Thursday, July 18, 2024

सातमाळा रेंज(धोडप-इखारा-कांचना-मंचना-कोळधेर-राजधेर)

 

रेंज ट्रेक करायचा म्हणचे पुरेसा अभ्यास आणि वेळ हातात घेऊनच डोंगरात जावं लागतं आणि हेच आजकालच्या आमच्या सारख्या घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या आणि करिअरच्या मागे पडलेल्यांना जमत नाही, यालाच काहीशी बगल देत जुने लोक जसे फिरायचे तसं फिरुया आणि याचीच प्रचिती म्हणून राजगड-तोरणा-रायलिंग-लिंगाणा हा रेंज ट्रेक नोव्हेंबर मध्ये वाटा भरकटत का होईना पण पूर्ण केला. कॅलेंडर बघितलं असता महाशिवरात्रीची सुट्टी शनिवार रविवारला लागून आली होती, मग काय आलेली संधी सोडायची नाही, आणि त्या दृष्टीने हर्षल दादा, मी, प्रिसिलिया नवीन कुठली रेंज करायची या दृष्टीने अभ्यास करायला लागलो.अलंकार ने तर त्याला बोलल्यावर लगेच सुट्टी देखील टाकली, त्याच म्हणणं एकच - "तुम्ही जिथे कुठे जाल तिथे मी येईन". प्रमोद, पराग आणि सोबतीला परागचा मित्र आकाश चाकणे(चोको) देखील तयार झाला. हर्षल दादाचं तळ्यात मळ्यात होतं. एकंदरीत सहा जण तर तयार होतो. परागने मध्येच टांग दिली आणि त्याच्या जागी सागर तयार झाला आणि अखेरीस आमचा सहा जणांचा चमू या सातमाळा स्वारीसाठी तयार झाला.


दिवसेंदिवस उन्हाची तिरीप वाढत होती, त्यामुळे ठिकाण बदलण्याचे विचार देखील चालू होते, पण नीट काही जुळत नव्हतं, शेवटी जे ठरवलंय तेच करूया आणि तडीस नेऊया असं म्हणून बॅगा भरल्या आणि घराचा उंबरठा ओलांडला. गुरुवारी रात्री पनवेल-ठाणे- कसारा करत दीडच्या सुमारास कसारा गाठलं, गाडीवाल्याशी अगोदरच बोलून ठेवल्याने ते देखील तिथे गाडी घेऊन हजरच होते. लागलीच प्रवासाला सुरुवात करून धोडपच्या पायथ्याचं गाव हट्टी च्या दिशेने गाडी रवाना झाली. चहासाठी मध्ये थांबा घेऊन साडेचारच्या आसपास हट्टी गावात प्रवेश केला. सार गाव निद्रिस्त झालं होतं अगदी पारावरची कुत्री देखील,त्यामुळे आसमंतात एक वेगळीच निरव शांतता पसरली होती, आमचा काय तो आवाज ती शांतता भंग करत होता. किल्ल्यावर माची आहे तिथेच जाऊन काय तो आराम करूया म्हणून सामान सर्वांकडे सारखं वाटून घेतलं, भाकरी भाजी आणली होती ती थोडीफार पोटात ढकलली आणि ड्रायव्हर काकांना निरोप देऊन आम्ही धोडप किल्ल्याची वाट धरली. गावातून जाणारा रस्ता नंतर माळावर घेऊन गेला.
चांदण्यात न्हाऊन निघालेला धोडप 
त्या माळावरून चांदण्यात न्हाऊन निघालेल धोडपच रूप, विशेषतः नजरेत भरणारी धोडपची खाच पाहण्याजोगी होती. वाट बऱ्यापैकी रुंद आणि मळलेली होती. पाणवठ्याच्या बाजूने जात असताना एक बाईकस्वार त्या रात्रीची शांतता भांग करत गेला. माळ संपून चढाला सुरुवात झाली आणि किल्ला आमच्या एक एक पाऊल जवळ येऊ लागला. त्या किर्र शांततेत चालत असताना मध्येच होणारी पालापाचोळ्याची सळसळ नजर त्या दिशेने खेचून घेत होती. हवेतील गारवा अंगातून घाम येण्यास मज्जाव करत होता, पाठीवरच्या बॅगेमुळे पाठ तेवढी न्हाऊन निघाली होती. तासाभराच्या चालीनंतर तटबंदी लागून माचीवर प्रवेश केला.

अंधारात चालत असताना कुठला तरी शॉर्टकट घेतला आणि सर्वप्रथम लागणाऱ्या दरवाजाला बगल देऊन आम्ही गणपतीची मूर्ती कोरलेल्या टाक्याजवळ प्रवेश केला.
 गड चढत असताना माचीवरच्या मंदिरातून भजनाचा आवाज येत होता, महाशिवरात्री निमित्त मंदिरात कार्यक्रम आहे हे त्यावरून निश्चित झालं होतं. आवाजाच्या दिशेने पावले टाकत असताना त्या टाक्याच्या वरच्या बाजूलाच दोन मोठ्या कढई ठेवलेल्या दिसल्या, बाजूलाच एक घर होत तर वाटेच्या दुसऱ्या बाजूला पत्र्याच केलेलं मोठं बांधकाम होतं, ते काय होत ते काही कळलं नाही. मंदिराकडे जाणारी ही वाट दगड टाकून राजमार्गासारखी केली होती. वाटेत एक पाण्याचं टाक आणि मारुतीचं मंदिर लागलं आणि समोरच्या मंदिरातील विजेचा दिवा आमच्या नजरेत भरला. मंदिर जवळ केलं, भजन चालू होत, एक ताई मंदिरात शिवलिंगाची पूजा करत होती. एका बाबांचा मुक्काम इथे असतो त्यांचं घरवजा आश्रम देखील मंदिराला लागून होत. मंदिराच्या मागे शिवलिंगाकृती टाकं होतं त्यात उतरायला पायरी मार्ग आहे. घड्याळात सव्वा सहा झाले होते. बॅगा पाठीवरून खाली उतरवल्या, महाशिवरात्रीच्या दिवशी एखाद्या गडावरील शिवलिंगाच दर्शन घेणं ही गोष्ट भारीच होती. दर्शन घेऊन बाहेर आलो तर त्या ताई रांगोळी काढत होत्या आणि हा मोह काही मला आवरता आला नाही, हो नाही हो नाही करून रांगोळी घेतली हातात आणि मी देखील तिथे रांगोळी काढू लागलो. रांगोळी काढून होते न होते तोच त्यांनी आम्हाला चहासाठी आग्रह केला, आता तसंही तांबडं फुटू लागलं होतं आणि नभोमंडळी पसरलेलं लोभस चांदणं प्रातःकाळच्या रंगछटांमध्ये विरळ होत चाललं होतं. चुलीवरचा गरमागरम उकळता चहा कपात आणि कपातून घशाखाली उतरल्यावर डोळ्यांवरची झोप कुठल्या कुठे पळून गेली. जवळ असलेली बिस्किटे खाऊन पोटातील आतडी गरम करून मंदिराला आणि मंदिरातील माणसांना निरोप देऊन किल्ल्याची वाट धरली.
किल्ल्याची वाट ही परत मागे त्या गणेश टाक्याच्या इथून वाडीत जाते, या वाटेने चालत असता हनुमान मंदिर दिसलेलं तिथं वाटेच्या दुसऱ्या बाजूला उघड्यावर शंकराची पिंडी आणि टाकं देखील दिसलं, थोड्या वेळापूर्वी काळोखात आल्यामुळे हे काही आम्हाला दिसलं नव्हतं. हे सर्व काही पाहत वाट चालत असताना डावीकडे उठावलेला धोडपचा अजस्त्र सुळका आम्हाला त्याच्याकडे खेचून घेत होता. वाडीत पोहोचलो, इथून एक वाट गडाकडे जाते तर एक वाट सरळ चाललेली दिसली ही वाट कुठे जाते बघूया म्हणून तिकडे चाल धरली तर वाडी संपून आम्ही महादरवाजापाशी येऊन पोचलो. रात्री चालताना कुठला तरी शॉर्टकट घेतल्यामुळे आमची जी वाट या दरवाजातून येणार होती ती गणेश टाक्याच्या इथून आली. दरवाजा अजूनही चांगल्या स्थितीत आहे, दोन्ही बाजूचे बुरुज देखील भक्कम उभे आहेत. आल्या वाटेने परत फिरत वाडीत घरांच्या बाजूला एका झुडपात बॅगा ठेऊन किल्ल्याची वाट धरली.
दगडांनी फरसबंदी केलेली वाट 

वाडीमध्ये माणसं असावीत असा अंदाज होता, पण मनुष्यप्राण्याचा इथे अभावच होता. काही घरांना कुलूप लावलं होतं पण तरी तेथील आजूबाजूच्या स्थितीवरून इथे कोणीच राहत नाही हे निश्चित. वाडीतून किल्ल्याकडे जाणाऱ्या वाटेला लागलोच तर डाव्या बाजूला बांधकाम सदृश दिसलं पाहायला गेलो तर ते बांधकाम म्हणजे एक दुमजली विहीर होती. काटकोनात वळणाऱ्या पायऱ्या, रेखीव कमान आणि आत असलेलं थंडगार पाणी, किल्ल्याचं किल्लेपण खूप काही सांगून जात होतं. किल्ल्याची पायऱ्यांची वाट धरली इथे देखील सारी वाट दगडांनी शाकारली होती. त्या दगडांवरून चालताना कंटाळा येत होता. चढ देखील चांगलाच छातीचा असल्याने घामाच्या धारा निघत होत्या. हा चढ चढत असताना वर खाचेच्या इथे दिमाखाने फडकत असलेला भगवा, किल्ल्याच्या कडेला लावलेले रेलिंग, आकाशाशी भिडलेला सुळका आणि अशीच नजर फिरवत असता नजर एकाकी खिळली ती पायऱ्या चढत असताना किल्ल्याच्या उत्तर टोकाला चऱ्या(बुरुजावर लावलेले पाकळीच्या आकाराचे दगड) असलेल्या बुरुजाने. खूप कमी किल्ल्यांवर अशा चऱ्या असलेले बुरुज पहावयास मिळतात. तासाभराच्या चालीत लोखंडी जीना गाठला होता, दगडात कोरलेल्या पायऱ्या देखील तेथे होत्याच.
दुरून नजरेत भरणारा चऱ्या असलेला बुरुज  
जुन्या दगडात कोरलेल्या पायऱ्या आणि आताचा लोखंडी जीना 
तिथून लगेच पुढचा चढ चढू लागलो आणि अवघ्या काही मिनिटात पुढच्या दरवाजापाशी येऊन पोचलो, इथे दरवाजा आणि बाजूच्या बुरुजांवर माकडांची टोळी आमच्या स्वागताला उभी होतीच.त्या दरवाजातून पुढे जपून जात आम्ही आता चऱ्या असलेल्या बुरुजाच्या वरच्या अंगाला पोचलो होतो.
कातळकोरीव पायऱ्या आणि बालेकिल्ला प्रवेशद्वार 
इथे दरवाजात असताना एक वाट डावीकडे जात होती, आणि तीच वाट किल्ल्याच्या वरच्या भागात घेऊन जाणारी असावी असा आमचा समज होता, म्हणून अगोदर दरवाजाच्या पुढे काय आहे ते बघून येऊया म्हणून ही वाट धरली आणि वाट आम्हाला पुढे पुढे घेऊन जाऊ लागली तस पाण्याचे टाके दिसले आणि किल्ल्याच्या वरच्या भागाच्या बुरुजावर झेंडूच्या फुलांची केलेली सजावट दिसली, तिकडे काहीतरी असणार या आशेने मोर्चा तिकडे वळवला. कातळावरून चढून एकदम मी कातळ कापून कोरलेल्या पायऱ्यांपाशी येऊन पोचलो, बाकीच्यांना देखील आवाज देऊन येण्यास सांगितलं. इथे लावलेली झेंडूची फुले माकड सेना खात होती, त्यामुळे ती तोरणं तुटून सगळीकडे फुलांचा सडा पडला होता. पायरीमार्गाने वर चढून दरवाजात प्रवेश केला. दरवाजाच्या अलीकडे भिंतीवर दोन फारसी भाषेतील शिलालेख आहेत,तर दरवाजाच्या इथे सैनिकांसाठी देवड्या देखील आहेत. दरवाजात प्रवेश केला तर पुढे असलेल्या चोकोने पुढे थांबलेली माकडसेना बघून माघार घेतली आणि अजून कोणीतरी पुढे जा अस सांगितलं. दरवाजातून पुढे आल्यानंतर एक शेंदूर फासलेला दगड होता, त्याचा बाजूला सिमेंटचा कोबा केला होता. पाण्याच कोरडं टाकं देखील होत.
पडके अवशेष 
एकच पायवाट असल्याने तीच धरून चढ चढलो तर समोर पडक्या वाड्याचे अवशेष होता, वाड्याचा काही भाग चांगला उभा होता. बाजूलाच पाण्याचं टाकं देखील होतं. किल्ल्याच्या वरच्या भागात पोचलो होतो, त्यामुळे टाक्याच्या इथेच पाणी पिऊन आणि जरा विसावून लगेच पुढच्या गडफेरीला आरंभ केला. इथून सुळक्याच्या दिशेने जाताना सुळक्याच ते अभाळस्पर्शी, अभेद्य रूप त्याच्या रौद्रावताराची जाणीव करून देत होता.

