पन्हाळगड का ढासळतोय ? भाग २  Downfall of panhala fort.


       मागच्या ब्लॉग मध्ये आपण ऐतिहासिक वास्तूंना निर्माण झालेला धोका पाहिला. आता आपण पन्हाळा परिसरात मानवाच्या हव्यासामुळे होणारे परिणाम आणि त्याला निसर्गाने दिलेले उत्तर यावर चर्चा करणार आहोत. पन्हाळा सारख्या ठिकाणी कलम १४४ प्रशासनाला लावावे लागले यावरून परस्थिती आपल्याला समजून येईल. आता तरी थोड गांभीर्याने घेऊया. सुरुवातीला गेल्या पावसाळ्यात झालेले नैसर्गिक बदल पाहू.

पन्हाळ्याचा मुख्य मार्ग बंद :

     प्रत्येक वर्षी पावसाळा आला कि बुधवारपेठ ते पन्हाळा हा रस्ता सगळ्यांची धाकधूक वाढवतो. बेसाल्टच्या दगडी शिळा उघड्या पडल्या आहेत. त्या कधीही कोसळू शकतात. त्या दगडाच्या सभोवतालची माहिती पाऊस, धूप यामुळे मोकळी झाली आहे. दरड कोसळण्याचा धोखा ओळखून गेल्या पावसाळ्यात पावसाचे प्रमाण वाढल्यावर रस्ता वाहतुकीसाठी बंद केला होता परंतू पावसाचा जोर वाढत केला अन रस्ता खचला काही ठिकाणी दरड हि कोसळली. 


आपटीतील भूस्खलन:

            आपटीमध्ये गावामधून ५ फुट जमीन काही ठिकाणी खचली आहे . याची लांबी साधारणता दीड किलोमीटर आहे. येत्या पावसाळ्यात हा भाग सुटण्याची दाट शक्यता आहे. तसेच याच गावातील काही घरे १५ फुट एका रात्रीत खचली आहेत. या ठिकाणी सहकाऱ्यांच्या सोबत पत्रकार घेऊन जावून स्टोरी बनवून सर्वांच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला होता.

 

बादेवाडी:

           पन्हाळा परिसरात काही ठिकाणी भूस्खलन झाले आहे तर बादेवाडी येथे जमीन वर आली आहे. बादेवाडी येथील लोहार कुटुंबीयांची सात घरे आहेत. त्यातील काही घरे जमिनीस फुगवटा येवून कोसळली आहे. जमिनीस फुगवटा येण्यास सुरुवात जेव्हा झाली होती तेव्हा त्याचा व्हिडिओ बनवला होता तो हि येथे शेअर करत आहे. परस्थितीचे गांभीर्य समजेल. माझे एक पत्रकार मित्र त्यांनी एक किस्सा सांगितला. सुरुवातीला एकच घर पडले होते ते पाहण्यासाठी प्रशासकीय अधिकारी अन ते गेले होते तेव्हा त्यांच्यासमोर काही घर उचलली गेलीत. 

 

पुसाटी व मसाई पठारास जोडणारी सोंड-

      मसाई पठार व पुसाटी बुरुज यांच्या दरम्यान एक सोंड गेली आहे. ही सोड बेसाल्ट च्या शिळामुळे आपले लक्ष वेधून घेते. या ठिकाणी फरसबंदी वाट खूप सुंदर आहे नव्हे थोडी शिल्लक आहे म्हणावी लागेल. असो येथेही मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आहे.

पन्हाळ्याच्या सभोवतालचे भूस्खलन :

        बांबरवाडी , बुधवारपेठ, नेबापूर, आपटी, वेखंडवाडी , बादेवाडी ,राक्षी, निकमवाडी , धबधबेवाडी , सोमवारपेठ , इंजोळे आदी ठिकाणी घरांना मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. घरे खचणे, तडे जाणे या गोष्टी आपल्याला दिसून येतात परंतू या परिसरात डोंगर खचलेत . जंगल परिसरात जास्त कोणी जात नसल्याने या परिसरात घडामोडी समोर येत नाही. वरच्या सर्व गावातील अनिवासी ठिकाणे पाहिली आहेत. त्याचे फोटोग्राफ माझ्या संग्रही आहेत. मसाईपठारास जाणारा रस्ता खचला हि गोष्ट आपल्या लगेच लक्षात आली. परंतू याच्या शेजारील ऑस्ट्रेलियन बाभळ असणारी कुरणे किती खचलीत याकडे आपल किती लक्ष गेले ?        




