https://surpawar.blogspot.com/2018/04/blog-post.html
कात्रज ते सिंहगड... कठिण समजला जाणारा ट्रेक, आणि ट्रेक विश्वात सर्वांना परिचित असलेला. पुण्यापासून अगदी जवळ. बर्याच डोंगर टेकड्या व घसाराच घसारा, आणि या उतारावर सतत असलेले बॉल बेरींग म्हणजेच मातीतून निसटलेले छोटे मोठे मुरबाड दगड, यावरून उतरणे म्हणजे दिव्यच.. एकुण 17 टेकड्या, 15 ते 16 किमी अंतर... उतारावर करावी लागणारी कसरत व परत परत दमवणारी चढण,आणि वाटेवर कुठेही गांव वस्ती नसल्याने निर्जन टेकड्या दमलो तर कुठे थांबायची सोय नसल्याने के टू एस कठीण तितकाच अव्हनात्मक..!!!
मी गेल्यावर्षी केटूएस केला तेव्हाच मनोमन ठरवून टाकलं, परत कधीही इतका कठिण ट्रेक करणार नाही बाबा...! पण विस्मरणाची देणगी आघाध... ही मानवावर निसर्गाने केलेली कृपाच म्हणा ना... हळूहळू दिवस संपले वर्ष संपलं वर्षभरात बरेच ट्रेकही केले.
झालं केटूएस चा थरार विस्मरणात जातोय न जातोय तोच पुढच्या केटूएस ट्रेक चा मेसेज ग्रुपवर येऊन धडकला, 'जे फिजीकली आणि मेंटली फिट असतील त्यांनीच या ट्रेक ला यावे'.... आयला चॅलेंज...!!! मग मन काही गप् बसेना. या ट्रेक ला परत कधीही जाणार नाही असं ठरवणारी मी पून्हा एकदा केटूएस साठी सज्ज झाले. सगळ्या वेदना विस्मरणात गेल्या निसर्गाची कृपा दुसरं काय! स्विकारलं आव्हान, केलं परत एकदा धाडस...! साहस धाडस हे नैसर्गिकच असतं. आपल्याला ज्याची भिती वाटते ते म्हणजे 'साहस'... "मुखवटे फेकून देवून खऱ्या चेहऱ्याने वावरण्याचं स्वातंत्र्य" हे फक्त साहसातच असु शकतं. हे सिद्ध करून दाखवले, माझी ट्रेकिंग फ्रेन्ड शोभा ने....!!!!
बिनधास्त गर्ल्स....मी, मीनाक्षी, ऋतुजा, आणि शोभा
आमच्या "माऊंटन एज अॅडव्हेंचर" ग्रुप चा 31 मार्च 2018 हा दिवस ठरला. सर्वांनी शनिवार रात्री 9:30 पर्यंत स्वारगेट ला एकत्र येण्याचे ठरले. त्याप्रमाणे काही मेंबर्स तळेगाव, निगडी, पाषाण, बाणेर, वाकड, तर काही मुंबई हुन खास या ट्रेक साठी आले होते. स्वारगेट वरून शिंदेवाडी बस पकडून आम्ही सर्वजण जूना कात्रज बोगद्या जवळ उतरलो. एकुण 44 जणांची टिम केटूएस साठी तयार होती. सर्वजण आपापल्या ट्रेकिंग स्टाईल मध्ये मस्त दिसत होते.
काऊंट घेऊन ग्रुप लिडर मंदार सरांनी व मनोज सरांनी ट्रेक विषयी सर्व सुचना दिल्या व त्या पाळण्याचे आदेश ही दिले. रात्री 11 वाजता ट्रेक सुरू झाला. केटूएस सर्वांच्या उत्सुकतेचा व कुतुहला चा ट्रेक असल्याने न्यू यंगस्टर बरेच होते. एका रात्रीतील अविस्मरणीय थरार अनुभवण्यासाठी अगदी सगळे उत्सुक होते. मी दुसऱ्यांदा हा थरार अनुभवनार म्हणून जरा जास्तच उत्सुक होते.