धोडपचा अजस्त्र सुळका, उजव्या
बाजूला सुळक्याच्या पोटातील गुहा 
या सुळक्याच्या पोटात कोरलेली गुहा लक्ष वेधून घेत होती. पुढचं लक्ष हे ती गुहाच होती. गुहेपर्यंत जाणारी पहिली पायवाट ही घसाऱ्याची आणि नंतर कातळचढाईची होती. सरकत सावरत ही चढाई संपून गुहेत पोचलो. जणू काही कातळ कापून अलगद तुकडा बाहेर काढावा अशी २ खांब असलेली ही बैठी गुहा प्रशस्त आहे. या गुहेतून समोर पूर्वेला नजर भिरकावली असता इखारा सुळका आणि समोरची डोंगररांग थेट नजरेत भरते.
गुहेतून समोर दिसणारा इखारा 
गुहेतून खाली उतरून सुळक्याला उजवीकडे ठेवत किल्ल्याच्या मागच्या भागाकडे चालत असताना सुळक्याच्या पोटात खूप साऱ्या गुहा आणि पाण्याच्या टाक्या लागतात. यातील एका गुहेत धोडंबादेवीचं मंदिर देखील बांधण्यात आलं आहे. गडदुर्गेचं दर्शन घेऊन आमची स्वारी आता किल्ल्याचं खास आकर्षण असलेल्या खाचेच्या इकडे म्हणजे पश्चिम टोकाकडे वळवली. धोडप हा सातमाळा डोंगररांगेच्या मध्ये आहे त्यामुळे त्याच्या पूर्वेला असताना इखारा, हंड्या, लेकुरवाळी, कांचना-मंचना हे डोंगरकिल्ले दिसतात तर पश्चिमेला रवळ्या-जवळ्या, मार्कंड्या, कण्हेरगड, सप्तशृंगी हे गडकोट दिसतात. हा सर्व सह्याद्री डोळ्यात सामावून घेता घेता कधी त्या खाचेपर्यंत आलो ते समजलं देखील नाही. इथलाच भगवा २ तासांपूर्वी आम्हाला त्याच्याकडे बोलवत होता आणि आम्ही पोचलो देखील होतो. समोर डोलणारा भगवा, ती खाच, लांबच लांब पसरत गेलेली खाचे पलीकडील धोडपची माची आणि मागे बेलाग सुळका, धोडपच ते अद्वितीय रूप मनात घर करत होतं.
इथपर्यंत पोचायला आम्हाला साडेनऊ झाले होतो, एकंदरीत गडफेरी झाली होती आता त्या खाली लोखंडी जीना चढून आल्यावर डाव्या बाजूला काय आहे ते बघून गडउतार व्हायचं होतं. आता भूक देखील लागली होती म्हणून खाली जो दरवाजा पहिला होता तिथेच थांबून नाश्ता करू, पाण्यासाठी विहिरही बाजूला आहे आणि तिथूनच पुढची वाट इखाऱ्याकडे जाते म्हणजे तीच जागा सोईस्कर पडेल यावर सर्वांच एकमत झालं. खाली उतरून त्या रेलिंग च्या डाव्या बाजूला गेलो, रेलिंगच्या पार टोकापर्यंत गेलो, पण तिकडे पाहण्यासारखं अस काहीच नाही. पावले माघारी फिरवून वेगाने खाली उतरलो बॅग जिथे ठेवल्या होत्या तिथून बॅग बाहेर काढल्या प्रमोद,सागरला पाणी आणायला पाठवलं तर मी प्रिसी आणि आकाश दरवाज्यात जाऊन नाश्ता बनवायला लागलो. ब्रेड आणि गरमागरम शेवभाजीवर यथेच्छ ताव मारून आणि त्या दरवाजात फोटोशूटच्या झालेला मोहाला आवर घालून सव्वाअकराच्या सुमारास आम्ही इखारा सुळक्याच्या खाली असलेल्या आश्रमाकडे कूच केली.
सांगाती मध्ये वाचल्याप्रमाणे इथून आम्हाला आश्रमापर्यंत पोचायला दोन तास लागतील, पण गूगल मॅप वर हे अंतर बघता इतका वेळ नाही लागणार हे कळत होतं, पण सांगू नाही शकत पुढचा रस्ता कसा आहे, त्यामुळे दोन तासांचं गणित पकडून वाट धरली, रस्त्यात एक मामा भेटले त्यांना विचारलं असता ते बोलले २५-३० मिनिटात पोचाल तुम्ही आश्रमात. मामांची ही गुगली आम्हाला कोड्यात टाकणारी होती. एवढं मात्र नक्की २०-२५ मिनिटं नक्कीच नाही पण दोन तास देखील नाही. धोडपच्या उत्तरेला असलेल्या हनुमंतपाड्यातुन एक वाट दरवाजाच्या पुढे येऊन मिळते त्या वाटेवरून काही गावकरी स्त्री-पुरुष, लहान मुलं असा सगळा गोतावळा येत असताना दिसला त्यांच्याशी बोलता बोलत कळलं की ते देखील आश्रमात चालले आहेत, त्यांची नेहमीची वाट त्यामुळे त्यांची चालण्याची गती भारीच होती, आपण जर यांच्यासोबत राहिलो तर लवकर पोचू. या सर्वांत पुढे असलेल्या दत्ताभाऊंशी मी बोलू लागलो आणि त्याच्याच सोबत चालत असताना कळलं की हा सगळा त्यांच्या परिवार आणि शेजारच्या चार-पाच बाया-बापड्या महाशिवरात्रीनिमित्त आश्रमात चाललेत. दत्ताभाऊ इथल्या एकएक गावाची ओळख सांगत होते, धोडांबे गावात असलेल्या प्राचीन शिवमंदिराबद्दल पण त्यांनी सांगितलं. पण येताना रात्र असल्यामुळे आम्हाला ते पाहता आलं नाही. त्यांच्यासोबत आलेली बच्चेकंपनी देखील एकमेकांची मजा मस्ती करत चालली होती. धोडपची तटबंदी आणि बुरुज पार करून छोट्याश्या घळीत उतरून समोरच्या इखाऱ्याच्या डोंगराला लागलो देखील.
धोडप माचीवरील तटबंदी,दरवाजा,आणि धोडप सुळका व खाच आणि गावकरी 
पठारावरून चाललेली चाल समोर दिसत असलेला इखारा सुळका डाव्या बाजूला दरी दूरवर दिसणार हनुमंतपाडा गाव मागे दूर होत चाललेला धोडप तर उजव्या बाजूला खाली हट्टी गाव...आणि मध्ये मध्ये दिसणारी हिरवीगार शेती आणि शेततळी इथल्या शेतकऱ्यांच्या समृद्धतेची जाणीव करून देत होते. दत्ताभाऊ आणि त्यांच्या परिवाराशी बोलता बोलता आणि छोट्या बच्चेकंपनीची मजा घेत घेत चाळीसाव्या मिनिटाला आम्ही आश्रमात पोचलो देखील. इथे आम्हाला खालून येणारा मातीचा रस्ता देखील लागला, या मार्गाने गाडी देखील आश्रमापर्यंत आणली जाते.
गोरक्षनाथ मंदिर 
गोरक्षनाथांच मंदिर आणि बाजूला असलेलं आश्रम पाण्यासाठी विहीर आणि आजूबाजूला बहरलेली हिरवाई त्यामुळे मुक्कामासाठी ही जागा खरंच खूप सुंदर आहे. इथे दुपारचं जेवण उरकू अस ठरवलं होतं, पण तासाभरापूर्वीच केलेला पोटभर नाश्ता अजून तरी गरम होता,म्हणून पुढची चाल धरूया अस ठरलं. मंदिरात दर्शन वगैरे घेऊन पुढची वाट विचारू लागलो. दत्ताभाऊ पुढे कधी गेले नव्हते म्हणून त्यांनी अगोदरच हात वर केले, त्यांच्यासोबत असलेल्या एका वयस्कर आजोबांनी सांगितलं पण ते खूप वर्षांपूर्वी गेले होते त्यामुळे त्यांच्याकडून पण हवी तशी माहिती मिळाली नाही, एक दोन जणांना अजून विचारल पण ते देखील फक्त आश्रमात दर्शनासाठी आलेले असल्याने त्यांच्याकडून पण माहिती मिळाली नाही. सांगाती हे पुस्तक काढून पंचवीस पेक्षा जास्त वर्ष झाली आहेत, त्यामुळे ती माहिती असली तरी स्थानिकांचा सल्ला घ्यायचाच हे मनाशी पक्क केलेलं होतं. एवढ्यात एक म्हातारे आजोबा आश्रमात आले, त्यांना कांचना किल्ल्याकडे जाणाऱ्या वाटेबद्दल विचारलं असता ते सांगू लागले.

एव्हाना आम्हाला तिथल्या लोकांनी आश्रमाच्या पुढे दहा मिनिटांवर असलेल्या गरुड टाकल्याबद्दल सांगितलं होतं. पुढची वाट ते सांगू लागले आणि त्यांनी पुढे एक मंदिर वाटेत लागेल अस ते म्हणाले, मी सांगाती मध्ये पुढच्या दोन्ही डोंगरांची नावे वाचली होती, म्हणून त्यांना बोललो की हंड्या डोंगराला की लेकुरवाळी डोंगराला ते मंदिर आहे. स्थानिक नाव घेतल्यावर ते आजोबा देखील चकित झाले आणि मग ते अजून नीट पणे समजावू लागले. आमची ही चर्चा ऐकायला आम्ही सगळे तर होतोच त्या बरोबर आश्रमात आलेले इतर लोकही आमच्या चर्चेत सामील झाले.आजोबा असे मस्त दरवाजाला रेलून पायावर पाय ठेऊन सर्व सांगत होते. माझ्यादेखील एक एक प्रश्नाची उकल होत चालली होती. पुढचा प्रवास लक्षात घेऊन जो काही गप्पांचा फड रंगला होता त्याला विराम देऊन आश्रमातील सर्वांना निरोप दिला आणि आता पुढचा टप्पा होता हंड्या, लेकुरवाळी या डोंगरांना वळसा घालून कांचना किल्ल्यावर पोहोचणे.
गरुड टाकं 
घड्याळाच्या काट्यांनी बाराचा आकडा पार केल्यानंतर आम्ही आश्रम सोडलं, आता पुढची चाल ही लेकुरवाळी आणि हंड्या या डोंगरांना वळसा घालत सपाटीवरून जाणारी असली तरी या भागात झाडांचं प्रमाण नगण्य सगळा बोडका भाग त्यामुळे रखरखीत उन्हातून जाण्यावाचून आमच्याकडे पर्याय नव्हता. चाल धरली अगदी बाराव्या मिनिटाला आम्ही गरुड टाक्याच्या इथे पोहोचलो. आश्रमात येणारे बरेच लोक इथे येऊन अंघोळ करून आश्रमात दर्शनासाठी जातात, अस केल्याने आपली इच्छा पूर्ण होते असा समज इथे रूढ झाला आहे. तिथल्या लोकांना चालता चालताच पुढची वाट विचारून पुढे मार्गस्थ झालो.