पन्हाळगडाच्या घेऱ्यातील भूस्खलन होण्याची संभाव्य कारणे :

      पन्हाळा परिसरामध्ये डोंगरउतार , सपाट भूभाग येथे मोठ्या प्रमाणावर विदेशी झाडे लावली आहेत. यावर कोणतीच जैवपरिसंस्था निर्माण होत नाही. याची मूळे खोलवर रुजत नाहीत. ही झाडे अल्पायुषी असल्याने मूळ कुजली जातात .त्यात पाणी शिरल्याने ती उन्मळून पडतात. पन्हाळ्याच्या सभोवताली लावलेली झाडे भूस्खलनाच्या दृशिकोनातून खूपच धोकादायक आहेत. जिथे वर्षानुवर्षे कोणती झाडे उगवली नाहीत. अशा ठिकाणी ही झाडे प्रशासनाने विचार न करता लावली आहेत. या परिसरात जमीन खूपच खचली आहे या ठिकाणी देशी झाडे लावली गेली पाहिजेत. 

                                    श्री. दिनकर चौगुले

                              पर्यावरण अभ्यासक , पन्हाळा       


वृक्षारोपण :  

         पन्हाळा परिसरात काही हिरवीगार ऑस्ट्रेलियन बाभळीची झाड असणारी कुरणे मोठ्या प्रमाणत दिसतात. पण आम्हाला एक गोष्ट जाणवली पन्हाळ्याच्या सभोवताली असणारी हि सगळी कुरणे खचली आहेत. सपाटीवर असणारी पण झाडे उन्मळून पडली आहेत. त्याबाबत पन्हाळा परिसरात परिचित असणारे पर्यावरण अभ्यासक श्री. दिनकर चौगुले यांना विचारले असता ही झाडे किती धोकादायक आहे हे सप्रमाण सांगितले. या झाडावर सुरुवातीला पक्षी पण घरटी करत नव्हते पण आता या परिसरातील सगळ्या बाभळी संपल्या सुगरणी समोर पर्याय नसल्याने या झाडावर त्या घरटे करू पाहत आहेत. घरटीहि झाडावर टिकत नाहीत. इतकी ती कमकुवत आहेत. पन्हाळ्यावर मोठ्या प्रमाणावर अशी झाड दुर्गप्रेमींनी लावली आहेत. अन सभोवताली वनविभागाने लाविली आहेत.   

नैसर्गिक जलस्त्रोत नष्ट केले.

     समाजमाध्यमांवर पन्हाळ्यातील आम्ही काही युवक एकत्र येऊन "सेव्ह पन्हाळा" नावाचे जनजागृती अभियान राबवत होतो . यामध्ये पन्हाळा परिसरातील ऐतिहासिक अवशेष व जैवविविधता यांचे अतिवृष्टीनंतर चित्रण केले होते. यामध्ये पन्हाळ्याच्या जैवविविधतेवर काम करणारे सत्पाल गंगनमाले व मी फिरत असताना आम्हाला एक गोष्ट जाणवली. जे नैसर्गिक पाणवठे होते ते बुजवून त्यावर विकासकामाचा रथ भरधाव वेगाने धावत आहे . डोंगर उतारावरील पाणी पायथ्याच्या तळ्यात साठत  तेथून खालच्या तळ्यात अशी निसर्गाने कलेले पाण्याचे जलव्यवस्थापन आम्ही मोडले याचा परिणाम गेल्या पावसाळ्यात जाणवला. नेबापूर येथे एक तळ होत ते कोणी मुजवल माहित नाही. परंतू अतिरिक्त पाण्याचे विघटन झाले नसल्याले पाण्याच्या दाबामुळे रस्ताखालची जमीन वाहून गेली त्याचबरोबर जवळील शाळेची इमारत पण ढासळली असावी. शेजारील कुंभार वस्तीमध्ये घरात पाणी शिरले. नेबापूरच्या दलित वस्तीतही अशा समस्यांना तोंड द्यावे लागले. या तळयाव्यतिरिक्त अनेक ठिकाणचे नैसर्गिक डोह मुजवले त्याच्या जवळच भूस्खलन झाले आहे.   