ट्रेक कोणताही असो सुरवातीची चढण दमवते अशा वेळी, शरीराला वाॅर्म अप ची गरज असते. एकदा का वाॅर्म अप झाला की शरीर पुढच्या हालचाली साठी वेग पकडतो. तोच अनुभव इथे आला, दोन टेकड्या चढतोय तोवर दमायला झाले. म्हंटले अजुन तर बारा तेरा टेकड्या पार करायच्या आहेत कसे होणार पण वॉर्म अप चा परिणाम दिसू लागला आम्ही वेग पकडला. तिसर्या टेकडीवर आलो तेंव्हा थंड वाऱ्याचा झोत आला आणि थोडंसं दमलेल्या जीवाला खुप बरं वाटलं. इथून रोषणाईतले पुणे अगदी सुरेख दिसत होतं.
रात्रीच्या ट्रेक मधे थंड वाऱ्यामुळे शक्यतो तहान लागत नाही. पण चालून चालून घाम येऊन जात असतो, त्यामुळे शरीर एक्झॉस्टेड होत असतं परिणामी पायानां क्रॅंम्प येऊ शकतात आणि चालणे अशक्य होते. म्हणून अर्ध्या एक तासाने आणि तहान लागल्यावर पाणी एनर्जी ड्रिंक सतत घेत रहावं. तसंच मधे मधे खजुर किंवा शेंगदाणा चिक्की किंवा राजगिरा लाडू खात रहावे.
या ट्रेक चे वैशिष्ट्य म्हणजे एकदा का तीन चार टेकड्या पार केल्या व किती ही वाटलं तरी माघार घेता येत नाही. पुढेच जावे लागते भरपूर दमवणारा, सात ते आठ तास सतत चालत रहावे लागते म्हणून पूर्णपणे मानसिक तयारी करुनच यात उतरावे.
मी मीनाक्षी आणि नितीन सर आमचं त्रिकूट छान जमलं होतं. मीनाक्षी चा केटूएस पहिला असल्याने मी आणि नितीन सर मागच्या वर्षीच्या या ट्रेक च्या अठवणी गमती जमती सांगत एक एक टेकडी पार करत होतो. एका भयान टेकडीवर आम्ही तीन भुतं...
एक एक टेकडी पार करतांना पौर्णिमेच्या शितल चंद्र प्रकाशात लाखो चांदण्यात आम्ही अक्षरशः न्हाऊन निघत होतो. 'रात्रीस खेळ चाले या गुढ चांदण्यांचा....' अशा निर्जन टेकडीवर हे गाणे आठवतेच. जिथे कुठे पाणी व विश्रांती घेण्यासाठी थांबत, तिथे मी मस्तपैकी चंद्र व चांदणं न्याहाळत असत. काही ट्रेकर मंडळी वेगवान होती त्यामुळे ती कायम बरीच पुढे असत. आमचं त्रिकूट गप्पा मारत ऐन वेळी सुचणाऱ्या हास्य विनोदांचा मनमुराद आनंद घेत मस्ती करत, आम्ही आपलं झेपेल तसं स्वतःला सावरत टेकड्या उतरत होतो.
एखादी टेकडी चढणे सोपी पण उतरणे तेवढीच अवघड. इथे तर बऱ्याच टेकड्या तीव्र उताराच्या आणि त्यात बाॅल बेरींग मुळे कितीही स्वतःला सावरा तरी आपटणार नक्की म्हणून चालत उतरणं अशक्यच यावर एकच पर्याय मस्त पैकी घसरगुंडी करत खाली उतरायचे, काही लाजायचे नाही बिनधास्त बसुन घसरत घसरत खाली यायचे उलट धमाल येते. यानंतर दुसर्या दिवशी इतकंच की, पाया बरोबर हातही खुप दुखावले जाणार. कारण ही घसरण वाटते तेवढी सोपी नाही दोन्ही हातांवर ही तेवढाच ताण येतो. प्रत्येक वेळी हातावर भार दिल्यामुळे खांदे दुखावतात नंतर नंतर तळहाताची आग होते ती वेगळीच...
सहा सात टेकड्या पार झाल्या तेव्हा रात्री चे 2 वाजले होते. आता या टेकडीवर थांबून सर्वांनी इथेच जेवण करण्याचे ठरवले. शहरा पासुन दूर शांत निर्जन टेकडीवर पूर्ण चंद्रप्रकाशात लखलख चांदण्यात या छोट्याशा टेबल लॅन्ड वर सगळ्यांनी फुल मुन लाईट डिनर चा मनसोक्त आनंद घेतला.