टाक्याच्या पुढे थोड्याच अंतरावर एक घोडा मरून पडला होता. इथून पुढे वाट पठारावर गेली पठारावर भरपूर सारी गुर चरत होती. त्या गुरांपैकी एखादं दुसरं उधळल तर आपल्यापैकी एकाची गेम अशा विचाराने अंगावर एकदम काटा आला. लवकरात लवकर तिथून निसटून पुढे वाटेला लागलो, त्या कडक उन्हात मोकळ्या पठारावरून जात असलो तरी वाऱ्याची झुळूक हळूच स्पर्शून जायची त्यामुळे हायस वाटत होतं.
ही वाट समोर पठारावर जाणारी असली तरी मध्येच एका घळीत उतरली,घळीत उतरायच्या अगोदर इथे तटबंदी देखील पहावयास मिळाली, घळीत असलेल्या छोट्या टेकाडांना वळसा घालून पुढच्या पठारावर चढली. याच पठारावर दोन्ही लेकुरवाळी आणि हंड्या या डोंगरांना वळसा मारत पुढचा पल्ला गाठायचा होता. इखाऱ्याकडून पहिला आणि मोठा लागतो तो लेकुरवाळी डोंगर तर दुसरा आणि लेकुरवाळीच्या तुलनेत छोटा आहे तो हंड्या डोंगर अशी दोन्ही डोंगरांची नाव आहेत. आणि या दोहोंच्या मागे कांचना-मंचना ही जोडगोळी देखील आता नजरेत भरत होती. पठारावरची ही चाल मात्र एकदम रुक्ष होती, कारण समोर दिसणारे डोंगर सोडले तर विशेष अस काहीच नव्हतं. झाड तर नव्हतंच त्यामुळे सावली म्हणजे काय हे आम्हाला न विचारलेलंच बरं. आमचं नशीब म्हणून वाऱ्याची गार झुळूक या सबंध मार्गावर आमच्या सोबत होती, नाहीतर या उष्म्याने काय झालं असतं कुणास ठाऊक. झाड नाहीच शिवाय गवतही सगळीकडे सुकलेल आणि हा पठार दूरवर पसरलेला आणि आमच्याशिवाय तिथे दुसरं चिटपाखरूही नव्हतं. आमची अकरा नंबरची गाडी पाठीवर ओझी मिरवत चालू होती.
पठारावरच्या चालीचा आम्हा प्रत्येकाचा वेग वेगवेगळा होता आणि त्यातूनच मी प्रमोद पुढे, आकाश-अलंकार मध्ये तर प्रिसी-सागर मागे अशा आमच्या तीन जोड्या चालल्या होत्या. लेकुरवाळी डोंगर उजवीकडे ठेऊन वळसा मारत असताना एक ठिकाणी गवताच्या झाडोऱ्याने सावली झाली होती तिथे पाचेक मिनिटांचा विसावा घेऊन पुढची पायपीट लगेच चालू केली. वेळ आमच्या हातात खूप बऱ्यापैकी होता आणि कांचना-मंचना किल्ले देखील आता टप्प्यात आलेले दिसत होते. त्यामुळे कांचना किल्ल्यावर जाऊन इथे राहायचं की खाली हे कांचनावर जाऊन ठरवणार होतो ते आता खाली उतरून तांगडी गावाच्या देखील पुढे जाऊ अस गणित आम्हाला वाटू लागलं. तसही या तीन दिवसात आजच्याच दिवशीची चाल जरा मजबूत होणार होती, सकाळपासून आमची चाल बघता आम्ही वेळेच्या पुढेच होतो. त्यामुळे तांगडी गाव गाठून तिथे किंवा त्याच्याही पुढे मुक्काम करू यावर सर्वांनी होकारार्थी मान डोलवली आणि पुढे निघालो, बघता बघता लेकुरवाळी डोंगर मागे पडला आणि हंड्या डोंगराचा वळसा चालू झाला, इथे देखील हंड्या डोंगर उजवीकडे ठेऊन डाव्या बाजूने वळसा मारू लागलो, इखाऱ्याच्या खाली आश्रमात सांगितलेल्या बाबांनी हंड्या डोंगराच्या उजव्या बाजूने गेले असता सप्तश्रृंगी देवीचं मंदिर लागणार होतं पण आम्ही सांगातीप्रमाणे डाव्या बाजूची वाट धरली. एकमेकांच्यात अंतर असलं तरी सगळे हाकेच्या अंतरात आणि सर्वांची पावले एका लयीत होती. डोक्यावर ऊन देखील होतंच पण आपलं गंतव्य समोर दिसत असल्यामुळे त्या उन्हाची कुणाला फिकीर नव्हती. हंड्या डोंगर देखील पार केलं आणि परत पठारावरची चाल. या पठारावरून चालताना कांचना-मंचना अगदी समोर दिसत होते.
नजरेच्या टप्प्यातील कांचना -मंचना आणि खाली दिसणारा डांबरी रस्ता 
पावलागणिक कांचना-मंचना जसे जवळ येत होते तसे मागे पाहिलं असता हंड्या, लेकुरवाळी, इखारा आमच्यापासून लांब होत होते. पठारावरून खाली डाव्या बाजूला डांबरी रस्ता दिसत होता आणि कांचना गावातील घरे देखील नजरेत भरत होती. कांचना किल्ला समोर दिसत असला तरी ही पायपीट खाली थेट त्या डांबरी रस्त्याला खिंडीत नेणार होती आणि तिथून वर कांचना किल्ल्यावर चढवणार होती किंवा डांबरी रस्त्यावरून कांचना गावाकडे वाट वाकडी करून गावाच्या जवळून जाणारी वाट वर गडावर नेणार होती. पठाराच्या टोकाला पोचलो खालची ती खिंड,डांबरी रस्ता, त्या खिंडीतून वर चढणारी वाट तसेच कांचना गावातून किल्ल्यावर जाणाऱ्या वाटेवर लावलेला भगवा, आणि समोर कांचना-मंचना पल्ला अवघा दोन तासांचा देखील वाटत नव्हता. घडाळ्यात पाहतोय तर दोन वाजलेत, सकाळचे ब्रेड आणि शेवभाजी अजूनही पोटात तरतरीत होते त्यामुळे खाण्यासाठी थांबण्याची इच्छा नव्हती आणि त्याहून महत्वाचं थांबण्यासाठी सावली नावाचा काही प्रकारच नव्हता.
पठार सोडलं खाली उतरायची वाट धरली, आणि वाटेने रूपच बदललं. पूर्ण वाट घसऱ्याने(स्क्री) भरली होती. गुर चालून चालून त्या बारीक मुरुमाचा वाटेवर पडलेला सडा पाय वाटेवर थांबूच देत नव्हता. पुढे पाऊल टाकायचं सोडा, ठेवलेलं पाऊल उचलायची देखील हिंमत नव्हती. आणि खाली लगेच तीव्र उतार त्यात आधाराला क्वचितच काही ठिकाणी एखादं-दुसरं झाड होतं.
घसाऱ्याची वाट 
चुकून जरी पाय घसरला आणि पायातील अंतर वाढलं की गटांगळ्या खाल्ल्याच म्हणून समजा. भरीस भर म्हणून पाठीवरच्या सॅक होत्याच. अकरा नंबरची चाल आता बाजूला हात टेकून कुठे आधार घेऊन चालली होती. मी पुढे, माझ्या मागे प्रमोद, सागर प्रिसीची बॅग घेऊन उतरतोय प्रमोद त्याला गाईड करतोय,त्याच्या मागे प्रिसी हळू हळू सरकत सरकत खाली उतरत होती, तर मागे अलंकार आकाशचा हात धरून त्याला उतरवत होता. घसाऱ्याचा पहिला टप्पा पार झाला आणि झाडांच्या मध्ये आलो वाटलं संपली स्क्री आता चांगला रस्ता असणार, पाहतोय तर आताच समीकरण अजून बदललं होतं. आगीतून फुफाट्यात असं झालं होत. पाच पायांनी चालण्यावाचून आता पर्याय नव्हता, त्या घसऱ्यावरून जणू काही आम्ही रेंगाळत चाललो होतो, सगळं अंग धुळीने भरलं होत पण याची कुणालाच परवा नव्हती. घड्याळाच्या काट्यांनी इथे वेग घेतला होता, वाट जर नीट असती तर हा उतार उतरून खिंडीत पोचायला पंधरा मिनिटे देखील फार झाली असती पण या स्क्रीने आमचा तासाभरापेक्षा जास्त वेळ खाल्ला. सरकत-रेंगाळत का होईना पण सगळे सुखरूप पणे त्या खिंडीत पोचलो. खिंडीतून वर जाणारी वाट दिसली मात्र आता सर्वांना प्रचंड भूक लागली होती अंगातुन घाम देखील चांगलाच निघाला होता, परिणामतः विसाव्याचीदेखील गरज होती. खिंडीत झाड होतं तिथे पोचलो पण तिथे कुठला तरी मेलेला प्राणी टाकला असल्याने त्याच्या दुर्गंधीने खिंड सगळी दुमदुमली होती. त्यामुळे तिथे थांबणं शक्य नव्हतं. पुढे वाट चढायला घेतोय तर थकलोत भरपूर आणि भूकही लागलीय, आणि वर चढायला जातोय तर वर देखील थांबायला काही नसणार म्हणजे त्या वाटेने चढायचा सोडून कांचना गावाकडे जो भगवा ध्वज दिसला होता तिकडे जाऊन बघूया, सावलीच माहीत नाही पण या दुर्गंधीपासून तर सुटका मिळेल.
डांबरी रस्त्याची चाल म्हणजे अजून किचकीच, त्यात वरून आग ओकणारा सूर्य, पोटात उसळलेला भुकेचा कल्लोळ आणि या सर्वात सावलीचा मागमूस देखील नव्हता, त्यामुळे थांबाव तर कुठे या सर्व विचाराने डोकं भनभणत होत. भगव्यापाशी पोचलो, पण तिथे देखील थांबायला काहीच नव्हतं, गाव आमच्यापासून चार-पाच मिनिटांवर होतं पण आहे ती वाट सोडून दुसरीकडे जाऊन वेळ वाया घालवण्यात अर्थ नव्हता, एक छोटं झाड दिसलं त्याच्या खालीच बस्तान मांडून भाकरी काढल्या, सोबतीला सुका खाऊ देखील होताच. जेवणं उरकली, पाणी बऱ्यापैकी संपलं होतं, वर किल्ल्यावर गेल्यावर पाणी आहे हे माहीत होतं, तरी देखील जवळ पाणी असावं या उद्देशाने प्रमोद नको म्हणत असताना देखील सागरला गावात पाठवून चार-पाच बॉटल भरून आणायला सांगितल्या, तोवर आम्ही इथलं सर्व आवरून घेतलं, सागर आला आणि आम्ही कांचनाच्या दिशेने पावले टाकली, वाट दिसत होती ती धरली तरी देखील माघारी फिरून एका गावकऱ्याकडून वाटेची पुष्टी केली. मामांनी सांगितल्या प्रमाणे वाट धरली खरी, पण वाट इतकी काही मळलेली नव्हती, मात्र सध्या दुसरी कुठलीच वाट दिसत नव्हती म्हणजे आहे ती वाट योग्य असं समजून चाल धरली. चढ जरा छातीचा असल्याने गती जरा कमी होती. मघाशी घसाऱ्यावरून उतरताना आकाशचा वेग कमी होता त्यामुळे तो स्वतः मला येऊन बोलला आता नाही मागे थांबणार आता बरोबर चालेल विशाल. त्याचा हा दांडगा उत्साह बघून मला देखील बरं वाटलं. चढ चढत असताना पोटात जे काही ढकललं होतं ते छातीवरच राहील होतं, मध्ये थांबे घेत घेत उन्हाची तिरीप सहन करत गवतातून वाटेचा मागोवा घेत आमची पायपीट चालू होती. हा चढ चढून झाल्यानंतर एकाएकी भरपूर साऱ्या ढोरवाटा फुटलेल्या दिसल्या, आता झाली गच्छंती. कांचना-मंचनाची खिंड आम्हाला दिसत होती, पण गवत इतकं फोफावलं होत आणि ढोरवाटा इतक्या होत्या त्यात योग्य वाट मिळत नव्हती. आणि या वाटांपैकी वर जाणारी वाट दिसतच नव्हती किंबहुना नव्हतीच, सगळे शोधाशोध करायला लागलो पण काही नाही. शेवटी प्रमोदने एका ठिकाणी बोलावलं तिथे जाऊन पुढे वाट काही आहे का बघावं म्हणून घुसलो तर पायाखालची वाट कधी गुडूप झाली कळलं देखील नाही आणि हे इथे कितीतरी वेळा झालं. जायचय कुठे हे दिसत असून देखील कसं जायचं काही कळायला मार्ग नव्हता. कारण कुठूनही घुसलो आणि नंतर कडा लागला तर परत उतरण्याची पंचाईत. घुसूया अस मनाशी निर्धार केला आणि माहीत नाही कुठून कसा सरकत सरकत गेलो पण गेलो तो पहिल्या कड्याच्या वरच गेलो आणि तिथून वर जाऊन पाहिलं तर एक चांगली मळलेली वाट दिसली. कांचना वर जायचा पहिला टप्पा तर पार केलाय आणि आता वाट ही मिळालीय(बहुतेक तरी) म्हणून सर्वांना वर यायला सांगितलं. निरोप देताना इतकाच दिला -"ऐका रे! मी जिथे आहे... या दगडावरच तुम्हाला यायचं आहे, वाट काहीच नाही, पण पुढे वाट आहे चांगली मळलेली, मी ती बघतो पुढे, तुम्ही इथपर्यंत या,मी पुढे जाऊन येतो".
कांचना मंचना या दोहोंच्या खिंडीच्या बरोबर खाली मी होतो, आणि माझ्यासमोर जी वाट होती ती त्या खिंडीच्या बरोबर खाली या जोडकिल्ल्यांना समांतर चालली होती, कुठे तरी वाट वळून वर जाणार अस समजून सुरुवातीला मी खिंडीकडे बघताना डाव्या बाजूला चालू लागलो, चालतोय चालतोय वर जाणारी वाट काहीच दिसत नाही आणि खिंडीच्या तर भरपूर पुढे आलो होतो पार कांचना किल्ल्याच्या ईशान्येला असलेल्या पठारावर मी येऊन धडकलो, इकडे येताना परत माघारी फिरायचं आहे म्हणून बॅग एका ठिकाणी ठेऊन चालत होतो. पाणी प्यायला बघतोय तर ब्लॅडर मधलं पाणी संपलं होतं. वाट शोधण्यात इतका वेळ गेला आणि पाणी कधी संपलं ते कळलंच नाही.(बॅकअप वाली बॉटल होती, पण होता होईस्तोवर ते पाणी काढायचं नाही,म्हणून जवळच पाणी संपलय या अविर्भावतच मी पुढचा रस्ता धरला). पठारावरून पुढे त्या वाटेवरून गेलो असता किल्ल्याच्या मागच्या बाजूला जाऊन खाली उतरणारी वाट दिसली, एवढा वाटेचा गोंधळ उडाला होता, किल्ल्यावर कसे जाणार आणि त्याहून महत्वाच पुढच्या वाटेला कसं लागणार याच उत्तर ती समोर दिसणारी वाट देऊन गेली होती. पुढे जाणाऱ्या पावलांना माघारी खेचून घेतलं आणि योग्य वाट सापडली याचा मनात जल्लोष करत बाकी टीम गाठली. खालून सगळे चढत होते, पुरते दमून गेले होते, छातीचा चढ आणि त्यात पूर्णतः गवताने भरलेला डोंगर यामुळे एकंदरीतच सर्वांची हौस झाली होती. म्हणजे मलासुद्धा आश्चर्य वाटत होतं की या वाटेने मी वर चढलो होतो. आकाश पार थकला होता तरी तो असा काही त्या चढाला भिडला होता की जर तो पटकन घसरला तर काय होईल या विचाराने मी त्याला सावकाश रे, बस थोडावेळ आणि मग ये अस सांगितलं, त्याच्यामागे सागर होता, तर बाकीचे तिघे दुसऱ्या बाजूने चढत होते. आकाशला जसा मी सावकाश ये बोललो तसा त्यावर तो -"अरे विशाल, थांबलो तर संपलो" एवढंच बोलला आणि घोरपड जशी सरसर जाते तसा हा भाऊ वर यायला लागला, गवत-काट्यांची कोणतीही तमा न बाळगता. थोड्यावेळापूर्वी तो जे बोलला होता, की आता नाही मागे राहणार हे शब्द मला आठवले. सागर ला त्याच्या मागेच राहायला सांगून या सर्वांकडे मी वरून लक्ष देऊ लागलो. आकाश आला, सागर आला, मागोमाग अलंकार, प्रमोद आणि प्रिसी पण मी असलेल्या खडकपाशी येऊन पोचले. आकाशने तर आल्या आल्याचं बॉडी आडवी टाकून दिली. पाणी पिण्याचं देखील त्याच्यात अवसान नव्हतं. सर्वांना बसायला सांगितलं, आता इथे किल्ल्यावर जाणारी वाट शोधण्याबरोबरच पाण्याचा साठा बघणं जास्त गरजेचं होतं. सागरने जर ते गावातून पाणी आणलं नसत तर आमची एव्हाना पुरती वाट लागली असती. प्रमोद, मी, सागर पाणी आणि वाट दोन्ही शोधायला निघालो, मला जी चांगली मळलेली पायवाट दिसली होती तिच्या डाव्या बाजूला मी जाऊन आलो होतो, आता उजव्या बाजूला मोर्चा नेला होता.
गवत वगैरे हिरवळ दिसत होती पण पाण्याचा काही मागमूस नव्हता, किल्ल्यावर घळीत पोचल्यावर टाकं असणार हे माहीत होत पण तिकडे जायलाही काही मार्ग नव्हता आता मागे फिरणार होतो तरी अजून पन्नास शंभर पावलं पुढे जाऊन बघतो असं म्हणून पुढे गेलो तर एक खोदीव टाक्यासरशी दिसलं पण ते गवताने आणि मातीने भरलं होतं, पुढे बघूया काहीतरी असणार. शोधण्याचा उत्साह म्हणण्यापेक्षा इथवर आलोय तर अजून शोधुय कारण ज्या वाटेवर थोड्या वेळापूर्वी जाऊन आलो होतो तिकडे काहीच नाही हे निश्चित होतं. पावले पुढे टाकतोय, इतक्यात एका खडकात हंड्या एवढ्या आकाराचा डोह होता आणि त्यात पाणी पाझरत होत. पाणी पाझरून त्या हंडाभर डोहात साठत असल्याने स्वच्छ होत, गाळ होता त्यात पण तो तळाला होता.सागर आणि प्रमोदला आवाज देऊन सोबत आणलेल्या बॉटल आणि ब्लॅडर भरून घेतले, आम्ही देखील पोटभर पाणी पिऊन मागे थांबलेल्यांसाठी ही वार्ता घेऊन गेलो. उजेड असला तरी घड्याळाच्या काट्यांनी सहाचा आकडा पार केला होता. आकाशात देखील मावळतीला रंगछटा पसरत चालल्या होत्या.

