपर्यंतच्या अनेक भटकंती पैकी लक्षात राहण्याजोगा अजून एक ट्रेक म्हणजे जांभळीच्या खोऱ्यातील वनभ्रमंती.
भटकंती मधील भागीदार सभासद ज्यांच्यामुळे अविस्मरणीय अनुभव मिळाला - यतीन नामजोशी, रवी वैद्यनाथन, जयकृष्णन, चंद्रशेखर दामले, हेमंत नाईक, एलरॉय सेराओ, प्रतिष साने, प्रणोती जोशी
धन्यवाद.
No comments:
Post a Comment