आधा पडाव तो पार कर चुके है अब मंजिल दुर नहीं... अस म्हणत स्वतःला व इतरांना प्रेरित करत पुढे निघालो. जेवणा नंतर दिड तास चालून अजुन काही टेकड्या पार केल्यावर एका टेकडीवर जस जसे पुढे जाऊ तसतसा चंद्र मोठा व अगदी जवळ भासु लागला इतका की टेकडीच्या माथ्यावर आणुन ठेवलाय इतका अप्रतिम दिसत होता.
मागचे दोन तास आमच त्रिकूट सतत चालत होतं. बरेच ट्रेकर मागे पुढे झालेले. आता चंद्र प्रकाश कमी व पहाटेचे अकाशातील बदल जाणवू लागले. या टेकडीवर दुसऱ्या ग्रुप चे मेंबर्स विश्रांती घेत आडवे पडलेले, ते पाहुन आम्हालाही पाठ टेकवावी असे वाटु लागले, क्षणाचाही विलंब न करता डोक्याखाली सॅक घेऊन आडवे पण झालो. रात्री 11 वाजल्यापासून चालुन चालुन गलितगात्र झालेला जीव पहाटे 5 ला जमिनीवर पाठ टेकवताच अगदी सुखावून गेला. पहाटमय थंड हवा आणि आकाशातलं चांदणं मला काही डोळे मिटू देईनात मग काय त्यांच्यात आणि माझ्यात मुक संवाद सुरु झाला. 15 मिनीट विश्रांती घेऊन लगेच चालण्यास सुरवात केली. साधारण पाऊण तासा नंतर आम्ही शेवटच्या टेकडीवर म्हणजे 17 व्या टेकडीवर होतो....हिप हिप हुर्रे... काही मिनिटातच सिंहगड पायथ्याशी असणार या विचारात असताना, अकाशात रंगांची किमया होऊ लागली आणि हळूहळू सोनेरी किरणांची लाट वर उसळू लागली. आणि आमची पावलं तिथच थबकली.
अजुबाजुला बारीक धुक्यात पसरलेल्या डोंगर रांगा आणि समोर दिमाखात उभा सिंहगड आणि आकाशात हळूहळू लपत चाललेला पौर्णिमेचा चंद्र.... वा क्या बात है!!!! पण टेकडी वरची व पायथ्याची वाळलेली झाडं पाहुन मन उदास झालं.
एक नजर मागे वळून पाहिले तर हा टेकड्यांचा पसारा.... रात्रभर सात तास इतके डोंगर तुडवत आलोय खरंच वाटेना!! पाय प्रचंड दुखत होते तरीही के टू एस पूर्ण झाल्याचा आनंद त्याहून जास्त होता.
"माऊंटन एज अॅडव्हेंचर पुणे "यांचा 82 वा... 'कात्रज ते सिंहगड' ट्रेक भन्नाट पार पडला. ग्रुप लिडर मंदार थरवल व मनोज राणे यांचे आभार आणि आलेल्या सर्व यंगस्टर चे अभिनंदन...!!!
या पायथ्यापासून दोन पायवाटा निघतात, डावीकडची पायवाट कोंढणपूर ला जाते व उजवी कडील पायवाट सिंहगड घाट रोड ला मिळते तिथून ट्रॅक्सने डोणजे गावा पर्यंत जाता येते तिथून पुणे. मी आणि प्रतिक ने कोंढणपूर वाट धरली हे पाहून आमच्या बरोबर दुसऱ्या ग्रुप च्या दोन लेडिज ही आल्या. घाट रोडला आम्हाला एकही वाहन न मिळाल्याने आजुन जास्तीची 4 किमी ची पायपीट करावी लागली आधिच 14, 15 कि. मी. ची कमी काय म्हणून ही चार कि. मी. ची भर. म्हणून कोंढणपूर वाट सोईची नाही. तसही आमच्या कडे पर्याय नव्हता. तासभर चालल्यानंतर एक वाहन मिळाले, व त्याने आम्हाला बस पर्यंत आणुन सोडलं. त्या मित्राला धन्यावाद देऊन आम्ही स्वारगेट च्या बस मध्ये बसलो आणि बस पुण्याकडे निघाली. आणि आमच्या थकलेल्या पायांना जरा विश्रांती मिळाली.....!!!!!!!!!!!!! ⛳⛳⛳ ⛳ ⛳ ⛳ ⛳
स्वतःची क्षमता आजमावण्यासाठी व एका रात्रितील कुतुहल मिश्रित अविस्मरणीय थरार अनुभवण्यासाठी हा ट्रेक जरूर करावा.




















No comments:
Post a Comment