दुपारी दोन वाजता समोरच्या पठारावर असताना एक भाकीत केलं होत की दोन तासात आपण कांचना वर पोचू आणि किल्ला पाहून आपण पुढे तांगडी गाव देखील गाठू. पण पठार उतरताना लागलेल्या घसाऱ्याने आणि नंतर कांचनाच्या चढावर वाटांच्या गुंत्यामुळे दोनाचे चार तास कधी झाले समजले नाही आणि दिवसभराचे श्रम देखील आता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होते. विशेषतः आकाशची झालेली हालत. आता जर पुढे ट्रेक सुरू ठेवतोय आणि आपल्या टीम पैकी एकाला जरी काही झालं तर पुढचं दोन दिवसाच गणित कोलमडणार त्यापेक्षा आज जर नीट आराम केला तर पुढचे दोन दिवस नीट जातील, तसही हा ट्रेक ठरवताना आजच्या दिवशीचा मुक्काम शक्यतो कांचनावर करायचा किंवा वेळ असल्यास तिथे जाऊन पुढे जायचं की नाही ते ठरवायचं असं ठरलं होत.
छोटा का होईना पण पाण्याचा साठा जवळ होता त्यामुळे उजेड आहे तरच त्या ईशान्येला असलेल्या पठारावर आपण मुक्काम करू शकतो, तिथून सात-आठ मिनिटांवरच पाणी असल्याने चिंतेच कारण नव्हतं. बॅगा पाठीला लावल्या आणि चाल धरली पठाराची, त्याचवेळी आम्ही जिथे बसलो होतो त्याच्या मागेच अलंकारला गवतात बसलेला फुरसे(saw scaled viper) दिसला, तोच विषय चघळत पुढची वाट धरली. आता देखील वर घळीत कुठून रस्ता जातोय का याकडे नजर भिरभिरत होती. पठारावर पोचलो, नीट जागा बघून ताडपत्री अंथरली आणि एकंदरीत गंतव्यावर पोचलो असं म्हणून पाठीवरून बॅग मोकळी केली आणि आजच्या दिवसापूरता सुटकेचा निश्वास टाकला. प्रमोद आणि मी पुढे जाऊन चक्कर मारून आलो.
मावळती
पाण्याच्या सगळ्या बॉटल कॅन काढून प्रिसी ला मुक्कामाच्या इथे थांबवून आम्ही सगळे पाण्याच्या इथे गेलो. पाण्याच्या त्या हंडाभर आकाराच्या डोहातून हळुवार पाणी काढत असताना त्या डोहात असलेला बेडूक मध्येच उधळायचा आणि म सगळा गाळ वर यायचं की थांबायचं, पाणी पाझरत असल्याने डोहात पुरेस पाणी साचायला वेळ लागायचा एकंदरीत हात पाय धुवून सर्व पाणी भरून होईपर्यंत अंधार पडला होता. खरंतर दिवसभराच्या इतक्या तंगडतोडीनंतर अंघोळीची गरज होती, पण पाण्याची कमतरता बघून हा मोह सर्वांनी टाळला. मुक्कामाच्या ठिकाणी आलो, फ्रेश झाल्यामुळे बरं वाटत होतं, गरमागरम सूप, चहा, आणि लगेच डाळ-भात पापड लोणचं कोशिंबीर अस साग्रसंगीत जेवण आणि हे सार महाशिवरात्रीच्या रात्री अब्जावधी चांदण्यांखाली कांचना किल्ल्याच्या कुशीत आम्ही अनुभवत होतो. दिवसभराच्या पायपीटीचा केव्हाच विसर पडला होता, हे अस काही आता आम्ही अनुभवत होतो की ते शब्दात सांगता येत नव्हतं. थकली भागली शरीरं आता विसाव्याच्या जागी असल्याने निवांत होती. कांचना किल्ला हा तिथे झालेल्या कांचनबारीच्या लढाईसाठी प्रसिद्ध होता. ऑक्टोबर १६७० मध्ये दुसऱ्या सुरत लुटीच्या वेळी महाराजांनी बागलाणकडे कूच केली असता दाऊदखान बऱ्हाणपूर वरून महाराजांना गाठण्यासाठी चांदवडला येऊन थांबला. स्वराज्यात जाण्यासाठी सातमाळा रांग ओलांडणे गरजेचे होते आणि दाऊदखान मध्ये येण्याची भीती होती, त्यामुळे महाराजांनी सेनेची दोन भागात विभागणी करून ५००० सेनेसह लुटीचा माल पुढे पाठवला तर १०००० सेनेसोबत महाराज त्यांच्या मागेच राहिले. १७ ऑक्टोबर १६७० साली सकाळीच कांचन बारीत युद्धाला तोंड फुटले, सहा तासांच्या या युद्धात प्रतापराव गुजर, मोरोपंत पिंगळे, आनंदराव,भिकाजी दत्तो यांच्यासह मोगलांवर आक्रमण करून ३००० मोगलांना कापून काढून मोगलांचा दारुण पराभव केला. गनिमी कावा न वापरता मैदानात उतरून मोठ्या फौजेचा लावलेला निकाल यामुळे ही कांचनबारीची लढाई इतिहासात प्रसिद्ध आहे. या युद्धाच्या परिणामामुळे दिंडोरीचा मुघल सुभेदार सिद्धी हिलाल महाराजांना येऊन मिळाला पुढे या भागातील सर्व किल्ले महाराजांनी स्वराज्यात सामील करून घेतले. ही गोष्ट आणि इतर गप्पा ठोकत आडवे होऊन डोळ्याला डोळा कधी लागला हे समजलं देखील नाही.
क्रमशः