शेतजमीनीमध्ये बांधकाम व खाणकाम:

         पन्हाळ्याच्या कुशीमध्ये अनेक शतके वेगवेगळी आव्हाने झेलत भूमीपुत्र राहत आहेत. गावठाण सोडून फारच कमी लोकांनी घर बांधली असतील. परंतु यांच एकच चुकले यांनी शेतजमीनी विकल्या. या ठिकाणी विकएंड ला येणाऱ्या गडगंज लोकांनी या शेतजमिनीत टुमदार बंगले बांधले. डोंगर उतारावरील जमीनीचे सपाटीकरण केले. बांधकामा आड येणारी मोठमोठी झाडे तोडली. त्या ठिकाणी शोभिवंत झुडप लावली. पन्हाळ्याच्या सभोवतालचे डोंगर जितके पोखरता येतील तितके पोखरले. प्राण्यांच्या आदिवासात जितका हस्तक्षेप करता येईल तितका केला . अन बिबट्या लोकवस्तीत आला म्हणायला आम्ही मोकळे ? असो ! गेल्या पावसाळ्यात पन्हाळ्याचा रस्ता खचला होता यामुळे प्रशासनाला , स्थानिकांना खूप त्रास करावा लागेल. हे माहित असून देखील बुधवारपेठेजवळ पावनगडाचा डोंगर मुख्य रस्ता या दरम्यान सपाटीकरण किती झाले ? हे एका रात्रीत तर झाले नाही मग हे कोणालाच कसे दिसले नाही ? पावनगडाच्या बुरूजापासून अवघ्या १०० मीटर परिसरात दगडाची खाण सुरु आहे. असेल खाजगी जागेत पण याचे परिणाम किती भयानक होतील याची काही प्रशासनाला कल्पना नाही का ? पावनगडाची काही ठिकाणी दरड कोसळली आहेच . या पावसाळ्यात यामुळे आणखी काही ठिकाणी कोसळेल ! माय बाप सरकार राहू दे गडाचे संर्वधन करायचे जें शिल्लक आहे त्याचे तर रक्षण करूया. फॉर्महाउस बांधून राहणाऱ्या लोकांची ही मौज करण्याची ठिकाण असतील परंतू शेकडो वर्षे राहणारी लोकांचे हीच एकमेव कर्मभूमी आहे. हीच मायमाउली आहे. हिच्या रक्षणासाठी आता स्थानिकांनी सज्ज झाले पाहिजे.    

आता यावर उपाय काय ?

           पन्हाळ्याचे क्षरण वेगाने होत आहे हे आपण पूर्णतः थांबवू नाही शकत परंतू थोडा वेग नक्कीच कमी करू शकतो. जेव्हा अशा समस्या निर्माण होण्यास सुरुवात झाली तेव्हाच ठोस पाऊले उचलायला हवी होती परंतू दुर्दैवाने उचलली गेली नाही. परंतू अजूनही वेळ गेली नाही . पन्हाळा व आसपासच्या घेऱ्यातील गावात कोणत्याही प्रकारची जमीन विकण्यास परवानगी नाकारली पाहिजे. गावठाण सोडून कोणत्याही प्रकारचे बांधकाम करता येणार नाही तसेच खाणकाम उदा. स्टोन क्रेशर आदींवर बंदी आणली पाहिजे. शेतजमिनीमध्ये डेव्हलपमेंटच्या नावाखाली निसर्गाला हानी पोहचतील असे कोणतेही बदल करता येणार नाही. स्वतःच्या मलिकीची ही देशी झाडे तोडता येणार नाहीत. पाण्याचे डोह , तळी मुजवनाऱ्यावर कठोर कारवाही केली गेली पाहिजे.

      पन्हाळ्याचे ऐतिहासिक वास्तू संवर्धित करायच्या असतील तर त्याची डागडुजी पुरातत्व विभागाने केली पाहिजे . अशास्त्रीय व विना परवाना संवर्धन करणाऱ्या संस्थावर कारवाही केली पाहिजे . तटबंधी किंवा कोणत्याही ऐतिहासिक वास्तू जवळ मोठी वाढणारी देशी व कोणत्याही प्रकारची विदेशी झाडे ऊसलागवड केल्यासारखी लावू नयेत. यामुळे संवर्धन राहू द्या उरलेसुरले अवशेष तरी राहतील . तीन दरवाजा मधील वाहतूक पूर्णपणे बंद केली पाहिजे. तेथील सांडपाण्याचे हि व्यवस्थित सुनियोजन केले पाहिजे. 

      मला गेल्या काही वर्षात जाणवले ते मी मांडले . पण यावर विचार मात्र नक्की करा . छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला पन्हाळा व परिसर अबाधित राहिला पाहिजे हीच भाबडी अपेक्षा . बहुत काय लिहिणे !