सातमाळा डोंगररांग
सातमाळा डोंगररांग

          कांचनाच्या चढाने आणि त्याच्या अगोदरच्या घसाऱ्यामुळे कालचा दिवस लवकर आटोपता घ्यावा लागला आणि त्याच्या थकव्यामुळे रात्री डोळा लागला तो लवकर जाग न येण्यासाठीच, रात्री अचानक अंगावरून काहीतरी उडून गेल्याची चाहूल लागली, पण स्लीपिंग बॅगच्या बाहेर यायचं सोडा, डोळे उघडायची पण इच्छा झाली नाही, काय गेलं असेल उडून ते उद्या समजेल. साडेपाचच्या अलार्मने जाग आली, डोळे चोळीत उठलो आणि सर्वांना उठवण्याचं पाप देखील मस्तकी घेतलं. सकाळचा विधी उरकायला गेलेल्या प्रमोदला आम्ही ज्या पठारावर थांबलो होतो तिथून अवघ्या एक मिनिटांवर असलेलं पाण्याच टाकं दिसलं, काल पाण्यासाठी केलेली वणवण, त्या हंडाभर आकाराच्या डोहातून तासभर थांबून भरलेलं ते पाणी, पाणी नसल्यामुळे जी अंघोळ करायची इच्छा मारली होती, हे सार चित्र ते टाक्यातील पाणी पाहून झरझर नजरेसमोरून गेलं. 
पाण्याचं टाकं 
आजच्या दिवसासाठी लागणार पाणी देखील कालच भरून आणलं असल्याने या टाक्यातील पाण्याला स्पर्श करण्याची देखील कुणाची इच्छा झाली नाही.  चहा-नाश्ता उरकून बरोबर सुर्यनारायणाच्या त्या तांबूस गोळ्याचे दर्शन व्हायला आणि आम्ही मुक्काम सोडायला एकच घटका झाली.
सूर्यासोबत आमचा देखील ट्रेक चालू झाला.
 सकाळी सात वाजता आजच्या दिवसाचा ट्रेक सुरू झाला, एकंदरीत शनिवारची सुरुवात तर चांगली झाली होती. आजचा टप्पा कांचना-मंचना वरून निघून कोळधेर करून पुढे राजधेरवर जायच आणि मुक्कामाला राजधेरवाडीत जायचं जे की इंद्राई किल्ल्याचं देखील पायथ्याचं गाव आहे. रविवारी इंद्राई करून पुढे परतीचा प्रवास करता येईल अस अपेक्षित समीकरण जुळवल होतं. 
          रात्री चांगला आराम करून सकाळी लवकर सुरू झाल्याने सगळ्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. काल मी आणि प्रमोद थोडी वाट बघून आलो होतो. कांचनाला ट्रॅव्हर्स मारून कांचना किल्ल्याच्या मागे आलो आणि इथून एक डोंगरधार खाली उतरून घळीत जाते आणि तिथून समोरच्या बाफळ्या डोंगरावर चढून डांबरी रस्त्याला येऊन उतरते. येथून खिंडीतील चढ चढून कोळधेर साठी वाट वर चढते. कांचनाचा सुरुवातीचा उतार उतरायला लागलो, पूर्वेला पसरलेल्या रंगछटा जणू आमच्यावर रंगांचा शिडकाव करत होत्या, त्या सोनपिवळ्या रंगांत चालत असताना एक प्रसन्नतेची लकेर आमच्या चेहऱ्यावरडून वाहत होती. 
कांचनाचा उतार
उतारावर मध्ये मध्ये स्क्री होती पण ती कालच्या सारखी भयानक नव्हती. सांभाळत सावरत एकएक जण उतरत होते. पाऊणएक तासात तो उतार संपवून पहिल्या खिंडीत उतरलो. इथे खिंडीत एक शेंदूर फासलेला देव होता, त्याच्या चाहुबाजूने नारळाच्या करवंट्या पडल्या होत्या, झाडाला लावलेला भगवा ध्वज देखील होता. इथून समोर असलेला बाफळ्या डोंगर आम्हाला चढायचा होता. उजवीकडे एक वस्ती होती आणि वाट तिकडूनच वर चढते हे कांचनाचा उतार उतरत असताना पाहिले होते. वस्ती म्हणजे अवघी पाच-सहा माळावरची घरे, तिथे विचारलं असता त्यांनी समोरचा बाफळ्या डोंगर न चढता खालून एक मातीचा गाडीरस्ता बाफळ्या डोंगराच्या पलीकडे खिंडीत उतरणाऱ्या रस्त्याला जाऊन मिळत असल्याचे सांगितले. डोंगर चढून उतरायचं या कामात वेळ आणि श्रम दोन्हीही जास्त खर्ची पडले असते, पर्यायाने खालून जो मातीरस्ता दिसत होता त्याने जाणं जास्त सोईस्कर पडणार होतं. माळावरची वाट पकडली, वाट कुठे हा तर हायवे होता. दुरदूरवर पसरलेला माळ समोर दूरवर एक दोन शेती दिसत होती, मागे कांचना मंचना जोडगोळी आमच्या कडे पाहत होती, डाव्या बाजूला बाफळ्या डोंगर तर समोर शिंगमाळ डोंगर आणि त्याच्या पलीकडे डाव्या बाजूला कोळधेरच अवाढव्य रूप नजरेस येत होतं.
बाफळ्या डोंगराच्या खालून जाणारा मातीचा रस्ता 
 सकाळच्या कोवळ्या उन्हातील माळरानावरची चाल बऱ्यापैकी वेगात होती. त्या माळावर जागोजागी माती काढून भरपूर ठिकाणी खड्डे खणले होते, त्यातील काही खड्ड्यांत पाणी देखील होतं. डाव्या बाजूच्या बाफळ्या डोंगरावरून उतरणारी धार दिसत होती पण डांबरी रस्ता काही दिसत नव्हता याचा अर्थ त्या खिंडीत पोचायला अजून बऱ्यापैकी तंगडतोड बाकी होती. 
          चालता चालता त्या दोन हिरव्यागार शेतांजवळ पोचलो. नजरेच्या समोर पाहिलं असता आम्हाला खर तर डाव्या बाजूच्या कोपऱ्यात जायचं होतं, पण तिकडे जायला वाट नव्हती, शेतीमधून जायला काही वाट दिसत नव्हती. उजव्या बाजूने जी वाट होती ती बहुधा पूर्ण शेतीला वळसा मारून जाणारी होती. 
हिरवीगार शेती आणि मागे उठवलेला कांचना -मंचना 
तेवढ्यात उजव्या बाजूच्या वाटेवर एक मामा दिसले त्यांना विचारुया म्हणजे सर्व प्रश्नांची खल होऊन जाईल. पूर्ण शेताला वळसा मारून जाणाऱ्या वाटेबद्दलच त्यांनी सांगितलं. हा वळसा जरा बऱ्यापैकी होता, जिथे सरळ जायचं तिथे उजव्या बाजूने पूर्णतः वळसा घालणारी ही चाल होती. हा वळसा मारून शेतीच्या पलीकडे गेल्यावर दूरवर गाड्यांचे आवाज ऐकू येऊ लागले, आणि हळूहळू डांबरी रस्त्यावरील गाड्या देखील दृष्टीपथात येऊ लागल्या. शेती पार केल्यानंतरच्या वाटेच खास आकर्षण म्हणजे या वाटेच्या दोन्ही बाजूला फिकट गुलाबी पांढरी फुल असलेल्या झाडांनी ही वाट पूर्ण आच्छादली होती, आणि फुलांचा बहर चांगलाच आला होता. बघता बघता ही वाट संपून त्या खिंडीत पोचलो देखील, खिंडीत पोचायला पावणे नऊ झाले, खिंडीत एक दर्गा आहे, खिंडीतील हा मार्ग म्हणजे चांदवड-सटाणा मार्ग. या रस्त्याला लागल्यावर डाव्या बाजूला थोडं जाऊन तिकडून वर चढायला रस्ता आहे, तिथे भेटलेल्या एका बाईकस्वाराला कोळधेरचा रस्ता विचारून खिंड चढायला सुरुवात केली. 
चांदवड-सटाणा रस्त्यावरील खिंड, मागे बाफळ्या आणि कांचन-मंचना 
खिंडीत जागीच सावली नसल्याने वर जाऊन थांबतो असा निरोप देऊन मी आणि प्रमोदने खिंडीच्या वरती बुड टेकवल. मागोमाग अलंकार आणि आकाश आले, सागर आणि प्रिसिने यायला जरा वेळ घेतला. इथे जरा विसावा घेऊन गुळ-शेंगदाण्यांवर ताव मारून नऊच्या ठोक्याला पुढची वाट धरली, इथे माझी वजनदार सॅक प्रमोद कडे दिली तर प्रमोदची हलकी सॅक घेऊन मी पुढे चालू लागलो. कांचना उतरून पहिल्या खिंडीत उतरून नंतर पुढची चाल धरून चांदवड-सटाणा मार्गाच्या खिंडीतून कोळधेर साठी वाट वर चढते या प्रमाणे आम्ही बरोबर वाट धरून योग्य प्रकारे चाललोय याची पुष्टी झाली.खिंडीच्या अलीकडे असताना तीन जण कोळधेरच्या बाजूने जाताना दिसली, वाटेवर कोणीतरी सोबत आहे हे लगेच प्रमोद आणि माझ्या लक्षात आलं. 
          अंदाजे दोन तासाच्या चालीनंतर जरा विसावून कोळधेरची योग्य वाट धरली. शिंगमाळ डोंगरावरून येणाऱ्या या धारेने वर चढताना शिंगमाळ डोंगराला उजवीकडे ठेऊन वळसा मारताना कोळधेरच्या उजव्या बाजूस असलेल्या खिंडीत आपण पोचतो हे माहीत होत, आता चालताना शिंगमाळ समोर असल्याने ती खिंड दिसत नव्हती, मात्र कोळधेरचा उजवीकडचा उतार समजत असल्याने त्या खिंडीचा अंदाज येत होता. 
उंच टोक दिसणारा कोळधेर किल्ला 
शिंगमाळची धार चढत असताना समोर दिसत असणाऱ्या विजेच्या दोन लोखंडी खांबांपाशी येऊन पोचलो, इथून एक वाट डावीकडे जाते, तर एक पुसटशी वाट वर जाते. पुढे होतो म्हणून त्या पुसटश्या वाटेने दहा एक पावले वर गेलो असता या वाटेच्या तुलनेत डाव्या बाजूला जाणारी वाट जास्त मळलेली असल्याचे वरून मला दिसले. त्यामुळे ती वाट योग्य असणार आणि कोळधेरच्या उजव्या खिंडीत घेऊन जाणार म्हणून सर्वांना तिकडे वळायला सांगितलं.शिंगमाळ डोंगराला ट्रॅव्हर्स मारत जाणारी ही वाट समोर कोळधेर किल्ल्याचं दर्शन घडवीत होती, तर मागे बाफळ्या डोंगर आणि कांचना किल्ल्याचं टोक देखील दाखवत होती. त्या ओसाड भागात डांबरी सडक विशेष उठून दिसत होती.  मध्ये मध्ये असणारी हिरवीगार शेती आणि शेततळी देखील चांगली चमकत होती. पावलांनी आज जरा चांगलाच वेग घेत असल्याने कालच्या सारख्याच आज देखील जोड्या पडल्या होत्या, मध्ये कुठे स्क्रीचा टप्पा किंवा झाडोरा वा इतर अडसर आल्यास एकमेकांना हात देत वाट पादाक्रांत करत होतो. शिंगमाळ डोंगराचा ट्रॅव्हर्स संपून खिंडीत पोचलो खरे... पण आम्ही खिंडीच्या खालच्या भागात पोचलो होतो, सावलीत थांबून बॅग ठेऊन पुढची वाट बघत होतो, केलेल्या अभ्यासानुसार वाट इथून वर चढणारी पाहिजे होती, पण तस काहीच चित्र नव्हतं. खिंडीतून खाली उतरणाऱ्या घळीत आम्ही होतो पण घळ चढायला वाट नव्हती, घळ गवत आणि काट्या-कुट्यानी भरली होती.सर्वांना आपण वाट चुकलोय असं सांगितलं आणि परत फिरायला लागेल हे देखील सांगितलं, पण इतकं चालून आल्यावर माघारी फिरायला नको, इथून कुठून तरी वाट असणार म्हणून तिथूनच पुढची वाट शोधण्याच ठरवलं. वाट निश्चित वर जाणारी पाहिजे म्हणून घळ चढून वर काही आहे का हे पहायला घळीत शिरलो, वाकून-ओणवा होऊन पाठीवरची छोटी बॅग सावरत, मिळेल त्या झाडांच्या फांदीचा, मुळांचा एका ठिकाणी तर निवडुंगाच्या सहाय्याने आधार घेऊन घुसाघुशी करत होतो. या घुसाघुशीत त्या घळीत पडलेले तंबाखूचे पॅकेट, पाण्याची बाटली, तुटलेली चप्पल ही वाट असावी अशा खुणा सांगत होते आणि म्हणूनच त्यांचा माग काढत मी पुढे पुढे जात होतो. एक दोन ठिकाणी घळीतल्या सुटावलेल्या दगडांना खाली न सरकू देता हळुवार कसरत करत मी चाललो होतो, घळ बऱ्यापैकी चढलो होतो,एवढ्यात खालून प्रमोदने आवाज दिला, तो देखील वाट शोधत गेला होता, त्याला पुढे जाणारी वाट मिळाली अस त्याच म्हणणं होत. मी ज्या घळीत शिरलो होतो तिथे सध्या माझ्याकडे सर्वांच्या तुलनेत छोटी सॅक असल्याने मी बऱ्यापैकी सहज चढलो होतो, पण मोठी बॅग घेऊन चढताना पाचावर धारण बसली असती हे काही वेगळे सांगायला नको, आता तसंही खाली वाट आहे म्हटल्यावर का उगीच वर चढून स्वताचा घाम काढून घ्या, म्हणून माघारी फिरून आलो. ती तंबाखू पुडी, बॉटल, चप्पल यांच्या कडे बघून एक अंदाज बांधला की पावसाच्या पाण्यामुळे बहुधा या गोष्टी घळीत वाहून आल्या असणार, आणि तिथेच मध्ये मध्ये अडकुन राहिल्या असणार. 
          अखेर कसरत करत ती घळ उतरून टीमजवळ पोचलो, घामाने अंग पार निथळत होतं, पाच मिनिटे मी बसतो तुम्ही व्हा पुढे अस सांगून मी सर्वांना वाट धरायला सांगितली, मी येईपर्यंतच्या वेळात प्रिसिलियाने मंदार कर्वेला फोनवर आमचा वृत्तांत दिला होता, बहुतेक आठ नऊ वर्षांपूर्वी त्याने जेव्हा हा ट्रेक केला होता तो बहुधा याच वाटेने केला होता, त्याने त्याला जस आठवतंय तसं वाटेच वर्णन केलं आणि प्रमोद ने धरलेल्या वाटेबरोबर याची वाट मिळत होती,म्हणजे आपण बरोबर वाट पकडलीय. खिंडीच्या पुढे आलो आणि ही वाट आता कोळधेरलाच डाव्या बाजूने ट्रॅव्हर्स मारत होती. मंदार दादाच्या म्हणण्याप्रमाणे डांबरी रस्ता पहिला दिसतो नंतर पुढे गेल्यावर डांबरी रस्ता दिसेनासा होईल, पायाखालची वाट चांगलीच मळलेली होती पण ही सांगातीप्रमाणे नव्हती ना की अगोदर कोणी या वाटेने गेलेलं माझ्या माहितीत होत.
कोळधेर किल्ल्याला वळसा मारत चाललेली वाट 
 चालताना खाली दूर गावातील एका शाळेतल्या मुलांचा ग्राउंडवर चाललेला कल्ला गाड्यांचे आवाज ऐकू येत होते. हा ट्रॅव्हर्स मारत असताना एक छोटी टेकडी आमच्या डाव्या बाजूला आली परिणामतः तो डांबरी रस्ता दिसेनासा झाला. कोळधेर किल्ल्याच्या पश्चिमेला असलेल्या शिंगमाळ डोंगरधारेवरून सुरू झालेली चाल कोळधेरच्या उत्तरेला आली, उत्तरेला येऊन जसा वळसा मारला तसा समोर राजधेर किल्ला आ वासून आमच्या कडे बघतोय असाच काहीसा राजधेर आमच्या समोर दिसू लागला.
वळसा मारल्यावर अचानक दिसू लागेलला राजधेर 
घड्याळाच्या काट्यांनी देखील उसळी मारून अकराचा आकडा पार केला होता. वळसा मारतोय खरा पण पूढे वाट कुठे चढतेय याचा काही थांगपत्ता लागत नव्हता, वाटेवर सावली असं काहीच नव्हतं, उन्हाची तीव्रता देखील चांगलीच जाणवत होती. मध्ये मध्ये काटे असलेल्या गवतातून जाताना सार अंग ओरबाडून निघत होतं. राजधेर आता समोर दिसत असला तरी राजधेरला इकडून कुठून वाट नाही हे पक्क ठाऊक होत. जर का आता इकडून कोळधेरला जाणारी वाटच नसेल तर काय या विचाराने पोटात भीतीने गोळा देखील आला होता. 
          कोळधेर चा हा कायच्या काय ट्रॅव्हर्स चांगलाच कस बघत होता, चालण्याचे कष्ट नव्हते, पण बरोबर वाटेवर आहोत की नाही याची खातरजमा आता कोळधेरला पोचल्यावरच होणार याची सर्वांना जाणीव झाली होती, त्यामुळे डोकं भंडावून निघत होतं. चालतोय चालतोय कोळधेरच्या उत्तरेकडून पूर्वेला येऊ लागलो, राजधेर तर समोर होताच. त्या रखरखत्या उन्हात आमच्या व्यतिरिक्त दुसरं चिटपाखरूही नव्हतं, मध्ये एक दोन ठिकाणी प्राण्यांची विष्ठा दिसली पण ती ओळखण्या इतपत आमचा अभ्यास नव्हता.सावलीला एक झाड देखील नव्हतं, एकाएकी दूर सुकलेल्या झाडावर लावलेल्या छोट्या भगव्याकडे डोळे खिळले. मनुष्यप्राण्याच्या अशा खुणेमुळे जरा हायस वाटलं. पुढे जातोय तर अजून एका झाडावर भगवा दिसला, आता ही शृंखला अशीच चालू असणार अस वाटलं. 
दुरूनच नजरेत भरलेला भगवा 
या भगव्यामुळे प्रत्येकाच्या थकल्या चेहऱ्याला एक चांगलीच उभारी मिळाली होती. वाट तर पायाखाली एकच होती आणि ती सोडली नव्हतीच कोळधेरच्या पश्चिमेकडून सुरु केलेला ट्रॅव्हर्स पश्चिमेकडून उत्तर फिरून आग्नेय दिशेला आला,एकाएकी काटेरी झुडपे गवत यांनी वाट पूर्णतः बंद झाली, त्या दोन झेंड्यांव्यतिरिक्त पुढे काही दिसल नाहीच. खाली झोपून सुद्धा तिथून जाऊ शकलो नसतो, इतकी त्या काट्याकुट्यांची दाटी होती, आता काय करावं?  इथून वर आता घुसायचच, मरमर का होईना  चढायचं पण मागे फिरणं नाही. सर्व जण आले, त्या  झाडोऱ्यात बसण्याइतपत सावली होती, बॅग काढून चिंतातुर होऊनच विसावलो होतो. वाट पुढे नव्हतीच, पण तरी मंदार दादाने जेवढं आतापर्यंत सांगितलं होतं त्याप्रमाणे बरोबर आलो, झाडांवर झेंडे कशासाठी असणार मग, इतकी मळलेली वाट एकदम बंद कशी काय? या आणि अशा असंख्य प्रश्नांनी डोक्यात वावटळ उठवलं होतं. मंदार दादाला फोन करून सांगितलं, त्याला आम्ही कुठे आहोत हे कळत नव्हतं, नेटवर्क असल्याने गूगल मॅपच लोकेशन पाठवलं पण तरी ते देखील नीट ट्रेस होत नव्हतं, त्याच म्हणणं होत तुम्ही शिव नदी उगमस्थान आहे तिथे आहात, तिथून वाट आहे आणि खर तर घळीत आम्ही एका बाजूला होतो तर ते उगमस्थान घळ चढून पलीकडे उतरल्यावर दुसऱ्या बाजूला होतं. पण तरी मग ते थोड्या वेळापूर्वी दिसलेले झेंडे, मंदार दादाला देखील प्रश्नांची उकल होत नव्हती, त्याने देखील सांगितलं वर चढून बघा कुठे तरी वाट असणार. बॅग ठेवल्या तिथेच आणि निघालो अलंकार आणि मी एकीकडे तर सागर-प्रमोद दुसऱ्या बाजूने वाटेच्या शोधात निघालो. मी आणि अलंकार घळीच्या चढाला भिडलो खरे पण घसऱ्यामुळे चढायला जमत नव्हतं पण तिथे असलेल्या वाळलेल्या झाडांच्या फांद्यांचा आधार घेत आम्ही चाललो होतो, तिकडे सागर आणि प्रमोद जे झेंडे दिसले होते तिकडे गेले होते. इतक्यात त्या दोघांना एक वाट दिसली म्हणून त्यांनी आवाज दिला, प्रमोद त्या वाटेने वर चढत गेला, मी आणि अलंकार देखील वर चढत होतो, मी जसा वर जातोय तसा प्रमोदच्या आवाजावरून तो जवळ येत असल्याचं कळलं, अलंकारला तिथेच थांबवून प्रमोद ला पुढे वाट कुठवर जाते बघून यायला सांगितलं, मागोमाग मी देखील गेलो. पाठीवर बॅग नाही तर जाऊन पाहू शकतो उगाच माघारी फिरणं झालंच तर हा चढ बॅग घेऊन चढायची मेहनत तरी कमी होईल. वाट बारीकशी पण मळलेली होती, आणि चांगल्याच चढाची होती, घळीच्या बाजूने जाणारी वाट अलगद घळीत आली, घळ देखील अर्ध्यापर्यंत चढून बऱ्यापैकी वर आलो होतो, ही वाट नक्की असणार अशा इराद्याने मागे फिरलो, अर्ध्या वाटेत आल्यावर खालच्याना वर येण्यास सांगितल आणि आम्ही देखील बॅगा आणायला गेलो. वाटेची सुरुवात मला माहीत नव्हती, कारण मी मध्यातूनच वाटेला लागलो होतो, पण आता उतरताना जसा वाटेच्या सुरुवातीला पोचलो तेव्हा मला मघाशी ही वाट दिसल्याचे लक्षात आले, पण वाट छोटी असल्याने मी तिच्याकडे कानाडोळा केल्याचे लक्षात आले. 
          वाटेला लागलो असलो तरी पुढच्या टप्प्याबद्दल काहीच शाश्वती नव्हती, चढ देखील आमचा कस बघत होता, उंची गाठत असलो तरी घामाच्या धारांनी अंगाची लाहीलाही होत होती. मध्ये थांबायला काही जागा नाही, चढावरच कुठे सावली दिसली की तिथेच बसायचो. वेग तर पार मंदावला होता. धापा टाकत टाकत वर सरकत होतो, सागर आणि मी पुढे होतो, आकाश आणि प्रिसी आमच्या मागे तर प्रमोद अलंकार सर्वात शेवटी असे सगळे त्या चढाला भिडलो होतो, घळ लागली घळीत तर अजून बिकट अवस्था, मध्ये मध्ये सावली होती म्हणून हायस वाटत होतं. आकाश आणि प्रिसी साठी थांबावं लागलं म्हणून सागरला पुढे जायला सांगितलं. मीही थोड्यावेळात पुढे सरकलो तर एका ठिकाणी दोन वाटा फुटलेल्या असल्याने सागर तिथे थांबला होता. गूगल मॅप बघून त्याला एक दिशा दिली आणि त्याला वर पोचल्यावर सावलीत बॅग ठेऊन पाणी कुठे आहे का शोध अस सांगून मी मागे थांबलो. घळ चढून वर सपाटीला आलो, सागर ने सावली कुठे आहे ते सांगितलं, तिकडेच जाऊन विसावलो, अलंकारला इथे येण्यास जरा उशीर लागला, त्याचाच काय एकंदरीत सर्वांचाच घाम निघाला होता. वर सपाटीला आल्यावर जी वाट होती ती कोळधेर वरून राजधेरला जाणारी वाट आहे हे पक्क लक्षात आलं. मरमर करत म्हणा वा अजून काही योग्य वाटेला लागलो हे खर, आता डावीकडे राजधेर तर उजवीकडे कोळधेर, कोळधेरला जायच्या उद्देशाने उजवीकडची वाट धरून सावलीत येऊन बसलो. घड्याळात सव्वा एक वाजले होते, भूक लागली असली तरी किल्ला पाहण्याची भूक आणि वेळेत सर्व साध्य करण्याची इच्छा मोठी होती. सकाळपासूनच्या चालीत पाण्याची पातळी जास्तच खाली झाली होती, सहा जणांकडे  मिळून अवघ तीन लिटर पाणी शिल्लक होतं, अरे बापरे पुढे जर पाणी मिळालं नाही तर... कोळधेर किल्ल्यावर जास्त काही अवशेष नाही हे माहीत होत, म्हणूनच हा विचार मनात आला. कोळधेर करून राजधेरकडे जाताना देखील चांगलीच चाल मारायची होती, त्यामुळे पाणी हवंच. जर कोळधेर वर पाणी नाही हे समजलं तर कोळधेर न करताच राकधेर कडे कूच करू शकतो, तिकडे पाणी आहे हे माहीत होत. मंदार दादाला फोन करून विचारलं असता त्याला नीटस आठवत नव्हतं पाणी आहे की नाही ते, ओंकार ओकला फोन केला असता त्याने पाणी आहे हे सांगितलं, पण कुठे हे त्याच्या देखील लक्षात येत नव्हतं. पाणी आहे हे मात्र तो खात्रीने बोलला होता. ब्लॉगर्स ग्रुप मधील नाशिकचे संजय अमृतकर तसेच ओंकारने दिलेल्या राजधेरवाडीतील जाधव मामांना फोन करून बघितलं पण दोघांचे फोन लागले नाही, आता ओंकार बोललाय पाणी आहे, तर जाऊया, असणार पाणी, या उद्देशाने बॅगा एका कोपऱ्यात दडवून कोळधेर कडे कूच केली. 
          पाठीवर वजन नसल्याने चाल जरा जोमात होती, दहाएक मिनिटांच्या चालीतच कोळधेरच्या पठारावर पोचलो, किल्ला पाहणं हे उद्दिष्ट असलं तरी आता पाणी शोधण्याला आमचं प्राधान्य होतं. वाटेला फुटलेल्या फाट्यावर आम्ही देखील दोन ग्रुप मध्ये विभागलो गेलो, एका वाटेवर मी तर एका वाटेवर बाकी सगळे चालू लागलो. फेब्रुवारी असला तरी मातीमध्ये ओल जाणवत होती, आणि त्याच्यावर आलेल्या बारीक गवताने त्या उजाड पठारावर मध्ये मध्ये हिरवाई दिसत होती. पावणेदोन वगैरे झाले होते, त्यामुळे उन्हाचा चटका जाणवत होता, पठार होतं, त्यात थोडं वर आल्यावर भरपूर ढोरवाटा फुटल्या होत्या, पायाखालची वाट पकडून चाहुबाजूने नजर फिरवत चालत असताना एका दगडावर नजर गेली, त्याच्या मागे गवतात अडकलेला, उन्हामुळे रंग उडून, फाटलेला भगवा ध्वज होता, मी त्या दगडाच्या मागच्या बाजूस होतो, मागून पुढे आलो तर त्या दगडावर मारुतीची मूर्ती कोरलेली होती बाजूलाच सळई लावून एक घंटा देखील लावण्यात आली होती. 
महाबलींच्या दर्शनाने किल्ल्यावर अवशेष आहेत याची प्रचिती आली 
किल्ल्यावर काही तरी पाहायला मिळालं याच समाधान मिळालं, बाकीचे मागे होते, त्यांना आवाज देऊन बोलावलं. उभ्या-उभ्याच मारुतीचं दर्शन घेतलं,आता आमचा मोर्चा पाण्याच्या शोधात तसेच किल्ल्यावर जायच्या बेतात होता, दोघा-दोघांच्या जोड्या विभागल्या आणि चालू लागलो. गवत हिरवं आणि मातीत ओल होती म्हणजे पाणी असणारच, अलंकार आणि मी चालत असताना एका ठिकाणी चिखल झालेलं दिसलं त्या चिखलात म्हशींच्या चालण्याने पायांचे ठसे उमटले होते, त्या ठशांमध्ये पाणी साचलं होतं, गाळ सगळा खाली थांबून नितळ पाणी होतं, पण हे पाणी काढताना जास्त हलवून जमणार नव्हतं आणि हात देखील तिथे टाकता येणार नव्हता. जवळ असलेल्या रिकाम्या बाटलीचं झाकण काढून त्या झाकणाने एक बाटली भरून घेतली. 
म्हशींच्या पावलाचं  पाणी 
इतक्यात सागर देखील तिथे आला, तिघांनी आम्ही पाणी पिऊन घेतलं, तोपर्यंत बाकीच्यांना "काहीच नाही पेक्षा काहीतरी आहे" असा निरोप देऊन पाणी मिळालंय असं सांगितलं. तरी देखील ते पुढे शोधायला गेले तोवर इकडे आम्ही आमच्या जवळ असलेल्या बाटल्या भरून घेतल्या. पुढे गेलो असता आकाश आणि प्रिसी थांबले होते, त्यांच्या पुढे एक म्हशींचा तांडा एकाच जागी भरपूर वेळ थांबून होता, तिथे बहुधा पाणी असणार, म्हणून म्हशी तिथे थांबल्यात अशी दाट शंका होती. सगळे एकत्र जमल्यावर त्या म्हशींना हाकलल तर खरंच तिथे पाण्याचं टाकं होतं परंतु म्हशी त्यात डुंबल्यामुळे वगैरे ते पाणी राखाडी काळ्या रंगाचं झाल्याने पिण्यालायक नव्हतं, त्यामानाने आम्ही जे पाणी प्यायल होतं ते किती तरी पटींनी चांगलं होतं. पुढे पाणी असेल अस काही वाटत नव्हतंच त्यामुळे ते म्हशींच्या पावलांचच पाणी आपल्याला आहे, पाणी पिऊन घेऊन आता किल्ला वर पाहूया म्हणत पाण्याच टाकं सोडलं. 
          किल्ल्याकडे जाणारी वाट नीट काही दिसत नव्हती त्यात आम्हाला बसलेला फेरा, चालत चालत आम्ही त्या पठाराच्या पश्चिमेला आलो, इथे समोर शिंगमाळ डोंगर आणि त्या डोंगराला ट्रॅव्हर्स मारून येणारी वाट दिसली, सकाळी याच डोंगराची धार चढत असताना कुठे चुकलो आणि त्यामुळे मूळ वाट आणि आम्ही चौऱ्याऐंशीचा फेरा मारून चाललेली वाट याच्या अंतरातील तफावत आणि आमची झालेली मरमर सार काही क्षणार्धात आठवलं. इथून पार बाफळ्या डोंगर कांचना-मंचना आणि मागचा सारा भाग दिसत होता. 
आम्ही पकडलेली पायवाट, डांबरी रस्त्यावरील खिंड, मागे कांचना 
किल्ल्यावर जाणारी वाट दिसत नव्हतीच तरी आम्ही जिथे होतो तिथून कोळधेर च्या डाव्या बाजूला असलेल्या चढावरून वर जाऊन वर काय वाट आहे का बघून सांगतो मग तुम्ही मागून या अस म्हणून मी वर चढू लागलो, गवताची बारीक काटेरी झाड होती, त्यामुळे स्क्री वरून कसरत करून चढताना कातळाला लागलो तिथून लगेच वर चढून गेलो, चढताना चढलो, पण उतरताना काय फरफट होईल हे ध्यानात घेऊन दुसरी वाट शोधायचीच या वाटेने नाहीच उतरायचं हे ठरवून वरच्या कातळ टप्प्याला ट्रॅव्हर्स मारत उजव्या बाजूला सरकू लागलो, बाकीचे माझ्या निरोपाची वाट पाहत होते, ही वाट नाही हे निश्चित झालं होत, त्यामुळे त्यांना माझ्याच मार्गाला समांतर खालून त्या पाण्याच्या टाक्याच्या इथून यायला सांगितलं. ते दिसू लागले तसा मी वरून चालतोय, स्क्री होती, गवत होत आणि त्यात देखील चालता येईल अशी वाट होती. पाठीवर बॅग नसल्याचा फायदा जाणवत होता. कातळाला धरून चालत असताना मी थेट कातळात कोरलेल्या पायऱ्यांपाशी येऊन पोचलो, कोळधेर किल्ल्याला पायऱ्या आहेत की नाही हे देखील माहीत नव्हतं, त्यामुळे खालून पायऱ्या बघायचा प्रयत्न केलाच नव्हता, पायऱ्यांपाशी पोचलो आणि तिथून खाली जाणारी वाट देखील दिसली, या सर्वांना ही आनंदाची बातमी देऊन वर येण्यास सांगितलं, ही वाट कुठे खाली आहे माहित नाही म्हणून मी देखील थोडा खाली उतरलो.
कोळधेर किल्ल्याच्या कातळात कोरलेल्या पायऱ्या 
सर्वांना बोलवून पायऱ्यांपाशी सावलीमध्ये वाऱ्याचे झोत अंगावर घेऊन विसावलो, त्या सावलीमध्ये असताना इथून निघूच नये अशा स्थितीत सारे होतो, बाटलीतल्या पाण्याचे घोट रिचवत पायऱ्या चढायला सुरुवात केली. पायऱ्या चढून झाल्यानंतर परत घसऱ्याचा चढ लागला इथे मी, प्रमोद, सागर पुढे आलो, तर बाकीचे तिघे पायऱ्यांच्या वरच्या भागालाच थांबले. सकाळी सातला कांचना-मंचना किल्ल्यावरून निघून वाटांचा फेरा घेऊन तीनच्या ठोक्याला कोळधेर किल्ल्याच्या गुहेत आम्ही पोचलो, गुहेमध्ये खूप सारी छोटी-छोटी पाखरे लागली होती तर ताज्या संत्र्याच्या साली देखील पडल्या होत्या, जी पोर आपल्याला सकाळी कोळधेरची वाट चढताना दिसली होती, त्यांनीच ही सालं टाकली असणार असा अंदाज वर्तवला आणि अजून काही विशेषतः पाणी आहे का पाहायला निघालो. 
कोळधेर किल्ल्यावरील गुहा आणि त्या गुहेत कोरलेली मूर्ती 
आता प्रमोद सागर गुहेच्या डावीकडे गेले तर मी उजवीकडून निघालो, गुहेच्या डावीकडे एक पाण्याच टाकं आहे व ते पूर्णतः बुजून गेलं होतं. उजवीकडची वाट धरली,सुरुवातीला स्क्री होती पुढे भरपूर सारे दगड निखळून पडल्याने वाट चांगलीच मोडली होती, त्यात मध्ये मध्ये असलेली काट्यांची झाडे पुढे जाण्यास मज्जाव करत होती. किल्ल्याच्या मागच्या बाजूस कधी पोचलो हे कळलं देखील नाही, इथून पुढे चालताना पश्चिमेस आलो, इथे एक शेंदुर लावलेला दगडाचा देव होता. 
कोळधेर वर मागच्या बाजूला असलेला शेंदूर लावलेला देव 
मी आता मगाशी ज्या घसाऱ्याने वर आलो होतो, त्याच्या अजून वरच्या अंगाला होतो. इथून तर मला पश्चिमेकडची सातमाळा रांग छानपैकी नजरेत येत होती. इथून पुढे जायला वाटच नव्हती, पाण्याचं टाकं देखील नाही म्हणून आल्या पावली माघारी फिरताना हे तिघे पायऱ्यांपाशी थांबलेत त्यांना फोन करून जे म्हशींच्या पावलांचं पाणी होत, तिथे पाणी भरायला पाठवलं. आम्ही तिघे देखील उतरायला लागलो. या स्क्री वरून पायऱ्यापर्यंत पोचताना चांगलीच तारांबळ चालू होती, पायऱ्या उतरलो खालची वाट आता माहीत होती आणि पाणी कुठे आहे ते देखील माहीत होतं, पावलांना वेग देऊन उतार उतरून पाण्याजवळ पोचलो. आता मात्र खरी मजा होती, ज्याला जशी जागा मिळेल तशी एक एक पावलातील पाणी झाकणाने काढून जवळच्या बॉटल भरणे,त्यात महत्वाचं गाळ अजिबात वर येऊ न देणं आणि त्या चिखलात चुकून पण आपला पाय न पडणे. तोल सावरत, वेडेवाकडे बसून अर्ध्या तासात सहा-सात लिटर पाणी जमा केलं, हा वेळ घालवणं गरजेचं होतं कारण राजधेरकडे जाताना कधी पाणी मिळेल माहीत नाही, त्यामुळे सर्वांकडे पुरेस पाणी असणं गरजेचं होतं.
अमृत 
           आता मात्र वेग घेणं गरजेचं होतं, कारण राजधेरवर जायला चाल बऱ्यापैकी होती आणि चार वाजायला आले होते, कोळधेर उतरायला सुरुवात केली, बॅगा ठेवलेल्या तिथे आलो, बॅगा उचलल्या आणि राजधेर कडे प्रस्थान केलं. पहिल्या दिवशी जी वेळ आमच्या सोबत होती आणि ठरल्या पेक्षा जास्त पुढे जाऊ हे आम्ही ठरवलं असताना ते झालं नाही आणि आज कोळधेरने उडवलेली भांबेरी, एकंदरीत या सर्वांचा विचार करून उद्या जो इंद्राई किल्ला करायचा होता तो न करता राजधेर किल्ला करूनच परतीचा प्रवास करायचा अस सर्वानुमते ठरलं, कारण प्रवास देखील लांबचा करायचा होता आणि महत्वाचं इंद्राई किल्ला देखील मोठा असल्याने धावत पळत किल्ला बघण्यात अर्थ नव्हता. 
कोळधेर वरून राजधेर कडे जाणारी वाट 
इंद्राई जरी रद्द केला असला तरी राजधेर गाठणं गरजेचं होत, त्यात राजधेरकडे जाणारी वाट आता स्पष्ट झाली असली तरी वेळेचं गणित मात्र आमच्या हातात नव्हतं. एकंदरीतच राजधेरवर पोचायला उशीर होणार हे नक्की, पण तरी देखील कोळधेर वरून राजधेर कडे जाताना राजधेरवाडीच्या वरून वाट जाते आणि एका ठिकाणी वाटेला फाटे फुटतात खाली उतरलो तर राजधेरवाडीत आणि वर गेलो तर किल्ल्यावर. सगळे थकलेलो असल्या कारणाने आणि आपण पोचेपर्यंत अंधार होणार त्यामुळे त्या फाट्यापर्यंत जाऊनच पुढे काय करायचं हे ठरवूया अस म्हणून आता सध्याचं उद्दिष्ट तो वाटेवरचा फाटाच ठेवला,आणि चालू लागलो, कोळधेर उतरून समोरच्या पठारावर पोचलो, इथून मागे पाहिलं असता मागे असलेल्या शिंगमाळ आणि कोळधेर मधली ती खिंड दिसत होती आणि त्या खिंडीच्या पलीकडे डोके वर काढल्यासारखी कांचना, बाफळ्या, लेकुरवाळी, इखारा, धोडप ही सातमाळा रांग दिसत होती.
खिंडीच्या पलीकडे दिसणारे कांचन मंचना, धोडप, लेकुरवाळी 
 पठारावर एक मोठं तळं होतं पण त्यातलं पाणी गढूळ असल्याकरण्याने त्याच्याकडे फिरकलो देखील नाही. इतक्यात गुरांना घेऊन आलेले एक मामा दिसले, किती तरी तासानंतर आमच्या व्यतिरिक्त नवीन व्यक्ती दिसली होती,मामांना पुढच्या वाटेबद्दल विचारलं असता त्यांनी पुढे जाऊन खाली वाडीत उतरा, तिथे माणसं भेटतील वाट दाखवायला अस सांगितलं. मामांना रामराम करून वाडीच्या दिशेने निघालो, अस वाटलं होत की इथे जवळपास वाडी असणार पण पठाराच्या कडेला आल्यानंतर कळलं की मामा राजधेरवाडीबद्दलच बोलत होते. इतका उतार उतरल्यानंतर परत चढण्यापेक्षा जी वरच्या वर वाट आहे ती पकडून जाऊया म्हणून पठाराच्या डावीकडच्या घळीत जाऊन समोरच्या छोट्या टेकाडाला वळसा मारून पलीकडे आलो असता इथे अजून एक मामा भेटले. एव्हाना घड्याळात साडेपाच वाजले होते, टप्पा बराच मारला असला तरी अजून बराच मारायचा होता,इथून राजधेरच्या कातळात कोरलेल्या पायऱ्या आणि नवीन बसवलेली शिडी नजरेत येत होती, पण तिथपर्यंत पोचायला अजून चांगलाच वळसा होता. मामांना पुढची वाट विचारली असता तुमच्या चालीने अजून दीड तास लागेल किल्ला चढायला असे बोलले, मामांचा दीड तास म्हणजे आमची सकाळपासून झालेली तंगडतोड बघता दोन तास लागतील अस मी सर्वांना बोललो, यावर प्रिसीने दोन नका अडीच तास पकडूया कारण माझा स्पीड तुमच्यासारखा नाही. ठीक आहे, अस म्हणून आता किल्ल्यावरच जायचं अस ठरलं, मामांनी पुढे पाणी लागेल हे सांगितलं त्या पाण्याच्या इथे जरा विसावून लगेच पुढे निघालो. 
पाणी दिसलं की तिथून पायच हलत नसे
दिवसभर आग ओकणाऱ्या सुर्यदेवाने देखील आता आमचा निरोप घेतला होता, पश्चिमेला त्याचा निरोपाचा सोहळा चांगलाच रंगला होता. त्याच्या रंगाविष्काराकडे बघत पुढची वाट कापत होतो, इतक्यात अजून एक मामा भेटले ते आम्हाला एक शॉर्टकट दाखवत होते, त्या शॉर्टकटला असलेला चढ बघून आणि आमची दिवसभर झालेली हालत बघून मनात धडकीच भरली, तरी देखील मामा इतक्या पोटतिडकीने सांगत होते, म्हणून न राहवून माघारी फिरून त्या मामांजवळ आलो त्यांना आमची दिवसभराची वणवण विशेषतः वाटांचा गुंता सांगितला आणि आता बर आम्हाला नवीन वाटेचा प्रयोग नाही झेपणार, चांगल्या वाटेने थोडा उशीर लागला तरी चालेल पण तीच वाट पकडू दे. मामांना निरोप दिला आणि पुढे निघालो. 
राजधेरच्या वाटेवरील मारुतीचं स्थान 
          दुरून झाडीत एक भगवा दिसला तिथे मारुती कोरलेला दगड होता, तिथे कोणीतरी ठेवलेला नारळ उचलला बाहेर येऊन त्या नारळाचा सोक्षमोक्ष लावून त्या फाट्याकडे निघालो, तो फाटा काही आता जास्त दूर नव्हता, किल्ल्यावरून उतरणारी डोकी मध्ये मध्ये दिसत होती. त्या फाट्यापर्यंत पोचलो, आम्ही आता बरोबर राजधेरवाडीच्या वर होतो, पूर्ण गाव आणि एक मोठा जलाशय आणि आजूबाजूला असलेली हिरवीगार शेती मन प्रसन्न करत होती. 
शेतीने समृद्ध राजधेरवाडी परिसर 
वेळ घालवून जमणार नव्हता म्हणून लगेच वर चढायला सुरुवात केली सहा वाजले होते, चढावर एका मामांनी सोबत केली ते त्यांची गुर आणायला वर चालले होते, चढ जरा दम बघणाराच होता, या चढावर अलंकारचा वेग चांगलाच मंदावला, चढ संपताना त्याच्यासाठी थांबलो असता तो बोलला माझा स्पीड आता हाच पण काय काळजी नको करूस मी येईन आपण जातोय वरती. सगळे थकलो असलो तरी सर्वांना आता चांगल्या ठिकाणीच मुक्काम करायचा होता त्यामुळे इतका चाललोय तर अजून चालूया या मतावर सर्वजण आले होते. तो उभा चढ चढायला अर्धा तास लागला होता, मध्ये एका ठिकाणी पायऱ्या देखील लागल्या, चढ चढून बसल्यानंतर वाऱ्याच्या झोतासरशी आणि समोर दिसणाऱ्या केशरी पिवळ्या छटा बघून आपणही आता आपल्या आजच्या चालीचा निरोप घ्यायला हवं अस वाटत होत. 
सूर्यदेवाने घेतलेला आमचा निरोप 
पठारावरची हळुवार चढाची चाल चालताना बरं वाटत होतं, अलंकारचा वेग कमी झालेला म्हणून प्रमोदला त्याची बॅग घ्यायला सांगून  पुढचा टप्पा गाठू लागलो. हलकी बॅग आल्यामुळे अलंकारला देखील थोडं सुखकर वाटलं होत. पठाराची बारीक चढाची चाल संपून लोखंडी जिन्याजवळ पोचलो देखील, एकंदरीत टॉर्च लावण्याची गरज भासायच्या अगोदरच आम्ही जिना गाठला होता, जिना चढलो, अगोदर जी राजधेरला शिडी होती ती ओव्हरहँग असलेली शिडी बाजूला ठेऊन हा मजबूत जीना केला होता. 
जुनी ओव्हरहँग वाली शिडी, नवीन केलेला जिना, आणि कातळात कोरलेल्या पायऱ्या 
या शिडीच्या अगोदर इथे प्रस्तरारोहणाशिवाय दुसरा पर्याय नव्हता. लोखंडी जीना संपला आणि कातळात कोरलेल्या पायऱ्यांवर प्रवेश केला, बाजूला आधाराला काहीच नसल्याने अंधारात चालताना भीती वाटत होती, पायऱ्या चढत चढत उध्वस्त दरवाजात आणि लगेच किल्ल्यावर प्रवेश केला होता. अंग अक्षरशः घामाने निथळत होते, पाठवरची बॅग मोकळी केली आणि बाकीचे येण्याची वाट पाहू लागलो, त्या मामांनी संगीतल्यापासून बरोबर दोन तासात म्हणजे साडेसात वाजता आम्ही किल्ल्यात प्रवेश केला होता.
घामाने निथळणारे अंग 
          सकाळी सात वाजता सोडलेला कांचना किल्ला, नंतर गाठलेली खिंड, कोळधेरचा मारलेला चौऱ्याऐंशीचा फेरा, राजधेरवाडीत जायचं की राजधेर किल्ला हा पडलेला प्रश्न या सर्वांवर मात करून रात्री साडेसात वाजता आम्ही किल्ल्याच्या प्रांगणात पोचलो होतो. सर्वजण आले, थकलो असलो तरी उत्साह होताच, प्रमोद आणि मी पाणी आहे तिकडे बघायला गेलो, एका मामांनी पाण्याची जागा सांगितली होती, तर अलंकार एका बाजूला गेला राहायचं कुठं ती जागा पाहण्यासाठी. आम्हाला पाणी मिळालं, अलंकारला मोकळी जागा मिळाली, त्या जागेवर जाऊया म्हणून तिकडे निघालो, वाटेत इतके सारे उंदीर होते की टेंट लावून सामान सर्व त्यात ठेवूया बाहेर काही सामान राहता कामा नये याची दक्षता सर्वानी घेतली होती. बेसकॅम्प सेट करून आता अंघोळीसाठी मोर्चा निघाला. काल कांचना किल्ल्यावर पाण्याअभावी अंघोळ करता आली नव्हती ती कसर इकडे भरून काढायची होती. टाक्यातील ते थंडगार पाणी अंगावर घेताना आणि त्याच वेळी येणारा वाऱ्याचा झोत सार अंग थंडीने शहारून टाकायचा. कुडकुडत  कुडकुडत अंघोळ वगैरे उरकून पावले बेसकॅम्पवर आली. ट्रेक संपून पुरेपूर पाणी आणि अंघोळ हे तर झालं आता प्रश्न सोडवायचा होता तो पोटाचा. राजवाड्याच्या समोरच आम्ही आमचा कॅम्प सेट केला होता, त्या राजवाड्यात हवा लागत नव्हती म्हणून त्याच्या बाहेर राहू आणि जेवण आत बनवू असा निर्णय घेतला होता. आता बघायला आलो तर एक दोन उंदीर पळताना पाहिले आणि छतावर बॅटरी मारून बघितलं तर छतावर एक इंगळी दिसली, बास! बाहेर किती हवा लागली तरी चालेल पण रात्री इकडे फिरकण नाही आणि बाहेरच टेंट च्या जवळ गॅस पेटवून जेवण बनवायला सुरवात केली. थकवा असला तरी तो तेवढा वाटत नव्हता, चहा, सूप, बटाट्याच्या काचऱ्या,डाळ-भात, कोशिंबीर, लोणचं पापड, पोटातला बकसुर जो काय चवताळला होता त्याला शांत करण्यासाठी यज्ञात जशा समिधा टाकतो तस पोटात एक एक पदार्थ ढकलण्याच काम चालू होत, सोबतीला सुका खाऊ देखील होताच. जठराग्नी शांत केला सगळी काही आवराआवर करून शांतपणे बसून सह्याद्रीतल्या गप्पा गोष्टी सांगता सांगता आकाशाच्या छताखाली मांडलेल्या बिऱ्हाडासमोर कधी झोप लागली कळलंच नाही. 
वाड्याची चांगल्या स्थितीतली वास्तू 
          इंद्राई किल्ला पाहायचा बेत रद्द केला असल्याने राजधेरवरचा निवांतपणा खूप चांगल्या प्रकारे अनुभवता आला, झोप देखील चांगली घेऊनच सकाळी जाग आली, जाग आली पण तरी लोळण्याची मजा सगळे घेत होते, पहाटे हवेत आलेला गारवा स्लीपिंग बॅग मधून बाहेरच येऊ देत नव्हता. 
किल्ल्यावरची हवीहवीशी वाटणारी सकाळ 
साडेसातच्या सुमारास एक माकड आमच्या बाजूला घुटमळत असलेलं पाहिलं आणि उडली ना त्रेधातिरपीट. एक आलाय म्हणजे हा सगळी टोळी घेऊनच येणार आणि त्यात आमचा हा उघड्यावर मांडलेला बिऱ्हाड, एक वस्तू जरी नेली तरी वाट. पटापट स्लीपिंग बॅग मधून बाहेर येऊन पुढच्या सगळ्या तयारीला लागलो. सकाळचा विधी, फ्रेश होऊन ते नाश्ता करेपर्यंत आळीपाळीने दोन जण फक्त माकडांवरच ठेऊन बाकीचे त्यांचा त्यांचा काम करत होते. आजचा नाश्ता हा एकदम राजस होता. चहा-बिस्कीट, मॅगी, बोंबील-भात, हे सगळं करून आळीपाळीने खाऊन त्या माकडांना हाकलवून पूर्ण पॅकअप करायला साडेनऊ झाले. या सगळ्या गडबडीत प्रमोदने त्याचं कालच ताट घासायच तसच ठेवलं होतं ते देखील माकड घेऊन गेले होते. पोटपूजा तर चांगलीच झाली होती, झोप देखील उत्तम त्यामुळे काल जरा झालेली चिडचिड आज कुणाच्याही चेहऱ्यावर दिसत नव्हती. घरी लवकर जायचं असलं तरी किल्ला देखील आरामात पाहायचा हे देखील तितकंच महत्वाच होतं. काल किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजवीकडची वाट धरुन राजवाड्याच्या इथे मुक्काम केला होता, इथून पुढे जाऊन पार किल्ल्याच्या पूर्व टोकावर आलो, इथे लावलेले भगवे आणि खाली विस्तीर्ण पसरलेला राजधेरवाडीतील जलाशय, तेथील शेती आणि समोर असणारा इंद्राई किल्ला नाही म्हटला तरी आम्हाला खुणावू पाहत होता. 
राजधेर वरील पूर्व टोकावरील ध्वज 
आम्ही आता किल्याच्या एकदम पूर्व टोकाला होतो आणि आम्हाला किल्ला बघत बघत पश्चिमेला जायचं होतं, एकंदरितच गडफेरी खऱ्या अर्थाने आता चालू झाली होती. इथून माघारी दरवाजापर्यंत येताना वाटेत गवत-झाडोऱ्याने भरलेले अवशेष दिसत होते, मध्ये मध्ये इकडून तिकडे पळणाऱ्या छोट्या उंदरांचे देखील दर्शन होत होते. त्या तुटक्या दरवाजापाशी आलो इथूनच काल उजवीकडे वळलो होतो, आता डावीकडचा भाग बघण्यासाठी चालू लागलो समोर आलेला कातळ त्यात असलेल्या पायऱ्यांच्या मुळे सहज चढता आला, इथे वर कातळात कोरलेली गुहा आहे, गुहा खोल असल्याने उतरायला शिडी लावली होती, एक कोणीतरी साधुबाबा इथे वास्तव्यास होते अस ऐकीव होत, त्यांचं सामान गुहेत एका बाजूला पडलं होत. गुहेच्या बाहेर वर बऱ्यापैकी जागा असल्याने ही जागा देखील आम्ही मुक्कामासाठी विचारात आणली होती. इथेच पुढे एक घुमटाकार कमान असलेली विहीर आहे.
          काल एका मामांना पाण्याच विचारलं असता त्यांनी सांगितलं होतं की दरवाज्यातून डाव्या बाजूला गेल्यावर दर्गा लागेल त्या दर्ग्याच्या मागे थोडं वर चढल्यावर पाण्याचं टाकं आहे, काल काळोखात पाणी शोधताना ही घुमटाकार विहीर म्हणजे दर्गाच आहे अस मला आणि प्रमोदला वाटलं होत. मात्र आता येताना गुहेच्या खालीच कातळातील पायऱ्यांच्या अगोदर तो दर्गा दिसला होता. 
किल्ल्यावरील दर्गा 
घुमटाकार विहिरीच्या बाजूलाच खाली पाण्याच टाकं देखील होत. या टाक्याजवळ भांडी घासून जवळच्या पाण्याच्या बॉटल भरून बॅग तिथेच एका कोपऱ्यात दडवल्या आणि पुढची गडफेरी सुरू केली. पाण्याच्या टाक्याच्या इथून पुढे गेलो आणि कातळात परत पायऱ्या लागल्या या पायऱ्या चढून समोर गेलो तर समोर एक मोठ्ठं तळं पाण्यानं तुडुंब भरलं होत. 
पाण्याने तुडुंब भरलेलं राजधेरवरील तलाव 
काल प्रमोद आणि मी या तळ्यापर्यंत आलो होतो, पण मुद्दामून कुणालाच सांगितलं नाही, सगळे येतील तेव्हा त्यांना स्वतःच्या डोळ्यांनी बघू दे. रेखीव चिरा लावून केलेला तलाव पाहून सर्वांना त्यात उतरायचा मोह होत होता, काल का आपण त्या टाक्यातल्या पाण्यात पाणी बाहेर काढून अंघोळ केली असा रागेभरला स्वर प्रत्येकाने आम्हाला दोघांना ऐकवला. तळ्याच्या कडेलाच एका गुहेत शिवलिंग आणि नंदी होते, इथे देखील कोणीतरी एक नारळ ठेवला होता, प्रसाद म्हणून तो देखील आमच्या बॅग मध्ये टाकला आणि पुढे मार्गस्थ झालो.
तलावाच्या बाजूला असलेल शिवमंदिर 
 तळ्याच्या पुढे आलो, किल्ल्याच्या कडेकडेने चालतोय पुढे काही असेल अस वाटत नव्हतं, म्हणून प्रमोद आणि अलंकार वरच्या बाजूला चढले तर आम्ही बाकीचे सरळ चालत पश्चिम टोक गाठलं. इथून दिसणारा सातमाळा रांगेचा पश्चिम भाग विशेषतः कोळधेर किल्ल्याला मारलेला प्रदक्षिणा मार्ग चांगलाच नजरेत भरत होता.शुक्रवार, शनिवार आणि आज उगवलेला रविवार तीन दिवसांची सारी भटकंती डोळ्यासमोर उभी राहिली. 
राजधेरच्या पश्चिम टोकावरून दिसणारी सातमाळा रांग 
कोळधेरची प्रदक्षिणा, कांचना किल्ल्याचा वाटांचा चकवा, हंड्या-लेकुरवाळी डोंगर, इखारा सुळका, धोडप आणि त्याची खाच सार सार काही दिसत होत. नजर एकटक खिळवून बसलो असताना अचानक मागे किल्ल्याच्या वरच्या बाजूने प्रमोदचा आवाज आला आणि त्या तिथल्या विश्वात मग्न झालेले आम्ही पावले माघारी वळवून किल्ल्याच्या उर्वरित भागाकडे गेलो,आता इथे आम्ही सगळे वेगवेगळे झालो होतो. किल्ल्याच्या एकदम वरच्या भागात आल्यावर इथे एक पाण्याचं टाकं आणि तुटकी तटबंदी होती.या टाक्याच एक विशेष होतं की याच्यामध्ये एक चौकोनी दगड होता, तो का आणि कशासाठी या प्रश्नाची उकल काही झाली नाही. 
टाक्याच्या मध्ये चौकोनी दगड 
तिथून पुढे आल्यावर पाण्याच्या अजून टाक्या आहेत तिथे आलो, काल रात्री मी आणि प्रमोद राहण्यासाठी जागा शोधत इथे या टाक्यांपर्यंत आलो होतो. आता मात्र टाक्यांच्या इथे खूप साऱ्या मधमाशा घोंगावत असलेल्या पाहून इथे थांबणं सोईस्कर नाही, आणि सर्वजण माघारी पोचून माझीच वाट पाहत असणार या विचाराने मी देखील माझी गडफेरी आवरती घेतली. आणि पहिल्या टाक्याच्या इथे जिथे बॅग ठेवल्यात तिथे पोचलो पाहतोय तर या सर्वांचा पत्ताच नाही. आता यांची वाट बघण्याखेरीज माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. 
          टाक्याच्या बाजूला वर असलेल्या घुमटाकार विहिरीच्या एका बाजूला सावली असणार तिथे थांबण्यासाठी गेलो तर ज्या दरवाजाने रात्री किल्ल्यात प्रवेश केला आणि दरवाजात थांबलो होतो त्याच्या डाव्या बाजूला अगदी दहा फुटांवर एक विहीर देखील होती. पण ती फुटून त्यात एका झाडाने चांगलाच तग धरला होता.
विहिरीत उगवलेलं झाड 
 इतक्यात गडावर कोण तरी येत असल्याचे आवाज येऊ लागले. सहा-सात मुला-मुलींच्या एका ग्रुपने गडावर प्रवेश केला. इतक्यात अलंकार आणि प्रमोद देखील आले, थोडा अवधी घेऊन प्रिसी, सागर, आकाश देखील आले, पाण्याच्या टाक्याच्या इथे आत ठेवलेल्या बॅग बाहेर काढल्या तो दुसरा ग्रुप देखील आमच्या इथेच आला. सर्वांसाठी कोकम सरबत बनवून थोडाफार खाऊ आणि शंकराच्या मंदिरात सापडलेल्या नारळाचा आस्वाद घेऊन, त्या ग्रुप सोबत चर्चा करून साडेबारा वाजता आम्ही राजधेर किल्ल्या वरून निरोप घेतला. कातळात खोदलेल्या पायऱ्या आणि जिना उतरून तिथे असलेल्या गुहा बघून गावाच्या दिशेने वेग घेतला.
गुहेत असलेले जुन्या बांधकामाचे अवशेष 
काल दिवसभराच्या चालीमुळे किल्ला चढताना जरा श्रम लागले होते पण आत्ता काहीच वाटत नव्हते, अवघ्या तासाभरात चालत मध्ये एका झाडाखाली थोडं विसावून राजधेरवाडी जवळ केली होती. राजधेरवाडीतून चांदवड साठी दुपारी बाराची एसटी असते हे आम्हाला माहीत होतं पण किल्ला नीट पाहिल्याशिवाय खाली उतरायचं नाही त्यामुळे ही बस आपल्याला मिळणार नाही हेही तेवढेच निश्चित होतं. दीड-पावणेदोन च्या सुमारास खाली गावात आलो ओंकारने एका स्थानिकांचा नंबर दिला होता, त्यांना गाठून जायची दुसरी काय सोय आहे का बघावी म्हणून वसंत मामांच घर इतर गावकऱ्यांना विचारत गाठलं. वसंत मामा इंद्राई किल्ल्यावर दुसरा ग्रुप घेऊन गेले असल्याने त्यांची आमची भेट झाली नाही. गावात एसटीखेरीज टमटम वा दुसरं कुठलंच वाहन येत नाही हे एव्हाना माहीत झालं होतं आणि आता पुढच्या गावापर्यंत चाल मारावी लागणार हे मी पक्क केलं होत. एवढ्यात एका अंगण्यात बसलेल्या आजींनी समोर लागलेल्या टेंपो कडे बोट दाखवून तो घेऊन जातोय का विचारा, त्याच घर तिथे आत आहे, घरीच असेल तो. एक आशेचा किरण पल्लवीत झाला होता. टेंपो वाल्या दादाला विचारलं असता त्याने यायची तयारी दाखवली मात्र चांदवडला सोडायचं भाडं किती घेणार हे सर्व आल्यावर सांगतो, चला तिकडं, त्याच्या बायकोच्या हावभावावरून त्यानं जाऊ नये असच वाटत होत. तरी देखील दादांनी शर्ट चढवला आणि आले माझ्या सोबत, एव्हाना सगळी खाली उतरून गावात आली होती, येताना त्यांनी एक दुकान गाठून दुकानातून खायला चोकोबार आईस्क्रीम आणलं होतं. त्यांना टेंपो वाला आपण सगळे भेटल्यावरच भाडं सांगणार हे सांगितलं. राजधेरवाडी ते चांदवड हे अंतर अकरा किमी होतं त्या अनुषंगाने आम्ही भाडं किती सांगेल याचा अंदाज बांधून ठेवला होता, दादांनी भाडं डायरेक्ट तीनशे रुपये सांगितल्यावर काय घासाघीस करण्याचा प्रश्नच आला नाही, दादांना लगेच होकार देऊन त्यांना टेंपो काढायला सांगितलं आम्ही देखील बॅगा टेंपोत टाकून टेंपो निघाला देखील. हे सार इतक्या घाईत झालं की ट्रेक संपला म्हणून फ्रेश होऊन घामाने भिजलेले कपडे बदलावे हे सुद्धा लक्षात आलं नाही, आणि तशाच मळकट अवतारात घरी जाणार अस सर्वांना वाटू लागलं. टेंपो वाल्या दादाला मध्ये फ्रेश होण्यासाठी थांबव अस सांगितलं पण ती जागा येईपर्यंत सगळ्यांचा डोळा लागला होता. 
टेंपोतच लागलेला डोळा 
          चांदवडच्या अलीकडे इच्छापूर्ती गणेश मंदिराच्या इथे टेंपो थांबवून आम्हाला फ्रेश व्हायला सांगितलं. अरे वा! फ्रेश होण्यासोबत अजून एक मंदिर पाहायला मिळालं हे आमच्या साठी सुखच होत. नव्याने जिर्णोद्धार केलेलं हे मंदिर पाहायला आलेल्या लोकांच्या संख्येवरून हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे याच भान आलं होत. 
इच्छापूर्ती गणेश मंदिर
मंदिरात एक विशेष गोष्ट नजरेस आली ती म्हणजे मंदिरात गणपतीच्या मूर्तीसमोर लोकांनी बांधलेले धागे. जास्त वेळ मंदिरात विसावून जमणार नाही म्हणून दर्शन घेऊन लगेच निघालो. निघता निघता टेंपो वाल्या दादाशी चांदवड मधल्या रेणुका माता मंदिराबद्दल विचारणा केली असता "अहो चला, रस्त्यालाच आहे,              थांबतो तिथे पण". आपल्याला उशीर तर होणार नाही ना, अगोदरच भाड्याचा आकडा बघता त्याला इतका वेळ थांबवणं योग्य आहे का? बघूया थांबला तर थांबला अस म्हणून चांदवडच्या दिशेने टेंपो निघाला, आणि हायवेच्या कडेला असलेल्या मंदिराच्या इथे टेंपो थांबला देखील. जास्त उशीर करायचा नाही अस ठरवून गेलो खरे पण मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करताच एकदम थबकायला झालं. अहिल्यादेवी होळकरांनी जीर्णोद्धार केलेल्या या मंदिरात हायवेवरून खाली पायऱ्या उतरून मंदिरात प्रवेश करता येतो तसेच गावातून यायचं झाल्याचं पायऱ्या चढून मोठ्या दरवाजातून मंदिर प्रांगणात प्रवेश करता येतो. दरवाजाच्या बाजूला दोन दीपमाळा, तुळशी वृंदावन, होम कुंड यांनी सजलेल्या या मंदिराच्या भिंतीवर बारीक नक्षीकाम केलेलं दिसून येतं. 
चांदवड रेणुका माता मंदिर 
पौराणिक आख्यायिकेनुसार परशुरामांनी त्यांच्या आईचा वध केल्यानंतर साडेतीन शक्तीपीठ असलेल्या माहूरला त्यांचं धड आहे तर शीर या चांदवड नगरीत, तेच हे मंदिर. देवीचं दर्शन घेऊन मंदिर परिसर न्याहाळून उसाच्या रसाचे घोट जिरवत टेंपोत येऊन चांदवड बस स्टँड कडे मार्गस्थ झालो. चांदवड नगरीत वळण्याअगोदरच हायवेला टेंपो थांबवून इथून तुम्हाला कसारा गाठणं जास्त सोईस्कर पडेल हे टेंपोवाल्या दादाने सांगितल्यावर तिथे उतरलो, तर तिथे लगेच जीप मिळाली पहिल्या दिवशी येताना जे एका गाडीत सहा जण आरामात आलो होतो तशाच जीप मध्ये आज  अठरा जण बसून प्रवास करत होतो. घड्याळात तीन वाजून गेले होते, दुपारची पोटपूजा असं काहीच झालं नव्हतं त्यामुळे आता सगळ्यांचे चेहरे कासावीस झाले होते. साडेचार च्या आसपास नाशिक ला पोचून इथून आता दुसरी जीप पकडायची पटकन जाता जाता वडापाव, आकाशच्या बॅग ला लागलेली रिकामी बॉटल घेऊन त्यात ज्यूस भरून घेतलं, पेरू, द्राक्ष जे मिळेल ते घेतलं आणि गाडीत जाऊन बसलो. हे सगळं भेटल्यामुळे आता सगळे खुश कसऱ्याच्या दिशेने गाडी पण सुटली होती, सहाची ट्रेन मिळणार हाही आनंद होता आणि समोर चालू झालेले सर्वांचे बकासुर रूप. कसारा गाठलं चहा पाहिजे होता, पण थांबणं कितपत योग्य माहीत नव्हतं म्हणून चहाला तिलांजली दिली आणि स्टेशन गाठलं.
परतीचा प्रवास
 थोड्याच वेळात ट्रेन आली आणि ट्रेन मध्ये बसलो. जो काही सुका खाऊ होता थोडाफार त्याचा देखील फडशा पडायला घेतला. इतक्यात लक्षात आलं की अरे सकाळी थर्मास मध्ये चहा भरून ठेवलाय. जी गोष्ट मनापासून मागतो ती पूर्ण होतेच असच काहीसं माझं झालं होत. 
सुख 
थर्मास उघडून पाहिलं तर चहा बऱ्यापैकी गरम होता, थर्मासाचे थेट घोट घेत संपूर्ण ट्रेक डोळ्यांसमोरून झरझरत गेला. इंद्राई किल्ला झाला नाही ही रुखरुख असली तरी सातमाळा रांगेतील धोडप-इखारा-कांचना-मंचना-कोळधेर-राजधेर एवढा झालेला टप्पा कायमचा आठवणीत राहिला. 
          तुमच्या प्रतिक्रियांशिवाय माझ्या ब्लॉगला पूर्णत्व नाही. काही चुकत असेल किंवा काही सूचना असतील त्या जरून कळवा, त्या पूर्ण करण्याचा मनापासून प्रयत्न करेन.
          समाप्त.
          
साभार,
सह्याद्रीचा भटकभवान्या

No comments:

Post a Comment

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...